
Pahalgam Terror Attack Modi Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आपल्या मासिक ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 121 व्या भागामध्ये देशाला संबोधित केलं. पंतप्रधान मोदींनी यावेळेस पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त करताना, या हल्ल्याने संपूर्ण देश दुखी असल्याचं सांगितलं. दहशतवादी “हल्ल्याचे फोटो पाहून प्रत्येक भारतीयाचा संताप आणि रक्त उसळून येत आहे. हा हल्ला दहशतवाद्यांचा दुबळेपणा दाखवतो. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होत होती. विकास कामांना गती मिळत होती हे दहशतवाद्यांना पाहवलं नाही”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले, आपली सर्वात मोठी ताकद म्हणजे…
“जम्मू-काश्मीरमधील पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ होत होती. या माध्यमातून स्थानिकांच्या कमाईमध्ये वाढ होत होती. मात्र दहशतवाद्यांना हे सारं सहन झालं नाही”, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. “दहशतवादाविरूद्धच्या या लढाईमध्ये 140 कोटी भारतीयांनी एकत्र राहणं ही सर्वात मोठी ताकद आहे. ही आपल्यामधील एकताच आपल्या दहशतवादाविरूद्धच्या लढाईमधील सर्वात मोठा आधार आहे”, असंही मोदींनी म्हटलं आहे.
पीडितांच्या कुटुंबियांना दिलं आश्वासन
दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलताना पंतप्रधानांनी, “आज जग पाहत आहे की संपूर्ण भारत या दहशतवादी हल्ल्याविरोधात एकाच स्वरात आवाज उठवत आहे. भारतामधील लोकांमध्ये जो संताप आहे तोच संपूर्ण जगात आहे. मला अनेक अंतरराष्ट्रीय नेत्यांचे फोन आले. त्यांनी मला विशेष मेसेजही पाठवले. या हल्ल्याचा सर्वांनीच निषेध खेला आहे. सर्वांनीच मयत व्यक्तींच्या कुटुंबांबद्दल सांत्वना व्यक्त केली. संपूर्ण जग या लढाईमध्ये आपल्यासोबत आहे. पीडितांच्या कुटुंबियांना मी विश्वास देऊ इच्छितो की त्यांना नक्कीच न्याय मिळेल. हा कट रचणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाईल,” असं आश्वासन दिलं.
यासाठीच दहशतवाद्यांनी एवढा मोठा कट रचला
दहशतवाद्यांनी पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला करण्याचा कट का रचला याबद्दलही पंतप्रधानांनी भाष्य केलं. “या दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या नागरिकांना पिडितांच्या दुखाचा अंदाज आहे. दहशतवाद्यांच्या हस्तकांना पुन्हा एकदा काश्मीर उद्धवस्त झालेलं पाहायचं आहे. त्यासाठीच त्यांनी एवढा मोठा कट रचला. देशासमोरच्या या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला ठामपणे उभं राहायला हवं”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
‘सचेत’ अॅप्लिकेशनबद्दल केलं भाष्
पंतप्रधान मोदींनी मन की बातमध्ये ‘सचेत’ नावाच्या अॅप्लिकेशनबद्दलही भाष्य केलं. “नैसर्गिक आपत्तींमध्ये तुम्ही अडकून पडू नये यासाठी हे अॅप्लिकेशन भारतीयांना फायद्याचं ठरु शकतं,” असं पंतप्रधानांनी सांगितलं. “हे अॅप्लिकेशन भारताच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनक प्राधिकरणाने विकसित केलं आहे. ‘सचेत’ अॅप्लिकेशनचा हेतू हा लोकांना मदत करण्याचा आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याचा आहे. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून हवामानाचे अपडेट्स मिळवता येतील,” असं मोदींनी भारतीयांना सांगितलं. तसेच हे अॅप्लिकेशन अनेक स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.