शिवतीर्थाबाबत भावना दुखावल्यास उद्रेक : खा. उदयनराजे | पुढारी

0
18


सातारा, पुढारी वृत्तसेवा : शिवतीर्थ परिसर हा आहे तसाच कायम रहावा अशी शिवप्रेमींसह माझी इच्छा आहे. भावनेपेक्षा तांत्रिक बाबींचा विचार करता नियोजित आयलँड राज्य मार्गाच्या निकषात बसत नाही. ग्रेड सेपरेटर केल्यामुळे खाली जमीन मोकळी झाली आहे. प्रचंड वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता असून याचाही विचार करावा लागेल. मी कुणाची बाजू घेणार नाही पण शिवतीर्थाचे पावित्र्य जपलं पाहिजे. रयतेला डावलून तुम्ही काहीही करू शकत नाही. भावना दुखावल्या तर उद्रेक होणारच, असा इशारा भाजपचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, द्वेषापोटी, अहंकारापोटी एवढे बोलले जाते की त्यांच्या बोलण्यातून गजकर्ण दिसतं, अशी टीकाही उदयनराजेंनी नाव न घेता आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर केली.

खा. उदयनराजे भोसले म्हणाले, अनेक दिवसांपासून शिवतीर्थाबद्दल चर्चा सुरू आहे. ज्यांची उंची आणि बौद्धिक पात्रता नाही अशा व्यक्तींनी नेहमीप्रमाणे माझा संबंध नसताना उदयनराजे स्वत:च्या विश्वात असतात अशी टिप्पणी केली. माझं विश्व म्हणजे लोकांचे कल्याण करणे, त्यांचे हित जोपासणे, लोकांची सेवा करणे हेच आहे. ‘कमांड’ आणि ‘डिमांड’ यातील फरक काही लोकांना कळत नाही. तरुणांना माझ्या प्रेमापोटी पेंटिंग काढावंस वाटलं. पण कारण नसताना त्याची जोड पालकमंत्र्यांशी देण्यात आली. शंभूराज देसाई यांच्यासोबत कॉलेजपासूनची मैत्री आहे. उगीच जुंपून देण्याचा प्रयत्न केला.

खा. उदयनराजे म्हणाले, संबंधित जागा नगरपालिका, जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. शिवतीर्थची जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित करावी यासाठी ना. गिरीष बापट यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आमच्या घराण्याचा जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार महाराष्ट्रातील शिवप्रेमींचा आहे. कित्येक वर्षे पोवई नाका परिसराकडे कुणी लक्ष दिले नाही. आम्ही पुढाकार घेऊन 16 कोटींची मंजुरी मिळवली. श्रेयवादात न पडता हे काम होणे आवश्यक होतं. सल्लागारसाठी बुद्धी नाठी म्हणतात पण ते सगळ्यांनाच लागू होतं. अहंकाराच्या भाषेत बोलू नका. मी राजकीय वाटचालीत कधीही उर्मट बोललो नाही, अहंकार दाखवला नाही. माझा या जिल्ह्यात कुणीही शत्रू नाही. राजकीय समीकरणं बदलत असतात. आजी-माजी आमदार, खासदार यांची प्रत्येकाची वैचारिक बैठक असते. आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. महेश शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. पृथ्वीराज चव्हाण, सत्यजीत पाटणकर व इतर माझे वैरी नाहीत.

खा. उदयनराजे म्हणाले, पेंटिग केलं म्हणून त्यांनी आयलँड करायचं ठरवलं असं काही नाही. कारण नसताना आयलँडला माझा विरोध असल्याचं दर्शवलं जात आहे. पण आयलँड करत असताना परिस्थितीचा विचार करायला हवा. आयलँडची जागा माहित नाही. बसून आयलँडची जागा निश्चित करू, असे शंभूराज देसाई यांनी म्हटले असून त्यांच्या या भूमिकेचे स्वागत आहे. आमचाही आयलँड उभारणीला हातभारच असेल. पण ग्रेडसेपरेटर करण्यापूर्वी जमीन भरीव होती. आता लोडबेअरिंगचे वजन ग्रेडसेपरेटरला पेलू शकेल का? त्याचा काय परिणाम होईल याचा सर्व्हे करावा लागेल.

मोळाचा ओढा-बसस्टँड-पोवईनाका ते गोडोली मार्ग, पोवईनाका-बॉम्बे रेस्टॉरंट आणि पोवई नाका-वाढे फाटा हे राज्य मार्ग तर पोवई नाका ते राजवाडा हा डी.पी. रोड आहे. याचे काही नियम असतात. त्यामध्ये आयलँड कसा बसवता येईल या बाबींची पडताळणी करावी लागेल. पोवई नाका किंवा शिवतीर्थ परिसरात अन्य कोणताही पुतळा बसवू नये, अशी सातारकरांची मागणी आहे, हे भावनिक झालं. पण टेक्निकल आऊटलूकचाही विचार करावा लागेल.

खा. उदयनराजे म्हणाले, शिवतीर्थ परिसर तसाच रहावा ही केवळ माझीच नव्हे तर माझ्यासह शिवप्रेमी, शंभूराज देसाई यांच्यासह सर्वांची इच्छा आहे. त्यांनी ते बोलून दाखवले आहे. हा परिसर आणखी सुशोभित कसा करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परिसर थ्रीडी करण्याचा प्रयत्न आहे.

पालकमंत्र्यांनी पोवईनाक्यावरच बाळासाहेब देसाई यांचं स्मारक करायचं ठरवलं आहे. याबाबत चर्चा करण्यासंदर्भात त्यांनी शब्द दिला आहे का? सातारकर आक्रमक आहेत, असे विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, माझं काही बोलणं झालेलं नाही. पोवईनाक्यावर भरपूर जागा असेल तर कुणी थांबवलं असतं. त्याठिकाणी अपघात होणार असतील त्याला जबाबदार कोण? स्मारकाची जागाही माहित नसल्याचे त्यांनी सांगितले.

इतर राजांनी हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांचे आहे असे सांगितले. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेच राज्य आहे असे म्हणाले होते. रयतेला डावलून तुम्ही काहीही करू शकत नाही. भावना दुखावल्या तर उद्रेक होणारच. मग एखादा म्हणेल की यांनी केलं, पण तसं होतं नाही. तुम्हाला वाटतंय तर बघा. स्मारक कसं करायचं चर्चा करा. एवढी ठिकाणी आहेत पण त्या तपशिलात मला जायचे नाही. त्या बैठकीलाही आम्हाला बोलावलं नसल्याने अधिक तपशिल माहित नसेल तर काय बोलणार, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

महत्त्वाच्या विषयावर तुम्ही आक्रमक होता. या विषयात तुमची आक्रमता दिसत नाही त्याचे काय कारण आहे, असे विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, लोकांच्या भावनेचा विषय आहे. भावना दुखवल्या गेल्या तर लोकांना मी थांबवू शकणार नाही. मी कुणासोबत जुंपून घेणार नाही. कायदेशीरित्या होत असताना शिवतीर्थाचे पावित्र्य राखलं गेलं पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केलं.

राजघराण्यातील व्यक्तींशी चर्चा करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले, याबाबत विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, माझ्या घरी सर्वांचंच स्वागत आहे. पण प्रस्ताव काय आहे तो पाहिला पाहिजे.

आम्ही सरकारचा भाग नाही का?

आमचं सरकार आहे, माझ्या अधिकारात मी स्मारक करू शकतो, असे पालकमंत्री म्हणत आहेत, असे विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, हो तुमचंच सरकार आहे. सरकारचा आम्ही भाग नाही का? जनता या सरकारचा भाग नाही का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री हेच सरकारचा भाग आहेत का? या लोकांनाही त्यांच्या मतदारसंघात जनतेनेच निवडून दिलेय ना? आम्हीही मतदान केलंय. या सरकारचा एक व्यक्ती, नागरिक म्हणून आमच्यासह प्रत्येकजण भाग आहे ना? कुणाचंही सरकार असो पण ते लोकांचे सरकार असते हे कदापि कुणी विसरू नये.

शिवतीर्थाचे पावित्र्य राखण्यासाठी जे करता येईल ते करणार….

स्मारकाला सातारकरांचा विरोध असून एक इंचही जागा देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोध झाला तर तुम्ही शिवतीर्थ की आयलँडच्या बाजूने असाल, असे विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, मी कुणाची बाजू घेणार नाही, पण शिवस्मारकाचं पावित्र्य जपलं पाहिजे या मुद्याशी माझ्यासह प्रत्येकजण ठाम आहे. पालकमंत्र्यांनी केलेले नियोजन पहावं लागेल. कुठल्याही प्रोजेक्टची अंमलबजावणी करताना ते प्रसिद्ध करावे लागेल. त्यावेळी काय करायचे ते बघूया. कायदा लागू करतानाही लोकांना वेळ देऊन मते जाणून घ्यावी लागतात. लोकांना विचारात घ्यावेच लागेल. शिवतीर्थाचे पावित्र्य राखण्यासाठी जे करता येईल ते करणार, असे त्यांनी निक्षून सांगितले.

माझ्या संमतीचा विषय नाही; पोवईनाक्यावर स्मारक होऊच शकत नाही

तांत्रिक बाबी दूर केल्यास स्मारक करता येईल का? असे विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, होऊच शकत नाही. माझ्या संमतीचा विषय नाही. पोवईनाक्यावर मुबलक जागा असती तर ठिक आहे. राज्य मार्गविषयक नियमांत बसलं पाहिजे. त्यासाठी आवश्यक जागा सोडावी लागते. त्यामुळे राज्य मार्गाच्या निकषात बसत नाही. राजवाड्याकडून, गोडोलीकडून, वाढे फाट्याकडून येणारी वाहने आयलँडमुळे दिसली नाही तर अपघात होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.



Source link