माझ्या हिश्शाचे किस्से: मोहम्मद रफींना ‘देवदूत’ म्हटले जायचे..!

0
2
माझ्या हिश्शाचे किस्से:  मोहम्मद रफींना ‘देवदूत’ म्हटले जायचे..!


रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक8 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

२४ डिसेंबरला मोहम्मद रफी यांची शंभरावी जयंती होती. त्यांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ ला पंजाब प्रांतातील कोटला सुलतानसिंहमध्ये झाला होता. 

ज्यांना सुरांचे बादशहा आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील देवदूत म्हटले जायचे, त्या मोहम्मद रफी साहेबांची २४ डिसेंबरला शंभरावी जयंती होती. त्यामुळे या भागात त्यांच्याविषयी लिहावे, असा विचार मनात आला. लिहायला बसलो, तेव्हा लक्ष्मीकांतजी, धर्मेंद्रजी, सचिन पिळगांवकरजी, सुभाष घईजी, अमिताभ बच्चनजी, उदित नारायणजी अशा या इंडस्ट्रीतील अनेकांनी त्यांच्याबद्दल सांगितलेल्या गोष्टींनी माझ्या मनात फेर धरला.

प्रत्येक जण रफी साहेबांचा चाहता होता. जो त्यांना भेटला तो आणि जो नाही भेटला तोसुद्धा. लोकांना ते प्रचंड आवडायचे, जणू ते त्यांच्या आवाजाच्या प्रेमात पडले होते. त्या काळातील सगळे निर्माते-दिग्दर्शक आणि अभिनेते रफी साहेब गेल्यावरही त्यांचाच शोध घेत राहिले.

त्याच शोधातून अनेक गायक पुढे आले. मला एकदा धरमजींनी सांगितले होते- जाने क्या ढूंढ़ती रहती है ये आँखें मुझमें.. हे माझे पहिले गाणे रफी साहेबांनी गायले होते. त्यांची खासियत म्हणजे, त्या त्या अभिनेत्याचा आवाज, संवादफेक, बोलण्याची पद्धत, देहबोली, चेहऱ्यावरचे हावभाव समजून घेत ते गायचे. त्यामुळे तो अभिनेताच गाणे गातोय असे वाटायचे. ते आपल्या आवाजांतून जे भाव व्यक्त करायचे, त्यामुळे त्या अभिनेत्याला हावभावांवर फार कष्ट घ्यावे लागायचे नाहीत.

धरमजींनी सनीला लाँच करण्यासाठी ‘बेताब’ची सुरूवात केली. त्यावेळी रफी साहेबांच्या आवाजाचा शोध घेता घेता त्यांना शब्बीरकुमार भेटले. त्यांना ब्रेक मिळाला. पुढे मोहम्मद अजीज यांचा शोध लागला. त्यांच्याकडूनही गाणी गाऊन घेतली गेली. धरमजींनी ‘बरसात’ सिनेमातून बॉबी देओलला लाँच केले. तेव्हा माझा ‘आजमाइश’ हा सिनेमा बनत होता. त्यातील गाणी सोनू निगमने गायली होती.

धरमजींनी मग ‘बरसात’मध्ये सोनू निगमकडूनच रफी साहेबांसारखी गाणी गाऊन घेतली. त्यानंतर त्यांनी ‘यमला पगला दीवाना’ बनवताना..‘मैं जट यमला पगला दीवाना..’ हे मूळचे रफी साहेबांच्या आवाजातील गाणे री-रेकॉर्ड केले. सोनू निगमचा आवाज रफी साहेबांसारखाच असल्याने त्याच्याकडूनच ते गाऊन घेतले. हे गाणेही सुपरहिट झाले.

मला सुभाष घईजींनी सांगितले- मी एखादे गाणे बनवताना रफी साहेबांचाच शोध घेत असतो. रफी साहेबांसारखाच आवाज, तशीच एक्स्प्रेशन्स यावीत, असा विचार करतो. ‘कर्मा’चा टायटल ट्रॅक बनवताना विचार केला की, रफी साहेब असते तर त्यांनी तो कसा गायला असता? मग मी ते गाणे मोहम्मद अजीज यांच्याकडून गाऊन घेतले. ‘विधाता’मध्ये दिलीपकुमार आणि शम्मी कपूर यांचे एक गाणे होते.. ‘हांथो की चंद लकीरों का..’ ते मी सुरेश वाडकर आणि अन्वर यांच्याकडून गाऊन घेतले, कारण अन्वर यांचा आवाजही रफी साहेबांशी मिळताजुळता होता.

मग ‘परदेस’, ‘ताल’मध्ये सोनू निगमकडून गाणी गाऊन घेतली. रेकॉर्डिंगच्या आधी मी प्रत्येक गायकाला सांगायचो की, डोळे बंद करुन हाच विचार करा, हे गाणे रफी साहेबांनी कसे गायले असते? या सगळ्या गायकांनी माझी गाणी खूप चांगली गायली आणि ती हिट झाली.

यावरुन मला शम्मी कपूरजींचा किस्सा आठवला. ते प्रत्येक गाण्याच्या रेकॉर्डिंगवेळी रफी साहेबांच्या सोबत असायचे आणि या गाण्यात आपण काय करणार आहोत, ते त्यांना सांगायचे. एकदा शम्मीजींनी त्यांना सांगितले की, या गाण्याचा मुखडा – अंतरा एकाच दमात गायलात तर आणखी चांगलं होईल. रफी साहेब म्हणाले, ‘ठीक आहे, प्रयत्न करतो’. आणि मग त्यांनी एका श्वासात मुखडा – अंतरा गाऊन ते गाणे पूर्ण केले. ‘ब्रह्मचारी’ सिनेमातील हे गाणे होते.. ‘दिल के झरोखों में तुझको बिठाकर, यादों को तेरी मैं दुल्हन बनाकर..’ या गोष्टीवरुन मला आसी उल्दनी यांचा एक शेर आठवतोय…

सब्र पर दिल को तो

आमादा किया है लेकिन,

होश उड़ जाते हैं अब भी

तिरी आवाज़ के साथ।

जसे रफी साहेब हे शम्मीजींचा आवाज होते, तसे मुकेश हे राज कपूर साहेबांचा आवाज होते. वास्तविक रफी साहेबांनी ‘बरसात’मध्ये राज साहेबांसाठी.. ‘मैं ज़िन्दगी में हर दम रोता ही रहा हूँ..’ हे सुपरहिट गाणे गायले होते. पण, राज साहेब म्हणायचे, माझ्या आवाजाला आणि चेहऱ्याला मुकेश यांचाच आवाज सूट होतो. पुढे ‘संगम’ सिनेमाची तयारी सुरू झाली.

राजेंद्रकुमारांचे आवडते गायक रफी साहेब होते. राज साहेबांनी सांगितले की, माझ्या आणि राजेंद्रकुमार यांच्या पार्श्वगायनाचा आवाज वेगवेगळाच हवा. मग रफी साहेबांना बोलावले. त्यांनी गाणे गायले.. ‘मेरा प्रेम पत्र पढ़कर तुम नाराज़ ना होना..’ या गाण्याचे रेकॉर्डिंग संपले. प्रॉडक्शनचा एक जण रफी साहेबांकडे आला आणि नोटांनी भरलेले एक पाकीट त्यांना दिले. रफी साहेबांनी विचारले, ‘राज साहेब कुठे आहेत?’ तेव्हा त्याने सांगितले की, त्यांच्या मुलाला ताप आलाय. त्याला बरे वाटत नाहीय, म्हणून घरी गेले आहेत. रफी साहेब कारमध्ये बसले आणि थेट राज साहेबांच्या बंगल्यावर पोहोचले.

राज साहेब, कृष्णाजींना आश्चर्य वाटले की रफी साहेब असे अचानक घरी कसे आले? रफी साहेब म्हणाले, ‘तुमचा मुलगा राजीव तापाने आजारी असल्याचे समजले. त्याला बघायला आलोय.’ त्यावेळी राजीव दीड-दोन वर्षांचे होते. रफी साहेब त्या खोलीत गेले. राजीवना पाहिले. आपल्या खिशातून नोटांचे ते पाकीट काढले आणि राजीवच्या उशीखाली ठेऊन दिले. ते पाहून राज साहेबांनी, ‘रफी साहेब, हे काय करताय?’ असे विचारले. रफी साहेब म्हणाले, ‘हा उतारा आहे, राजीव बरा व्हावा म्हणून.. ईश्वराने त्याला चांगले आरोग्य द्यावे..’ असे देवदूत होते रफी साहेब. आज त्यांच्या आठवणीत ‘कश्मीर की कली’चे हे गाणे ऐका…

तारीफ करूँ क्या उसकी,

जिसने तुम्हे बनाया…

स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link