इर्शाळवाडी गावात भूस्खलन झाल्याची घटना समजताच शिंदे-फडणवीस सरकारमधील तीन मंत्र्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच गुरुवारी सकाळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाचा दौरा करत परिस्थितीचा आढावा घेतला. इर्शाळवाडी गावात जाण्यासाठी दोन तासांची पायपीट करावी लागत आहे. तसेच मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल असल्याने जेसीबी, पोकलेन आणि अन्य यंत्रणा घटनास्थळी नेण्यास मोठे अडथळे निर्माण होत आहे. हवामान खराब असल्याने हेलिकॉप्टरही घटनास्थळी उतरणं शक्य नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. पाऊस सुरू असताना केवळ मनुष्यबळाच्या सहाय्याने इर्शाळवाडीत बचावकार्य सुरू असल्याची माहिती आहे.





