
- Marathi News
- Opinion
- Divya Marathi Rasik Special Article On Blind Successor Written By Yajuvendra Mahajan
यजुर्वेंद्र महाजन12 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
मुलांना कॉप्या पुरवणारे पालक, शिक्षक ज्या देशात असतील, तिथे पुढे जावून पूजा खेडकरसारखी उदाहरणे घडली तर धक्का बसायला नको! मुळातच, समाजातील सन्मान आणि स्थान पद, पैसा, प्रतिष्ठेवर अवलंबून नाही, हे सिद्ध करणारी व्यवस्थाच आपण निर्माण करु शकलो नाही. आताही आपले डोळे उघडले नाहीत, तर समाज म्हणून आपणच दृष्टिबाधित असल्याचे पुन्हा सिद्ध होईल.
गेल्या काही दिवसांपासून पूजा खेडकर या परिविक्षाधीन आयएएस अधिकाऱ्यासंदर्भातील विषय चर्चेत आहे. आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) तिच्यावर गुन्हा दाखल करण्यापर्यंत तो पोहोचला असला, तरी एकूणच हे प्रकरण खूप गंभीर आहे. ‘यूपीएससी’सारख्या परीक्षांमध्ये असे प्रकार घडणे हे अधिक चिंताजनक असले, तरी त्यामुळे ही संपूर्ण परीक्षा यंत्रणाच कमकुवत आहे, असे म्हणणे योग्य होणार नाही. अपवादात्मक परिस्थितीत अशी एखादी गोष्ट घडते आणि त्याची सर्वंकष चौकशीही व्हायलाच हवी. पण, देशातील लाखो मुले अतिशय कष्टाने तयारी करुन ही परीक्षा देतात, त्यांची उमेद या प्रकरणानंतर खचणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे.
सुरज तिवारी.
खऱ्या दिव्यांगांचा लढाही दिव्यच!
नॉन क्रिमी लेअरचे तसेच दिव्यांगत्वाचे बनावट प्रमाणपत्र मिळवून परीक्षा देणे आणि त्यातून पद मिळवणे, हा एका अर्थाने गुन्हाच आहे. दिव्यांग नसताना किंवा अंशतः दिव्यांग असताना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र काढून त्याचे फायदे मिळवण्याचे प्रकार आजकाल सर्रास घडतात. त्यामुळे गंभीर दिव्यांग असणाऱ्या आणि प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्यांना संधी मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना ‘यूपीएससी’चा सगळा अभ्यासक्रम शिकण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान, तज्ज्ञ मार्गदर्शक आणि अभ्यासाचे साहित्य अशी व्यवस्था आम्ही उपलब्ध करु शकलो. त्यामुळे जवळपास सर्वच राज्यांतील विद्यार्थी तिथे या प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची आणि उच्च शिक्षणासाठीची तयारी करतात. हात नसणारी मुले पायाने अभ्यास करतात. डोळ्यांना काहीच न दिसणारी मुले तंत्रज्ञानाच्या मदतीने सगळा अभ्यास पूर्ण करतात. ऐकू आणि बोलू न शकणारी मुले साइन लँग्वेज इंटरप्रीटरच्या माध्यमातून हा सगळा अभ्यासक्रम शिकतात.
श्रीकांत बोल्ला.
देशात पूर्वी अशी व्यवस्था नव्हती. त्यामुळे शंभर टक्के अपंगत्व असणारे विद्यार्थी या संधीचा फायदा घेऊ शकत नव्हते. गेल्या पाच वर्षांत या विद्यार्थ्यांना अशी संधी मिळवून देण्याचे प्रयत्न गतिमान झाले. दिव्यांग स्नेही पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, अभ्यास साहित्य आणि विशेष मार्गदर्शक अशा व्यवस्था उपलब्ध झाल्यामुळे हे विद्यार्थी स्वतःच्या मेहनतीच्या बळावर विविध परीक्षांमध्ये यशस्वी होत आहेत. तथापि, अथक संघर्ष करुन यश मिळवल्यावरही दिव्यांग उमेदवारांच्या अडचणी संपत नाहीत. विशेषतः १०० टक्के दिव्यांगत्व असणारे विद्यार्थी उत्तीर्ण होतात, तेव्हा त्यांना सर्वांत जास्त त्रास कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून (DoPT) होतो. बऱ्याच वेळा त्यांना योग्य पोस्टिंग देण्यात येत नाही. मग त्यासाठी त्यांना काही वर्षे न्यायालयात लढा द्यावा लागतो. पण दुसरीकडे, अनेक प्रकरणांमध्ये दिव्यांग नसलेल्यांनी मात्र तसे प्रमाणपत्र मिळवलेले असते. काही वेळा अशा उमेदवारांना लगेच पोस्टिंगही मिळते. पूजा खेडकरच्या प्रकरणात हे दिसून आले आहे. याला आपली बिघडलेली सामाजिक मानसिकता कारणीभूत आहे.
कायदे मोडणे हाच बनला ‘नियम’
राज्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी समाजातूनच निवडून जात असतात. समाजाचेच प्रतिबिंब त्यांच्यात बघायला मिळते. आपल्या स्वार्थासाठी किंवा अधिकच्या लाभासाठी नियम बदलून, वाकवून किंवा तोडून पुढे जायचं, काहीही करून संपत्ती कमवायची, पदे मिळवायची असे प्रकार संपूर्ण समाजातच मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत. हे प्रकार बघून अनेक लोक तशा गोष्टींकडे वळतात. उत्तम संपत्ती असतानाही अल्प उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळवून मोठमोठ्या शिक्षण संस्थांतून डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी झाल्याची शेकडो उदाहरणे आपल्या आजूबाजूला दिसतात. मुलांना पास होण्यासाठी कॉप्या पुरवणारे पालक आणि शिक्षक ज्या देशात असतील, तिथे पुढे जाऊन पूजा खेडकरसारखी उदाहरणे घडली तर धक्का बसायला नको! अनेक नागरिक स्वतःची नियमबाह्य कामे करून घेण्यासाठी राजकारणी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे आग्रह धरताना, दबाव टाकताना, आमीष दाखवताना आपण पाहतो. शासन – प्रशासनातील लोकही याच समाजाचे घटक असल्याने त्यांच्यातील काही जण अधिकाराचा दुरुपयोग करून स्वार्थ साधतात.
पूजा कदम.
या स्थितीला आपणच जबाबदार
एखादा प्रवेश अथवा नोकरी मिळवण्यासाठी आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याचे दाखवणारी उदाहरणे पाहिली की, पद, पैसा आणि प्रतिष्ठेसाठी आपण कुठल्या थराला जात आहोत, याची जाणीव होते. देशाचे, समाजाच्या भल्यासाठी नियम- कायदे बनवणारे आणि ते राबवणारे आपलेच प्रतिनिधी म्हणजे एका अर्थाने आपणच असतो. पण, या नियम-कायद्यांचे वेगवेगळे अर्थ लावून, त्यातील त्रुटी शोधून स्वतःचा फायदा करून घेणारेही आपणच असतो. हे सगळे करणारे आपणच आहोत. यातील कोणीही परग्रहावरून वा परदेशातून आलेले नाहीत. त्यातून सर्वच क्षेत्रांमध्ये अंदाधुंदी आणि अनागोंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दशकांपासून आपण कुठल्याही प्रकारे मिळवलेले पद, पैसा आणि प्रतिष्ठा यांनाच महत्त्व द्यायला लागलो आहोत, हेही यामागचे एक कारण आहे. ही विपरीत व्यवस्था प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपण सर्वांनी मिळूनच बनवली आहे. चांगल्या मूल्यांसह चांगला माणूस घडण्याला ना आपण प्राधान्य दिले, ना त्यासाठी प्रयत्न केले. चाळीस वर्षांपूर्वी ज्या गोष्टींचा विचार करणेही पाप मानले जायचे, त्या आजकाल सहज होताना दिसतात. मुख्य म्हणजे, त्याचे कोणालाही वावगे वाटत नाही. सगळेत करतात म्हणून आपणही करावे, इतक्या सहजतेने अनेक चुकीच्या गोष्टी आपण स्वीकारल्याआहेत.
राष्ट्रीय चारित्र्य निर्माणाची निकड
अशी परिस्थिती असली, तरी अद्याप पूर्णपणे वेळ हातातून गेलेली नाही. कारण सर्व क्षेत्रांतील अशा घटना अजून तरी अपवादात्मक स्थितीत आहेत, त्या नियम बनलेल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबातील वातावरणातून, शालेय शिक्षणातून जीवनमूल्ये नव्याने रुजवावी लागतील. त्यांना महत्त्व द्यावे लागेल. सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रांचे नेतृत्व करणाऱ्यांना स्वतःच्या कृतीतून आदर्श उभा करावा लागेल. प्रामाणिकपणे निर्णय घेणे, खोटी कामे आणि खोटा व्यवहार टाळणे, आपले काम अत्यंत सचोटीने, गुणवत्तेने करणे, शब्द पाळणे, परस्परांना सहकार्य करणे, गरजूंप्रति संवेदनशील असणे, राज्यघटनेने दिलेले कायदे आणि सामाजिक नियम-संकेत पाळणे आदी छोट्या वाटणाऱ्या मोठ्या गोष्टी समाजात रुजण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील. कदाचित यासाठी सलग 20 -30 वर्षे काम करावे लागेल. राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्याचे दूरगामी स्वरुपाचे पूर्व आणि पूर्ण नियोजन करण्याची नितांत गरज आहे. तात्पुरत्या मलमपट्ट्या करून या समस्या सुटणार नाहीत. कायद्यांची कडक अंमलबजावणी, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा लागेल.
चांगल्या व्यक्तींना पुढे आणून समाजासमोर आदर्श निर्माण करावा लागेल. समाजातील सन्मान आणि योग्य स्थान हे पद, पैसा, प्रतिष्ठेवर अवलंबून नाही, तर चांगली जीवनमूल्ये अंगीकारलेल्या गुणी माणसांना ते दिले जाते, अशी व्यवस्था आणि वातावरण निर्माण करावे लागेल. दिव्यांगत्वाच्या, अल्प उत्पनाच्या आणि अशाच कोणत्या ना कोणत्या खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे कुणी शासन वा प्रशासनातील पदांवर बसून व्यवस्थेला वेठीस धरू नये यासाठी आपल्याला आता तरी डोळे उघडावेच लागतील. अन्यथा, समाज म्हणून आपणच शंभर टक्के दृष्टिबाधित असल्याचे सिद्ध होईल.
प्रांजल पाटील
‘प्रांजल’ परिश्रमातूनच खऱ्या यशाची ‘पूजा’!
शंभर टक्के दिव्यांग असूनही खूप खडतर परिश्रम करून आमचे अनेक विद्यार्थी, सहकारी ‘यूपीएससी’सोबतच इतर अनेक स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्राच्या प्रांजल पाटीलने काही वर्षांपूर्वी ‘देशातील पहिली महिला अंध आयएएस’ होण्याचा बहुमान मिळवला होता. तीन -चार वर्षांच्या अथक परिश्रमानंतर तिने हे यश मिळवले होते. सूरज तिवारी याचे दोन्ही पाय आणि एक हात अपघातात कापला गेला होता. या परिस्थितीशी दृश्य-अदृश्य दोन हात करत गेल्या वर्षी तो यूपीएससी उत्तीर्ण झाला. सध्या तो दिल्लीत कार्यरत आहे. पूजा कदम ही पूर्णतः दृष्टिबाधित आहे. तिनेही गेल्याच वर्षी या परीक्षेत लखलखीत यश मिळवले. सध्या ती महाराष्ट्रातच आयकर विभागात असिस्टंट कमिशनर पदावर कार्यरत आहे. आयुष अग्रवालनेही अंधत्वावर मात करून यंदाची यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. श्रीकांत बोल्ला या अंध तरुणाने उच्चशिक्षण घेऊन कशाप्रकारे व्यवसायात मोठी झेप घेतली, हे आपण त्याच्या आयुष्यावर आधारित ‘श्रीकांत’ या चित्रपटात बघितलेच आहे. वामिका शर्मा ही अंध विद्यार्थिनी बँक प्रोबेशनरी अधिकारी म्हणून सध्या कार्यरत आहे. आधी तिला काम दिले जात नव्हते. मात्र, तिचा आत्मविश्वास वाढत गेला तसा इतरांचाही तिच्यावरचा विश्वास वाढला. आज तिचे वरिष्ठ अधिकारी तिच्यावर पूर्ण जबाबदारी टाकतात. दिव्यांगत्वावर मात करीत प्रखर बुद्धिमत्ता, अफाट परिश्रम आणि अडथळे पार करण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने झपाटलेली अशी काही मुले अद्भूत आणि अभूतपूर्व यश मिळवतात.
संपर्क – yajurvendra79@gmail.com