
उत्तर प्रदेशातील सितापूर येथे बापाने पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 40 वर्षीय पित्याने आपल्या 5 वर्षांच्या चिमुरडीची गळा दाबून हत्या केली आणि नंतर तिच्या मृतदेहाचे चार तुकडे केले. पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे मुलगी शेजाऱ्याच्या घऱी गेल्याच्या क्षुल्लक कारणावरुन ही हत्या करण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोपीचं आणि शेजाऱ्याचं भांडण झालं होतं, आणि यामुळेच त्याला मुलगी त्याच्या घऱी गेल्याचं आवडलं नव्हतं. मोहित मिश्रा असं आरोपीचं नाव आहे.
25 फेब्रुवारीला मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मोहित मिश्रा यानेच ही तक्रार दाखल केली होती. “आम्ही गुन्हा दाखल केला आणि तिचा शोध घेण्यासाठी चार पथकं तयार केली. शोध सुरु केला असता आम्हाला एक मृतदेहाचा एक भाग सापडला. दुसऱ्या दिवशी, आणखी काही भाग सापडले, ज्यावरून तिची हत्या झाल्याची पुष्टी झाली,” असं अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रवीण रंजन सिंह यांनी सांगितलं.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, आम्ही लोकांची चौकशी करत असतानाच तिचे वडील अचानक गायब झाले. “तिच्या वडिलांनी फोन आईकडे दिला आणि अचानक गायब झाले. जेव्हा तो गायब झाला तेव्हा आम्ही कुटुंबातील सदस्यांना मुलगी बेपत्ता होण्याआधी नेमकं काय घडलं याबद्दल विचारलं. जेव्हा तो पुन्हा परत आला तेव्हा आमी त्याच्याकडे चौकशी केली. यावेळी त्याने आपण मुलीची हत्या करुन मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली दिली,” असं पोलिसांनी सांगितलं आहे.
आरोपीने पोलिसांना सांगितलं की, कुटुंबाचे एकेकाळी शेजारी राहणारे रामू यांच्या कुटुंबाशी चांगले संबंध होते. ते नेहमी एकमेकांच्या घरी ये जा करत असत. “काही दिवसांपूर्वी दोन्ही कुटुंबात भांडण झालं आणि त्यांनी एकमेकांना भेटणं बंद केलं. मोहितने आपल्या मुलीला अनेकदा रामूच्या घरी जाऊ नकोस असं सांगितलं होतं. पण तरीही ती खेळण्यासाठी त्यांच्या घरी जात होती,” असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
मोहितने पोलिसांना सांगितलं की, घटनेच्या दिवशीही त्याने मुलीला रामूच्या घरुन येताना पाहिलं ज्यामुळे त्याचा संताप झाला. “संतापाच्या भरात त्याने मुलीला बाईकवरुन निर्जनस्थळी नेलं. तिथे त्याने तिच्याच कपड्यांनी तिचा गळा आवळळा. यानंतर मृतदेह शेतात फेकून दिला,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी जववळपास 100 जणांची चौकशी केली.