रसिक स्पेशल: महासंघर्षाच्या उंबरठ्यावर…

0
14
रसिक स्पेशल:  महासंघर्षाच्या उंबरठ्यावर…




पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीय उपखंडातील दीर्घ संघर्षाची नांदी झाली आहे. भारत – पाकिस्तानमधील तणाव पूर्वी न अनुभवलेल्या अनिश्चिततेच्या वाटेवर पोहोचला आहे. यात पाकिस्तानचे अस्तित्व आणि भारताचे जागतिक राजकारणातील स्थान पणाला लागले आहे. त्यामुळे दाराशी आ वासून उभ्या असलेल्या महासंघर्षाला तोंड देण्यासाठी आता सर्व भारतीयांना केवळ भावनिकच नव्हे, तर मानसिक, आर्थिक, बौद्धिक आणि भौतिक तयारी करावी लागेल. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने भारतातील जनमानसात आक्रोश निर्माण झाला आहे. परंतु, हा हल्ला अचानक झालेला नाही. गेल्या दोन वर्षांत जम्मू विभागात सुरक्षा जवानांवर अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. काश्मिरातील दहशतवादाचा नवा प्रकार म्हणून तो समोर आला आहे. एक तर, पूर्वी या भागांमध्ये दहशतवादी हल्ल्याचे प्रमाण अत्यल्प होते. पण, अलीकडे दहशतवाद्यांनी जम्मू विभागाला लक्ष्य केले आहे. ११ जून २०२४ ला वैष्णोदेवीला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या बसवर हल्ला करत दहशतवाद्यांनी ११ निष्पापांचे बळी घेतले होते. हे दहशतवादी अत्यंत प्रशिक्षित आहेत आणि त्यांना नमवण्यात सुरक्षा दलांची बरीच शक्ती खर्च होत आहे. या सर्व घटना पाहता, जम्मू – काश्मिरातील दहशतवाद संपल्याचे मिथक जाणीवपूर्वक पसरवले गेल्याचे जाणवते. जम्मू-काश्मीरच्या मतदारांचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील सहभाग तसेच कोरोना महामारीनंतर या केंद्रशासित प्रदेशातील पर्यटनात झालेली वाढ यांना सूचकांक मानत काश्मीर खोऱ्यातील असंतोष कमी झाल्याचे मानण्यात येत होते. परंतु, त्यापूर्वीही तिथल्या मतदारांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये हिरीरीने भाग घेतला होता आणि त्याआधी अनेकदा काश्मीर खोऱ्यातील पर्यटनही बहरले होते. तरीही तिथे दहशतवादी घटना नित्यनेमाने घडत होत्या, त्याचीच पुनरावृत्ती आता होते आहे. काश्मिरी जनमानसातील गुंतागुंत : काश्मिरी जनमानस अत्यंत क्लिष्ट आहे. काश्मिरी लोकांमध्ये प्रखर मतमतांतरे आहेत. दहशतवाद्यांच्या पूर्णपणे विरोधात असलेला मोठा वर्ग काश्मीर खोऱ्यात आहे, त्याचबरोबर भारतीय सुरक्षा दलांची तैनाती आणि त्यांच्या शोधमोहिमांनी अस्वस्थ होणारा वर्गही तेवढाच मोठा आहे. भारतीय पर्यटकांवर मनापासून प्रेम करणारे काश्मिरी जसे आहेत, तसेच भारत सरकारचा द्वेष करणारेही आहेत. विशेष दर्जाची आस ठेवत भारतीय संघराज्याचा भाग होण्यास हरकत नसलेले काश्मिरी जसे आहेत, तसे पाकिस्तानात अजिबात सामील व्हायचे नाही, ही स्पष्टता असलेले काश्मिरीही आहेत. भारतापासून वेगळे होण्याची आकांक्षा बाळगलेले युवक अद्याप काश्मिरी समुदायात आहेत आणि पाकिस्तानकडून भ्रमनिरास झालेले फुटीरतावादीही त्यात आहेत. पाकिस्तान अशा विखुरलेल्या काश्मिरी जनसमुदायात भारतविरोधी शक्तींना हवा देतो. पण, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करणारे दहशतवादी ही भारताची डोकेदुखी आहे. पाकव्याप्त काश्मिरातून होणारी ही घुसखोरी बंद करणे भारताला अद्याप शक्य झालेले नाही. द्विपक्षीय संबंध मृत्युशय्येवर : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये अभूतपूर्व तणाव निर्माण झाला आहे. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याने दोन्ही देशांतील संबंध कमालीचे बिघडले होते आणि २०१९ च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर द्विपक्षीय संबंध रसातळाला गेले होते. गेल्या ६ वर्षांत जे नाममात्र संबंध उरले होते, तेही आता जवळपास संपुष्टात आले आहेत. व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ताबडतोब परतण्यास भारताने सांगितले आहे आणि भारतासोबत जो किरकोळ व्यापार होता, तो पाकिस्तानने स्थगित केला आहे. भारत-पाकिस्तानदरम्यान प्रत्यक्ष व्यापार अगदीच कमी होता. पण, संयुक्त अरब अमिरातीमार्गे दोन्ही देशांच्या वस्तूंचा बऱ्यापैकी व्यापार होतो. अशा तृतीय पक्षीय व्यापारालाही पाकिस्तानने स्थगिती दिली आहे. दोन्ही देशांनी परस्परांच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांची संख्या निम्म्याने कमी केली आहे. पाकिस्तानची कारस्थाने आणि कोंडी : स्वातंत्र्य आणि फाळणीनंतर भारताने पाकिस्तानचे सार्वभौमित्व मान्य करत द्विपक्षीय संबंधांना समानता व सन्मानाच्या चौकटीत विकसित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. मात्र, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताविरुद्ध सातत्याने काश्मीरचे पालुपद वापरल्याने भारताने बांगलादेश मुक्तिसंग्रामाला त्याच्या निष्कर्षाप्रत पोहोचवत द्विपक्षीय संबंधांमध्ये आपले वर्चस्व निर्माण केले होते. काश्मीरचा प्रश्न द्विपक्षीय स्तरावर सामंजस्याने सोडवण्यात येईल, हे भारताने सिमला कराराद्वारे पाकिस्तानला मान्य करण्यास भाग पाडले होते. या करारामुळे काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण होणे बंद झाले; पण पाकिस्तानने हा प्रश्न सामंजस्याने सोडवण्याऐवजी छुप्या युद्धाचा मार्ग पत्करला. दरम्यानच्या काळात जागतिक परिस्थिती कमालीची बदलली. शीतयुद्धानंतर पाश्चिमात्य राष्ट्रांसाठी दहशतवादाविरुद्धचे युद्ध ही प्राथमिकता झाल्याने पाकिस्तानची कोंडी झाली. चीन वगळता इतर कोणत्याही मोठ्या देशाचा त्याला पाठिंबा उरला नाही. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सातत्याने हलाखीची होत गेली. आज त्या देशाची अर्थव्यवस्था चीन आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिलेल्या कर्जांवर कशीबशी श्वास घेते आहे. अण्वस्त्रसज्जतेचा बागुलबुवा : असे असले तरी भारताच्या तुलनेत झालेली स्वत:ची प्रचंड अधोगती पाकिस्तान मान्य करत नाही. १९९८ मध्ये भारताने केलेल्या अण्वस्त्र चाचणीनंतर पाकिस्ताननेही अशी चाचणी करत स्वत:ला अण्वस्त्रधारी देश घोषित केले. भारताप्रमाणे आपल्याकडेही अण्वस्त्रे असल्यामुळे आपण भारताच्या बरोबरीत आहोत, ही भावना पाकिस्तानी लष्कर आणि सत्ताधाऱ्यांच्या मानसिकतेत भिनली आहे. याच मानसिकतेतून भारताला सतत असुरक्षित ठेवायचे आणि जागतिक राजकारणात एक मोठी शक्ती म्हणून उदयास येऊ द्यायचे नाही, हे कुतंत्र पाकिस्तानने अवलंबले आहे. अन्यथा; पंजाब, काश्मीर किंवा भारताचा कोणताही भाग दहशतवादी कारवाया करुन भारतापासून तोडता येणार नाही, हे १९९० च्या दशकाअखेरच स्पष्ट झाले होते. तरीही केवळ अण्वस्त्रांच्या बलाबलाचा फायदा घेत भारताला वेळोवेळी जखमी करत राहायचे धोरण पाकिस्तानने राबवले. तो ठराविक काळानंतर अण्वस्त्र-ढालीची चाचणी घेत असतो. १९९९ ची कारगिलमधील घुसखोरी, २००२ मधील भारतीय संसदेवरील दहशतवादी हल्ला, २००८ चा मुंबई हल्ला, २०१४ चा पुलवामा हल्ला आणि आता पहलगाममध्ये घडवलेले मृत्युकांड या सर्वांतून पाकिस्तानने हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे की दोन्ही देशांदरम्यान प्रस्थापित झालेल्या अण्वस्त्र संतुलनामुळे भारताचे प्रत्त्युत्तराचे पर्याय मर्यादित आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकने पाकिस्तानचा अण्वस्त्रांचा बागुलबुवा हाणून पाडल्याची खात्री अनेक सुरक्षातज्ज्ञांना वाटत होती. पहलगाम हल्ल्यानंतर याचे पुनरावलोकन करण्याची गरज आहे.
आता पाकिस्तानने भारताच्या पल्ल्यात चेंडू टाकत उपखंडातील दीर्घ संघर्षाची नांदी केली आहे. पाकिस्तानवर वचक ठेवण्यासाठी जे जे करणे गरजेचे होते, ते सर्व उपाय भारताने यापूर्वीही केले आहेत. यावेळी भारताने सिंधू नदी पाणीवाटप करार स्थगित ठेवण्याचे ब्रह्मास्त्र उपसले आहे. परिणामी भारत – पाकिस्तान संघर्ष पूर्वी न अनुभवलेल्या अनिश्चिततेच्या वाटेवर पोहोचला आहे. यात पाकिस्तानचे अस्तित्व आणि भारताचे जागतिक राजकारणातील स्थान पणाला लागले आहे. त्यामुळे २०२५ हे दक्षिण आशियासाठी अत्यंत महत्त्वाचे वर्ष ठरणार आहे. आपल्या दाराशी आ वासून उभ्या असलेल्या महासंघर्षाला तोंड देण्यासाठी आता सर्व भारतीयांना केवळ भावनिकच नव्हे, तर मानसिक, आर्थिक, बौद्धिक आणि भौतिक तयारी करावी लागेल.

सिंधु कराराचे ‘गहिरे पाणी’… भारत – पाकिस्तान संबंध १९८० च्या मध्यापासून सातत्याने खालावत गेले आहेत. मात्र, अत्यंत तणावाच्या काळातही ना भारताने सिंधू पाणीवाटप करार रद्द करण्यासाठी पाऊल उचलले होते, ना पाकिस्तानने सिमला करार रद्दबातल ठरवण्याची दिशा पकडली होती. दोन्ही देशांनी केलेल्या या घोषणांचा एकच अर्थ निघतो, तो म्हणजे भारत – पाकिस्तान संबंधांमध्ये आता प्रचंड मोठी उलाढाल होऊ घातली आहे. त्यातही सिंधु पाणीवाटप कराराच्या स्थगितीचे गहिरेपण पाकिस्तानला सर्वार्थाने आणखी खोलात नेईल.
(संपर्क – parimalmayasudhakar@gmail.com)



Source link