मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त देशभरात विविध उपक्रम राबवले जात असतानाच मुंबईतल्या एका 9 वर्षाच्या चिमुरड्याने दिलेली मानवंदना विशेष कौतुकास पात्र ठरली आहे. मंथन बांडे या चिमुकल्याने अवघ्या 9 व्या वर्षी ‘अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया’ हे सुमारे 12 किलोमीटरचे अंतर अवघ्या 6 तासांत पार करत बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली.
ही दौड पूर्ण करण्यामागे मंथनची बाबासाहेबांविषयी असलेली निस्सीम श्रद्धा आणि प्रेरणा हीच खरी प्रेरणाशक्ती होती. अतिशय जिद्दीने आणि चिकाटीने त्याने हे अंतर पूर्ण करत ‘लहान पण तगडा’ असा परिचय दिला. अटल सेतूवरून सुरू झालेली ही दौड मुंबईच्या ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया इथं समाप्त झाली.
मंथनच्या या अनोख्या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश गेला आहे. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला दिलेल्या प्रोत्साहनाबद्दलही सर्वत्र कौतुक होत आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि शिक्षकांनी मंथनच्या उपक्रमाचे कौतुक करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हा उपक्रम फक्त एक धाव नव्हता, तर एका विचारधारेप्रती, एका महामानवप्रती व्यक्त केलेला श्रद्धेचा सलाम होता. बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षण, समानता आणि स्वाभिमानाच्या विचारांची प्रेरणा मंथनसारख्या लहानग्यांमध्येही दिसत असल्याने हे दृश्य आणखीच प्रेरणादायी ठरले.