फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत ‘विकास’ गवसत चालला विचार!

0
83
फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत ‘विकास’ गवसत चालला विचार!

फलटण : नगरपरिषदेच्या निवडणुकीची जाहीरात होताच शहरात राजकीय तापमान उंचावले आहे. राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला असून, मतदान २ डिसेंबर रोजी आणि मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. एकूण १३ प्रभागांतून २७ नगरसेवकांची निवड होणार आहे.

या निवडणुकीसाठी प्रभाग रचना पूर्णपणे बदलली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काही प्रभागांवर गट किंवा कुटुंबांची पकड होती, परंतु आता सीमारेषा बदलल्यामुळे कोणालाही विजयाची खात्री नाही. त्यामुळे प्रत्येक गल्लीमध्ये इच्छुकांची गर्दी वाढली असून, काही उमेदवार गटप्रमुखांकडे धाव घेत आहेत, तर काही नगराध्यक्षपदासाठी प्रयत्न करत आहेत.

नगरपरिषदेच्या निवडणुकीत नागरिकांचा दृष्टिकोन मात्र ठाम आहे.  स्थानिक नागरिकाने सांगितले, “निवडणुकीत सगळेजण घरी येतात, विचारपूस करतात. पण निवडून आल्यानंतर एखादं काम झालं तरी नवलं मानावं लागतं.” तर काही तरुण म्हणाले, “आम्हाला राजकारण नको, काम दाखवा. फलटण वाढतंय, पण नियोजनाशिवाय.”

157 वर्षांच्या नगरपरिषदेची जुनी समस्या अजूनही कायम

फलटण नगरपरिषदेचा इतिहास सुमारे १५७ वर्षांचा आहे. स्वातंत्र्योत्तर काळाचा विचार केला तरी, गेल्या ७८ वर्षांतही शहरातील मूलभूत सुविधा अद्याप नागरिकांच्या तक्रारींच्या यादीत आहेत.

  • शहरात २४ तास पाणी पुरवठा नाही.
  • मुख्य रस्ते आणि उपरस्त्यांची दुरवस्था आहे.
  • रात्री पथदिवे अपुरी, काही भागात संध्याकाळीच काळोख पसरतो.
  • सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृहाचा अभाव आहे.
  • स्वच्छता आणि कचरा संकलन अनियमित आहेत.
  • भाजी विक्रेते आणि लहान व्यापाऱ्यांना ठराविक जागा आणि सुविधा नाहीत.

सध्याच्या राजकीय गटांसाठी प्रचाराची तयारी जोरात आहे – राजे गट असो किंवा खासदार गट, रंगतदार प्रचार शहरात दिसून येत आहे. मात्र सामान्य फलटणकर फक्त एवढेच म्हणत आहेत – “इच्छुकांची गर्दी भरपूर आहे, पण विकासावर कोणी बोलत नाही.”