
जळगाव – राजकीय स्पर्धेतून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाजप सोडावी लागल्यानंतर जिल्ह्यात सध्या मंत्री गिरीश महाजन यांचाच वरचष्मा आहे. त्यांचे नेतृत्व पक्षात अलिकडे निर्णायक ठरत असून, सर्व प्रकारच्या निर्णय प्रक्रियेवरही त्यांचा ठसा स्पष्टपणे जाणवू लागला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने नव्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या. त्यातही महाजन यांचीच मर्जी चालली असून, ते सांगतील तीच पूर्व दिशा सध्या भाजपमध्ये मानली जात आहे. एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, राज्याची धुरा सांभाळणारे देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध दर्शविला. परिणामी, केंद्रीय नेतृत्वाकडून हिरवा झेंडा मिळूनही खडसे यांचा भाजपमधील प्रवेश बारगळला. दरम्यानच्या काळात महाजन यांच्या हाती जळगावमधील भाजपचे एकहाती नेतृत्व आले. भाजपने त्यांच्याच नेतृत्वाखाली जिल्ह्यात लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मोठे यश संपादित केले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागल्यानंतर पक्षाला पुन्हा एकदा मजबूत यश मिळवून देण्यासाठी मंत्री महाजन यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले आहे.
जिल्हा परिषदेसह नगरपालिका व महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपसह राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेनेत (एकनाथ शिंदे) युती होणार की प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. तत्पूर्वीच महाजन यांनी सावध भूमिका घेत भाजपमध्ये कार्यक्षम आणि जनतेत चांगली प्रतिमा असलेले नवे चेहरे पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी निवडणुकांमध्ये त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल, अशी पदाधिकाऱ्यांना आशा आहे.
जळगावमध्ये भाजपकडून मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या जात असताना, मंत्री महाजन यांनी त्यांच्या पक्षातील जिल्ह्याचे मंत्री, खासदार व आमदारांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र, तिन्ही जिल्हाध्यक्षांच्या निवडीवेळी त्यांनी आपल्या पसंतीनुसारच निवड करुन सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला. भाजपला विशेषतः रावेर लोकसभा मतदारसंघात मराठा चेहरा देण्यासाठी पूर्व जिल्हाध्यक्षपदी त्यांनी चंद्रकांत बाविस्कर यांची निवड केली. तर जळगाव महापालिकेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महानगर जिल्हाध्यक्षपदासाठी दीपक सूर्यवंशी यांना संधी दिली. याशिवाय, जळगाव लोकसभा मतदारसंघातील गुर्जर समाजाची सहानुभूती मिळविण्यासाठी डॉ. राधेश्याम चौधरी यांची पश्चिम विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी वर्णी लावली. एकूण चित्र लक्षात घेता लेवा समाजाला भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर डावलले असले, तरी जळगाव महापालिकेवर पुढे भाजपची सत्ता आल्यास लेवा समाजाला महापौर पदावर प्रतिनिधित्व देण्याचे आडाखे आहेत. त्यादृष्टीने गिरीश महाजन यांनी सावध खेळी खेळली आहे. भाजपमध्ये सध्याच्या घडीला असल्याने महाजन सांगतील तेच धोरण आहे.