माझ्या हिश्श्याचे किस्से: ज्या रिक्षावाल्याने नाट्यसंस्थेचा पत्ता दिला होता, त्याला आपल्या कार्यक्रमात राजपाल यांनी आवर्जून बोलावले

0
18
माझ्या हिश्श्याचे किस्से:  ज्या रिक्षावाल्याने नाट्यसंस्थेचा पत्ता दिला होता, त्याला आपल्या कार्यक्रमात राजपाल यांनी आवर्जून बोलावले


रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक1 तासापूर्वी

  • कॉपी लिंक

‘मुझसे शादी करोगी’च्या एका दृश्यात अक्षयकुमार समवेत राजपाल यादव.

माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये आज राजपाल यादव यांच्याविषयी… राजपाल हे चांगले नाट्यअभिनेते आहेत, ‘एनएसडी’मध्ये शिकले आहेत, हे तर सगळ्यांना माहीतच आहे. पण, मला तुम्हाला सांगायला आवडेल की, मी त्यांच्यासोबत अनेक चित्रपट केले आहेत आणि ते माझ्या सर्वांत आवडत्या अभिनेत्यापैकी एक आहेत. पण, आज तो किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे, तो‘मुझसे शादी करोगी’ या माझ्या चित्रपटाशी संबंधित आहे.

या चित्रपटाची पटकथा तयार झाली, कलाकारांची निवडही जवळपास पूर्ण झाली होती. तेव्हा एक दिवशी मला चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियादवालांचा फोन आला की, राजपाल यादव मला खूप आवडतात, त्यांच्यासाठी पटकथेत एखादी व्यक्तिरेखा ठेव. मी म्हणालो, ठीक आहे; विचार करतो. अक्षयकुमार, सलमान खान, प्रियंका चोप्रा यांना तर साइन करण्यात आले होते. शिवाय, चरित्र भूमिकांसाठी अमरिश पुरी, कादर खान, शशिकला, राजेश विवेक, सतीश शाह, बिंदु दारासिंह अशा अभिनेत्यांचीही निवड झाली होती. मग आता राजपाल यांना कोणती भूमिका देऊ? राजपाल यांच्यासोबत मी आधी ‘हम किसी से कम नहीं’ आणि ‘तुमको न भूल पाएंगे’ हे चित्रपट केले होते, त्यामुळे त्यांना चांगले ओळखतही होतो, त्यांची क्षमता जाणून होतो.

मग इतक्या दमदार कलाकाराला कोणती भूमिका द्यावी, या विचारात मी पडलो. एके दिवशी मला राजपाल यांचा फोन आला. ते म्हणाले, रूमी भाई, मी इतक्यात साजिद भाईंच्या ऑफिसमधून निघालोय. त्यांनी सांगितलंय की, या चित्रपटात सलमान आणि अक्षयच्या खालोखाल माझी भूमिका सर्वांत चांगली आहे, त्यामुळे मी त्यांना होकार दिलाय. मी विचारले, ‘काय भूमिका आहे?’ तर राजपाल म्हणाले, ‘साजिद भाईंनी सांगितलंय की, रूमीशी बोल आणि त्यांच्याकडे जाऊन भूमिका समजून घे. मी तुम्हाला कधी भेटायला येऊ, ते सांगा.’ मी म्हणालो, एक – दोन दिवस मी बिझी आहे, मी तुम्हाला फोन करुन सांगतो. मी फोन ठेवला आणि साजिदभाईंना कॉल करुन विचारलं, ‘राजपाल यांचा फोन आला होता. तुम्ही त्यांना काय सांगितलंंय? ते खूप उतावी‌ळ झालेत. अक्षय आणि सलमानच्या खालोखाल सगळ्यात चांगली व्यक्तिरेखा तुमची आहे, असे साजिदभाईंनी सांगितल्याचं म्हणताहेत..’ साजिद भाई म्हणाले, हो. आता हे कसं करायचं, ते तू बघ. मी पुन्हा म्हणालो, ‘पण, साजिद भाई, अशी कुठलीही भूमिका नाही. ज्योतिषाचं एक पात्र आहे, पण तो घर वगैरे मिळवून देतो, यापेक्षा वेगळे काही नाही. साजिदभाई म्हणाले, ते मला माहीत नाही. मी त्यांना फायनल केलंय, तारखाही घेतल्यात. मला तो चित्रपटात पाहिजे, बस! आता बाकीचं तू बघून घे..

मी हैराण झालो. दोन- तीन दिवसांनी राजपाल यांचा पुन्हा फोन आला. म्हणाले, ‘भाई, काय सांगू, मी किती एक्साइट झालोय. तुम्ही मला भूमिका काय आहे ते लवकर सांगा, म्हणजे मला त्यावर काम करता येईल..’ मी पुन्हा कामात बिझी असल्याचं सांगितलं. मग पटकथा घेऊन बसलो आणि काय करायचं, याचा विचार करु लागलो. ज्योतिषाची भूमिका आणखी चांगली कशी करावी? राजपाल यांचा पुन्हा फोन आला की, आता शूटिंग तोंडावर आलंय, कपडे वगैरे बनवावे लागतील. माझी भूमिका सांगा, कारण आता मी आउटडोअरला निघालोय. मग थेट शूटिंगच्या वेळीच येईन. शेवटी मी त्यांना म्हणालो, ‘ठीक आहे. उद्या सकाळी या.’

मी पुन्हा विचारात पडलो की, ज्योतिषाच्या पात्राला आणखी चांगलं कसं बनवायचं? मी त्यात भर घातली, पण तरीही मला वाटत होते की राजपाल यांच्या अभिनयाला ते न्याय देऊ शकणार नाही. रात्री अचानक माझ्या डोक्यात विचार आला.. हे पात्र डबल रोल का बनवू नये? कथेत एक ईगल गँग आहे, ज्यामध्ये बिंदू दारासिंह आहेत. राजपाल यांना त्या गँगचाच म्होरक्या का बनवू नये? गोव्यात दोन जुळे भाऊ आहेत.. एक सज्जन पंडित ज्योतिषी आहे, तर दुसरा गुंड. डेव्हिड साहेब लवकर झोपायचे, त्यामुळे मी साजिदभाईंना फोन केला. म्हणालो की, मी राजपाल यांचा डबल रोल करतोय.. एक पंडित आणि एक ईगल गँगचा बॉस. दोन्ही भावांपैकी एक त्या शहरात नाव कमावतोय, दुसरा ते खराब करतोय. साजिदनी होकार देताच मी रात्रीच हे पात्र फायनल केले. दुसऱ्या दिवशी सकाळी राजपाल येताच मी त्यांना म्हणालो, ‘मी आताच सगळा तपशील सांगूू शकत नाही. पण, या कथेत तुम्हाला जुळ्या भावांचा डबल रोल आहे. त्यातील एक ज्योतिषी आहे, जो सलमान खानला मदत करतोय, दुसरा गोव्यातील खतरनाक ईगल गँगचा बॉस आहे, जो खूप हिंसा करत असतो. आणि त्यामुळे दोन्ही भावांमध्ये खूप वाद आहे. हे ऐकनू राजपाल यांनी मला मिठीच मारली. अशाप्रकारे ‘मुझसे शादी करोगी’चे ते पात्र तयार झाले. त्यावरुन मला एका गोष्टीची जाणीव झाली. ती म्हणजे, एखादा गुणी अभिनेता चित्रपटात आला की त्याला समोर ठेवल्यानेही चांगली व्यक्तिरेखा आकाराला येऊ शकते आणि ती चांगली होतेही. एक चांगला कलाकार तितक्याच चांगल्या भूमिकेला आणखी कसा उत्तम बनवू शकतो, याचे उदाहरण म्हणजे ‘मुझसे शादी करोगी’तील राजपालची भूमिका. त्यांच्या याच कलाकारीवरून मला इरुम ज़ेहरा यांचा एक शेर आठवतोय…

मुसव्विर ने तो सारी

दिलकशी तस्वीर में भर दी,

रहेगा फ़न सलामत जब तलक

फ़नकार ज़िंदा है।

खासगी आयुष्यात राजपाल अत्यंत संस्कारी, नाते जपणारा, मोठ्यांचा आदर ठेवणारा असा साधा माणूस आहे. मला आठवतंय की राजपाल यांनी ‘अता पता लापता’ नावाचा एक चित्रपट बनवला होता. त्याचे म्युझिक रिलीज करण्याच्या कार्यक्रमाला मला आणि अमिताभ बच्चन यांना बोलावले होते. लहानपणापासून मुंबईपर्यंत आपल्याला घडवणारे जेवढे ‘गुरू’ होते, त्या सगळ्यांना राजपालनी आमंत्रित केले होते. त्यात माझेही नाव घेतले गेलेे, तेव्हा मी खूप भावूक झालो.

लहानपणी राजपाल यांच्या गल्लीत एक रिक्षावाला होता. त्याने राजपाल यांची अभिनयाची आवड पाहून नाटक बसवणाऱ्या एका संस्थेत आपल्या रिक्षातून नेले आणि त्या संस्थेची ओळख करुन दिली. राजपाल दहावीत, म्हणजे पंधरा वर्षांचे असताना ज्या रिक्षावाल्याने त्यांनी ही संस्था दाखवली, त्यांनाही या कार्यक्रमाला बोलावले होते. त्याशिवाय, आपल्या पहिल्या नाटकाच्या दिग्दर्शकालाही बोलावले होते. ज्यांनी राजपालना पहिल्यांदा.. ‘स्टार्ट.. साउंड.. अॅक्शन’ म्हटले होते, त्या ‘स्वराज’ या टीव्ही मालिकेचे दिग्दर्शक दयाल निहलानी यांनाही बोलावले होते. ज्यांनी राजपालना पहिल्यांदा मोठी भूमिका दिली, त्या चंदन अरोरांनाही आमंत्रित केले होते. ‘एनएसडी’मध्ये त्यांची निवड करणाऱ्या रामगोपाल बजाज यांनाही बोलावले होते. ‘हॅम्लेट’मध्ये भूमिका देणाऱ्या जुगल किशोर यांनाही राजपालनी बोलावून आणले होते. या सगळ्यांना राजपाल यांनी विमानाचे तिकीट दिले, चांगल्या हॉटेलात त्यांची व्यवस्था केली. कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांच्या हस्ते या सगळ्यांना सुवर्णपदक देण्यात आले. राजपाल यांच्या मनात आपल्या गुरूंविषयी किती आदर आहे, हे मला या प्रसंगावरुन दिसले. गुरूंना त्यांनी इतका मान दिला, त्यांचा आशीर्वाद घेतला. वास्तविक, त्या चित्रपटात राजपाल यांचे कोट्यवधी रुपये बुडाले. पण, त्यांनी हे जे आशीर्वाद मिळवले, त्यामुळे माझ्या नजरेत त्यांच्याविषयी वाढलेला आदर खरेच अनमोल आहे. या गोष्टीवरून राजपाल यांच्या ‘अता पता लापता’मधील हे गाणे ऐका…

ये ज़मीन बिक चुकी,

आसमान बिक चुका,

अब हवा धुप

पानी खरीदेंगे हम…

आपली काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link