सातारा; पुढारी वृत्तसेवा : समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणार्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती आणि बीपीएल संवर्गातील मुलांना मोफत गणवेश देण्यात येतो. यंदा शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याला गणवेश वाटप करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
जिल्ह्यातील सुमारे 75 हजारहून अधिक विद्यार्थ्यांना प्रतिविद्यार्थी 600 रुपयाप्रमाणे सुमारे 4 कोटी 50 लाख रुपयांचा निधी अपेक्षित आहे.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात येतो. विद्यार्थ्यांना दोन गणवेशासाठी प्रति विद्यार्थी 600 रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषदेकडे पुढील वर्षी या योजनेंतर्गत गणवेशाचा लाभ देण्यासाठी नोंदणी पूर्ण केली जात आहे. गणवेश योजनेची मंजूर तरतूद शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरुन शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने खर्च केला जातो. हा निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर जिल्हा परिषदेकडून वर्ग केला जातो.
कोरोनाच्या काळात दोन वर्ष ऑनलाईन वर्ग भरल्याने गणवेश देण्यात आले नव्हते. मात्र मागील वर्षी कोव्हिडचा संसर्ग कमी झाल्याने शाळा सुरु झाल्यानंतर गणवेश वाटप करण्यात आले होते. गतवर्षी जिल्ह्यातील सर्व शाळांमधील 83 हजार 249 विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले होते. यासाठी सुमारे 5 कोटी निधी खर्च झाला होता. यावर्षी सुमारे 75 हजारहून अधिक विद्यार्थी पात्र असल्याने त्यासाठी सुमारे 4 कोटी 50 लाखांहून अधिक निधीची गरज शिक्षण विभागाला लागणार आहे.
गणवेशाची मापे घेण्याची कार्यवाही
नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश देण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे. त्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीच्या पूर्वी जिल्हा परिषद व नगरपालिका शाळांमधील पात्र विद्यार्थ्यांची गणवेशाची मापे शिलाई कारागिरांकडून घेण्यात यावीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या मापाचे गणवेश पुरवणे सोयीचे होईल, अशा सूचना समग्र शिक्षा प्राथमिक शिक्षण परिषदेच्या उपसंचालक डॉ. वैशाली वीर यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकार्यांना दिल्या आहेत.