
रूमी जाफरी, चित्रपट लेखक-दिग्दर्शक8 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
नायकाच्या भूमिकेतील आपला पहिला सिनेमा ‘वचन’ (1955) मध्ये राजेंद्रकुमार. सोबत सह-नायिका नीलमा. (फोटो साभार : नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया)
मागच्या आठवड्यात मी तुम्हाला काही कलाकारांना सिनेमात कशा रंजक प्रकारे काम मिळाले, त्याचे किस्से सांगितले होते. नंतर आणखी काही किस्से आठवले. त्यामुळे वाटले की ते देखील तुमच्यासोबत शेअर करावे. पहिला किस्सा ज्युबिली स्टार राजेंद्रकुमार यांचा आहे.
आता पाकिस्तानात असलेल्या सियालकोटमध्ये राजेंद्रजींचा जन्म झाला होता. नंतर ते मुंबईला आले आणि पुढे एच. एस. रवैल यांचे असिस्टंट झाले, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यांनी जवळपास पाच वर्षे रवैल साहेबांना पतंगा, सगाई आणि पॉकेटमार या तीन सिनेमांमध्ये सहाय्य केले; पण, त्यांना अभिनयाची आवड होती.
पतंगा आणि जोगनमध्ये त्यांनी छोट्या भूमिकाही केल्या, पण त्यांची इच्छा हिरो बनण्याची होती. त्यानंतर राजेंद्र कुमारजी देवेंद्र गोयल यांचे असिस्टंट बनले. परंतु, शूटिंग दरम्यान ते नेहमी आपले मित्र आणि सहायकांसोबत अभिनयाबद्दलच बोलायचे, चर्चा करायचे. कधी ते दिलीपकुमार यांचे डायलॉग म्हणून दाखवायचे, कधी एखाद्या अभिनेत्याचा अभिनय बघून म्हणायचे की, मला हा डायलॉग म्हणायचा असता, तर मी असा म्हणला असता.
शम्मी अंकलनी (शम्मी कपूर) मला सांगितले की, एके दिवशी गीता बाली देवेंद्र गोयल यांच्या कार्यालयात आल्या. सगळे असिस्टंट बाहेर बसले होते. राजेंद्रकुमार त्यांनी काही डायलॉग एेकवत होते आणि त्यावर सगळे हसत होते. गीता बालींंना पाहून ते शांत बसले. गीताजींनी, ‘काय झालं? काय बोलत होतात?’ असं विचारल्यावर सर्व जण गप्प झाले. गीताजींंनी पुन्हा विचारलं, ‘बोला, बोला.. काय बोलत होतात?’ तेव्हा एक असिस्टंट म्हणाला,“मॅडम, आपला हा राजेंद्र आहे ना, याला हिरो बनायचंय.’ गीता बालींंनी राजेंद्रकुमारांकडं पाहताच घाबरले आणि म्हणाले, “नाही, नाही.. हे लोक थट्टा करताहेत..’ त्यावर गीता बाली म्हणाल्या, ‘तुला हिरो व्हायचंय? ठीक आहे, अाता बनवते.’ एवढं बोलून त्या आत निघून गेल्या. राजेंद्रकुमार आपल्या सहकाऱ्यांवर नाराज झाले. त्यांना म्हणाले, ‘तुमच्यामुळं आज माझी असिस्टंटची नोकरी जाणार.’
थोड्या वेळाने शिपाई बाहेर आला. तो राजेंद्रकुमारांना म्हणाला, ‘तुम्हाला देवेंद्रजींनी बोलावलंय.’ राजेंद्रकुमार मित्रांना म्हणाले, ‘आत जातोय, तुम्ही दुसऱ्या ठिकाणी माझ्यासाठी नोकरी शोधून ठेवा’. ते आत गेले, तर देवेंद्र गोयल यांनी त्यांना गीता बालींसोबत हिरो म्हणून साइन केले. सिनेमाचे नाव होते ‘वचन.’ तो राजेंद्रकुमार यांचा हिरो म्हणून पहिला सिनेमा. त्यांना हा ब्रेक गोयल यांनी गीता बालींंच्या सांगण्यावरून दिला होता.
दुसरा किस्सा मला आठवतोय, जो मला दिग्दर्शक बी. आर. इशारा यांनी सांगितला होता. त्यांनी सांगितले होते.. ‘१९७०-७१ ची गोष्ट आहे. मी अहमदाबादला शूटिंग करत होतो. रस्त्यावर शूटिंग सुरू होते. खूप सारे लोक शूटिंग बघत होते. तेव्हा मला सोळा-सतरा वर्षांची, शाळेचा गणवेश घातलेली एक मुलगी दिसली. तिने खांद्याला स्कूल बॅग अडकावली होती आणि दुसऱ्या हातात स्टाइलमध्ये सिगारेट धरून ओढत होती. मी तिला बघितले आणि बघतच राहिलो. मला खूप आश्चर्य वाटले, कारण तेव्हा आपला देश इतका मॉडर्न नव्हता. तेव्हा मुंबईत एखादी मुलगी सिगारेट ओढताना दिसली, तर समजण्यासारखं होतं. पण, अहमदाबादमध्ये इतक्या लहान वयाची, शाळेचा गणवेश घातलेली मुलगी स्टाइलमध्ये सिगारेट ओढत हाेती. मी तिला पाहिलं आणि बोलावलं. मी नाव विचारल्यावर ती म्हणाली.. परवीन बॉबी. नंतर मला तिच्या कुटुंबियांकडून समजले की ‘बॉबी’ हा अफगाणिस्तानातील एक समुदाय आहे. असो. बी. आर. इशारा साहेबांनी तिला, ‘सिनेमात काम करणार का?’ असं विचारल्यावर तिने होकार दिला. आणि अशाप्रकारे परवीन बॉबींना पहिला सिनेमा मिळाला, ज्याचं नाव होतं “चरित्र’. त्या काळातील प्रसिद्ध क्रिकेटपटू सलीम दुराणी यात त्यांचे नायक होते. दुराणी हेही अफगाणी होते. यावरून मला आजचे प्रसिद्ध शायर ए. एम. तुराज़ यांचा एक शेर आठवतोय…
बरसों इसी ज़मीं पे
रौंदा गया हमें
ऐसे ही नहीं आज
सितारे हुए हैं हम…
तिसरा किस्सा तर आणखी मजेदार आहे. भोपाळमध्ये राहणारा राम ललवाणी नावाचा एक तरूण मुलगा ७० च्या दशकातच मुंबईत अॅक्टिंगचं स्वप्न घेऊन आला होता. एकेदिवशी फूटपाथवरून चालताना त्याने पाहिले की, सिग्नलवर एक गाडी खराब झाली आहे आणि पाठीमागून लोक हॉर्न वाजवताहेत, ओरडताहेत. गाडी चालवणारा त्रासला होता. रस्त्याच्या मध्यात तो एकटा करुन करणार तरी काय? हा प्रकार बघताच राम धावत गेला आणि गाडीला धक्का देत ती रस्त्याच्या कडेला नेली. तेव्हा रामने पाहिले की, गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेली दुसरी व्यक्ती अाणखी कोणी नसून प्रसिद्ध अभिनेता देवेंद्र वर्मा होते. भोपाळपासूनच रामला गाड्यांची खूप आवड होती. त्याने प्रयत्न केला अन् गाडी सुरू झाली. देवेंद्र वर्मांंनी त्याला ‘कुठं जायचंय?’ विचारलं. रामने बांद्रा असं सांगितल्यावर ते म्हणाले, ‘चल, मी सोडतो.’ राम पुढं बसले आणि देवेंद्र वर्मा गाडी चालवू लागले. त्यांंनी त्याला विचारलं, ‘तू कुठला राहणारा आहेस?’ रामने ‘भोपाळ’ असे उत्तर दिले. मग त्यांनी पुन्हा विचारलं, ‘इथं फिरायला आलास का?’ राम म्हणाला, ‘नाही. अॅक्टिंग करायला आलोय.’ त्यावर ते म्हणाले, ‘अच्छा, ठीकय. तू माझ्यासोबत चल..’ आणि ते रामला घेऊन ऑफिसला आले. त्यांनी एक पत्र तयार केले आणि रामला आपल्या चित्रपटासाठी साइन केले. त्या चित्रपटाचे नाव होते ‘बड़ा कबूतर’.
शत्रुघ्न सिन्हांच्या पत्नी पूनम यांच्या जुळ्या बहिणीशी राम ललवाणी यांचे लग्न झाले. अशा प्रकारे ते शत्रुघ्न सिन्हांचे साडू बनले. राम यांच्या भावाचे नाव लोकसेन ललवाणी. ते खूप प्रतिभावान चित्रपट निर्माते होते. त्यांनी शत्रुघ्न सिन्हा निर्माते असलेल्या “कालका’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. राम आणि लोकसेन ललवाणी हे दोघेही आता या जगात नाहीत. पण, त्यांचे किस्से, त्यांच्या गोष्टी इंडस्ट्रीत अजरामर आहेत. या किश्श्यांसोबत राजेंद्रकुमार यांच्या ‘झुक गया आसमान’मधील हे गाणं ऐका…
कौन है जो सपनो में आया,
कौन है जो दिल में समाया,
लो झुक गया आसमान भी,
इश्क़ मेरा रंग लाया।
स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.