सह्याद्री साखर कारखान्यातील बॅलेट पेपर निवडणुकीत भाजप आमदाराला निम्मी मतंही मिळाली नाही: रोहिणी

0
1


मुंबई: साताऱ्याच्या कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार गटाचे नेते बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलला भरघोस यश मिळाले. बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेल सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या  21 जागांवर विजय मिळवला आहे. बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांच्या नेतृत्त्वातील पी.डी. पाटील पॅनेलचे सर्व उमेदवार 7500 ते 8000 हजारांच्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. या विजयानंतर कराडमध्ये बाळासाहेब पाटील यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला होता. (sahyadri karkhana Election)

25 वर्षानंतर पार पडलेल्या सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत भरघोस यश प्राप्त केल्यानंतर बाळासाहेब पाटील यांना शरद पवार आणि जयंत पाटील यांचा फोन आला होता. शरद पवार यांच्याकडून बाळासाहेब पाटील यांचे कारखान्याच्या निवडणुकीत संपूर्ण पॅनेल निवडून आणल्या निमित्त विशेष कौतुक केले. विधानसभा निवडणुकीनंतर पार पडलेल्या पहिल्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याच सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीकडे लक्ष लागले होते. यंदा निवडणुकीत भाजप आमदार मनोज घोरपडे, भाजप जिलाध्यक्ष धैर्यशील कदम आणि बाळासाहेब पाटील या तीन नेत्यांमधे तिरंगी लढत पार पडली होती.

सह्याद्री सहकारी साखर कारखान्यातील निवडणुकीत मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सत्ताधारी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पी. डी. पाटील पॅनेलने 4000 मतांची आघाडी घेतली होती. अनेक तास मतमोजणी सुरु होती. पहिल्या फेरीपासूनच सत्ताधारी गटाचा विजय निश्चित झाला असून सत्ताधारी गटाकडून जल्लोष सुरू झाला होता. भाजपचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांच्या गटाला मोठा धक्का मानला जात आहे. पहिल्या फेरीत सर्वच्या सर्व 21 जागांवर सत्ताधारी गट 4 हजाराहून अधिक मतांनी पुढे होता. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली होती.

रोहिणी खडसेंचा भाजपला टोला

सह्याद्री साखर कारखान्यातील निवडणुकीत भाजप नेत्यांच्या पॅनलचा धुव्वा उडाल्यानंतर रोहिणी खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यांनी एक ट्विट केले. यामध्ये त्यांनी म्हटले की, 4 महिन्यांपूर्वी 50 हजार मताधिक्याने जिंकलेला भाजप पार्टीचा एक आमदार, बॅलेट पेपर वर घेतलेल्या ‘सहयाद्री कारखाना’ निवडणूकीमध्ये विजयी उमेदवाराच्या अर्धी मते पण घेऊ शकला नाही. पैशाचा वारेमाप वाटप करुन देखील…..,असे रोहिणी खडसे यांनी म्हटले. यावर आता भाजपच्या नेत्यांकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र सातारा जिल्ह्यातील कराड, कोरेगाव, सातारा, खटाव आणि सांगली जिल्ह्यातील कडेगाव अशा पाच तालुक्यात आहे. कारखान्याच्या एकूण 32 हजार 205 सभासदांपैकी 26,081 सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सत्ताधारी पी डी पाटील पॅनलला तब्बल 15 हजाराहून अधिक मते मिळाली.

तर भाजप आमदार मनोज घोरपडे आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अँड. उदयसिंह पाटील यांच्या पॅनेलला 7000 ते 8000 दरम्यान मते मिळाली. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ आणि काँग्रेसचे निवास थोरात यांच्या तिसऱ्या पॅनेलला 2200 ते 2300 मते मिळाली.

आणखी वाचा

सह्याद्री साखर कारखान्यावर बाळासाहेब पाटलांचा झेंडा, पी.डी. पाटील पॅनलचा 21-0 असा दणदणीत विजय, भाजप नेत्यांच्या दोन्ही पॅनलचा पराभव

अधिक पाहा..



Source link