
मुंबई11 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
एकविसाव्या शतकात हवामान बदलासारख्या मोठ्या समस्या उभ्या राहिल्या असताना गणेशोत्सवातही या काळानुरुप बदल व्हायला हवा. पर्यावरणाची हानी असो की अनिष्ट रुढी-परंपरा असोत; समाजाला भेडसावणाऱ्या अशा विविध प्रश्नांवर ज्ञान-विज्ञानाधारित पर्याय शोधण्यासाठी या उत्सवासारखे दुसरे चांगले निमित्त कुठले असेल? — पावसाळा संपत आला आहे, सर्वत्र हिरवळ दाटली आहे, कानाकोपऱ्यातून जिथे जमीन मिळेल तिथे गवत किंवा काही ना काही झाडे-झुडुपे उगवली आहेत. आता त्यांना फुलंही यायला लागतील. सह्याद्रीचे डोंगर सोनकीच्या पिवळ्या फुलांचं पीतांबर लेवून सज्ज होतील. शेतीची कामेही मार्गी लागली आहेत. आणि अशातच सुरू होतोय सणासुदीचा हंगाम… आपल्याकडं सगळ्याच गोष्टींची सुरूवात गणेशपूजनाने होते. मग हा सणासुदीचा हंगामही त्याला अपवाद कसा असेल?आणि गणपती बाप्पा इतर देवांसारखा नाही. तो लहान-थोर सर्वांचा लाडका. तो येतो दहा दिवसांसाठी आणि जाताना चुटपुट लावून जातो. बाप्पा येणार म्हणून आधीपासूनच तयारी सुरू होते. घरांची स्वच्छता, त्यांची सजावट, त्यात बालगोपाळांपासून सगळेच कामाला लागतात. खरे तर प्रत्येकासाठी आपले कलागुण दाखवण्याची ही संधीच! आजकाल ही सजावट करणं तसं सोपं झालंय.. बाजारात थर्माकोलचे सुंदर कलाकुसर असलेले खांब, मखर सारं काही मिळतं. प्लास्टिकची फुलं आणि इतर रेडिमेड साहित्यही कुठेही मिळते. ते आणून मांडलं, कलात्मकपणे बसवलं की झालं! मग बाप्पाची मूर्ती आणायची. बहुतेकांचं दुकान ठरलेलं असतं. तिथून गणेश चतुर्थीला बाप्पा घरी आणायचे. मग प्राणप्रतिष्ठा अन् रोज मनोभावे पूजाअर्चना नि आराधना…
नवविचार – संकल्पनांचे पर्व असा हा आमचा उत्सव शहरी जीवनाला सुटसुटीत आणि परंपरा जोपासण्याचे समाधान देणारा. पण, हे सारं योग्य आहे का? या साऱ्यातून आपण उत्सवाचा मूळ आत्मा, मूळ उद्देश कुठं तरी विसरलो असे वाटत नाही का? आपण तसा विचारच करत नाही. त्याच त्या जुन्या ढाच्यात अडकून राहतो. खरं तर गणपती ही नवनिर्मितीची देवता. त्यामुळे गणेशोत्सव ही कलेला, कलात्मकतेला, नवनिर्मितीला, नवविचार – संकल्पनांना चालना देणारा असतो. पण, आपण तो रुढीबद्ध करून ठेवतो आहे. अजूनही आपल्याला त्या तशाच प्रकारच्या ‘पीओपी’च्या मूर्ती हव्या आहेत. त्याऐवजी इतर माध्यमे अवलंबण्याचा, स्वीकारण्याचा प्रयत्न आपण का नाही करीत? ‘पीओपी’ पर्यावरणास अनुकूल नाही, त्यावर बंदी असूनही काही ना काही पळवाटा काढत परंपरेच्या नावाखाली आपण त्या बिनदिक्कत घेत असतो. ‘पीओपी’ला शाडूच्या मूर्तींचा पर्याय. शाडू माती कुठं मिळते? तर दूरच्या कुठल्या खेडेगावातून ती उपसली जाते आणि उत्सवानंतर विसर्जनाच्या निमित्ताने पुन्हा गावाच्या तळ्यात, नदीत जाते. तसे पाहता हेही पर्यावरणाच्या दृष्टीने फारसे चांगले नाही. फक्त ‘पीओपी’पेक्षा थोडे कमी हानीकारक आहे, एवढेच.
कला अन् तंत्रज्ञानाची उपयुक्तता मग इतर माध्यमेही उपलब्ध आहेतच की! काही वेगळी मूर्तीही चालेल ना! खरे तर ज्याने सर्वांत आधी गणपतीच्या रूपाची कल्पना केली असेल, त्याला मॉडर्न आर्टचा प्रणेता मानायला हवा. गणपतीचे रुप इतर देवांसारखे नसले, तरी ते एकदम लोभसवाणे आहे. आणि त्या रूपाचे कलाकारांनी किती वेगवेगळे फॉर्म बनवले आहेत. अनेक चित्रकारांनी आपापल्या पद्धतीने बनवलेली बाप्पाची अमूर्त चित्रे आपण पाहात असतो. मग ठराविक वस्तूंपासून, विशिष्ट माध्यमातून बनलेल्या तशाच मूर्तीचा आग्रह का धरावा? अशा अॅब्स्ट्रॅक्ट पद्धतीच्या मूर्तीही आपण तयार करायला हव्यात. त्या कागद, पुठ्ठा अशा वस्तू वापरून आपण घरीही बनवू शकतो. आता थ्री-डी प्रिंटिंगही सहजपणे उपलब्ध आहे. त्याचा वापर करून हव्या तशा प्रकारच्या गणेश मूर्ती पुठ्ठ्याच्या सहाय्याने किंवा एमडीएफमध्ये बनवता येतील. अगदी त्याही पुढं जायचं असेल, तर गणपती बाप्पाची प्रतिमा स्क्रीनवर ठेवून तिचे उत्सवकाळात पूजन करता येईल. यामुळे मूर्ती पाण्यात विसर्जित करण्याचे दु:ख आणि कळत नकळत जलप्रदूषणात भर घातल्याची खंतही वाटत राहणार नाही.
पर्यावरणाच्या हानीकडे दुर्लक्ष नको जो विचार मूर्तीच्या बाबतीत तोच बाप्पाच्या पूजेबाबतची होऊ शकतो. श्रीगणेशाला एकवीस पत्री वाहतात. कोणत्या आहेत त्या पत्री? या काळात उगवणाऱ्या, विविध उपयोग असलेल्या या वनस्पती. आपल्या पूर्वजांनी मोठ्या विचारपूर्वक त्यांची योजना केली असावी. त्यातील बऱ्याच औषधी आहेत. त्यांची आपल्याला माहिती असावी, रानात हिंडून त्या गोळा करता याव्यात, म्हणून कदाचित ही प्रथा रूढ झाली असावी. परंतु, आपण त्याचा विपर्यास केला. गरज आहे म्हणून आपण ती रानावनातून ओरबाडू लागलो. हेच फुलांच्याही बाबतीत घडत आहे. गौरीच्या सजावटीत बऱ्याच वेळा एक खूप सुंदर फुल वापरले जाते. काही भागात ते कळलावी नावाने ओळखले जाते. एखाद्या गर्भवतीच्या प्रसूतिवेदना अडल्यावर किंवा त्या सुरू व्हाव्यात म्हणून याचा उपयोग केला जातो, असे सांगण्यात येते. मात्र, सजावटीसाठी या फुलाची मोठ्या प्रमाणात तोड होते. परिणामी ते अत्यंत दुर्मिळ झाले आहे. शहरांच्या १०-२० मैलांच्या परिघातही कदाचित या फुलांचे झाड आता दिसणार नाही. पत्री-फुले वापरण्याचे प्रमाण मर्यादित होते तोवर अडचण नव्हती. पण, मागणी वाढल्याने या गोष्टी सरसकट खुडण्याचे प्रमाणही वाढले. ती पुजेत वापरली आणि निर्माल्याच्या रुपाने खतासाठी दिली, तर पर्यावरणाची हानी काही प्रमाणात भरुन निघू शकते. पण, उत्सवाच्या काळात गावा-शहरांतील रस्त्यांच्या कडेला पडलेले पत्री-फुलांचे ढीग आपण नजरेआड करतो.
शोध ज्ञान-विज्ञानाधारित पर्यायांचा… गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता. त्याची खरी उपासना करायची, तर काही तरी बुद्धीचं कामही करायला हवं. उत्सवाच्या काळात आरतीच्या निमित्तानं घरोघरी आप्तस्वकीय, मित्र-मैत्रिणी जमतात. अशा वेळी साऱ्यांच्या बुद्धीला, विचारशक्तीला चालना देणारा एखादा कार्यक्रम करायला काय हरकत आहे? गणेशोत्सव वायू, ध्वनि आणि जलप्रदूषणविरहित पद्धतीने कसा साजरा करता येऊ शकेल, यावर विचारमंथन आणि प्रत्यक्ष कृती करण्याची गरज आहे. इंटरनेटवर खूप माहिती उपलब्ध असते. तिची मदत घेऊन पर्यावरण रक्षणाचा, संवर्धनाचा उपक्रम या काळात राबवता येईल. खरे तर राष्ट्रीय, सामाजिक समस्यांवर जनजागृती आणि प्रबोधनाच्या उद्देशानेच घरातील गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरुप देण्यात आले. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातील देशासमोरची, समाजापुढची आव्हाने वेगळी होती. आता स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्षे उलटून गेली असताना आणि या एकविसाव्या शतकात हवामान बदलासारख्या मोठ्या समस्या उभ्या राहिल्या असताना गणेशोत्सवातही या काळानुरुप बदल करण्याची आवश्यकता आहे. पर्यावरणाची हानी असो की अनिष्ट रुढी-परंपरा असोत; समाजाला भेडसावणाऱ्या अशा विविध प्रश्नांवर ज्ञान-विज्ञानाधारित पर्याय शोधण्यासाठी या उत्सवासारखे दुसरे चांगले निमित्त कुठले असेल? चला तर मग, विचारी-विवेकी माणूस बनूया.. पुढच्या पिढ्यांच्या भल्यासाठी सकारात्मक बदल घडवूया! आमोद कारखानीस aamod_k@yahoo.com