
फलटण; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यामध्ये यावर्षी कमी पाऊस झाला असून, कोरेगाव, फलटण व माण तालुक्यांतही हीच परिस्थिती आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाण्याची पातळी कमी, त्यामुळे चारा, पाण्याचा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा आहे. चार्याचा प्रश्न सोडवण्यासाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, अथवा चार्याचे अनुदान शेतकर्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी फलटणचे आ. दीपक चव्हाण यांनी केली.
नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आ. दिपक चव्हाण यांनी सातारा जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर आवाज उठवला.
आ. चव्हाण म्हणाले, सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव व फलटण तालुक्यात दुष्काळ आहे. मात्र शासनाने कोणत्या यंत्रणेद्वारे सर्व्हे केला हे पहावे लागणार आहे. खर्या अर्थाने जे तालुके दुष्काळग्रस्त आहेत. त्यांचाच दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश झालेला नाही. ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळाचे संकट आहे त्या तालुक्यांना मदत मिळणे गरजेचे आहे. दुष्काळी तालुक्यातील शेतकर्यांना सरसकट मदत करावी. दुष्काळी भागातील शेतकर्यांना दिलासा देणारा निर्णय सरकारने घ्यावा. सवलत न देता वीज बिले माफ केली पाहिजेत. आजही लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. तसेच दुग्ध व्यवसाय करणारा शेतकरी अडचणीत सापडला असून याबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी आ. चव्हाण यांनी केली. तसेच पोलिस पाटील हा महसुलचा गाव पातळीवरील महत्वाचा घटक आहे. पोलिस पाटील यांच्या मानधनामध्ये 10 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात यावी, अशीही मागणी आ. चव्हाण यांनी केली.
मेडिकल कॉलेजसाठी निधी देणार : मंत्री मुश्रीफ
सातारा येथील मेडिकल कॉलेजसाठी साडेतीन कोटींची तरतूद शासनाने केली होती. या कॉलेजच्या बांधकामाचे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. चार महिन्यांपासून मेडिकल कॉलेजच्या कामांची 90 कोटींची बिले थकली आहेत. ही बिले तत्काळ द्यावीत. उर्वरित बांधकाम पूर्ण करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी आ. दीपक चव्हाण यांनी केली. दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ यांनी सातारा मेडिकल कॉलेजसाठी निधीची तत्काळ तरतूद करून लवकरच या कॉलेजला भेट देणार असल्याचे स्पष्ट केले.








