
आदूबाळ5 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
शेहान करुणतिलका
आजूबाजूची परिस्थिती उदास करणारी, भीतीदायक असते तेव्हा लेखक त्याला कसा सामोरा जातो, हा रोचक विषय आहे. कल्पनेच्या जगात रमणं फक्त मनोरंजनासाठी नसतं. कधीकधी आजूबाजूच्या वास्तवापासून सुटका मिळवायला कल्पनेच्या जगात हरवून जाणं बरं पडतं. पण, गॅब्रिएल गार्सिया मार्केजसारखे लेखक जादुई वास्तववादाचा आधार घेतात. सलमान रश्दींसारखे लोक इतिहास, परंपरा आणि वास्तव याची सांगड घालत लेखनाला वेगळ्या उंचीवर देऊन ठेवतात. या परंपरेचा पाईक म्हणावा असा लेखक सध्या इंग्रजी साहित्यविश्वात गाजतो आहे. शेहान करुणतिलका त्यांचं नाव. शेहान हे श्रीलंकी लेखक आहेत. त्यांनी न्यूझीलंडमध्ये उच्च शिक्षण घेतलं आणि जाहिरातक्षेत्रात काम केलं. श्रीलंकी समाज आणि गेल्या तीन दशकांत त्या देशाने पाहिलेले दुर्दैवाचे दशावतार हा त्यांचा चिंतनाचा विषय होता. “श्रीलंका हा वाया गेलेल्या क्षमतांचा आणि गमावलेल्या संधींचा देश आहे,” असं ते एका मुलाखतीत म्हणतात. आपल्या देशावर असलेल्या प्रेमामुळेच त्यांना असं चरचरीत विधान करावंसं वाटलं. सीएलआर जेम्स या लेखकाने ‘बियाँड द बाउंड्रीज’ या कादंबरीत क्रिकेटच्या माध्यमातून वेस्ट इंडियन जीवनावर प्रकाशझोत टाकला होता. या कादंबरीतून जेम्स राजकीय परिस्थितीवर भाष्य करतो. याच धर्तीवरची शेहान यांची पहिली कादंबरी ‘चायनामन : द लिजेंड ऑफ प्रदीप मॅथ्यू’ २०१० मध्ये प्रकाशित झाली. समीक्षकांनी आणि सामान्य वाचकांनी या कादंबरीचं भरभरून कौतुक केलं. विस्डेनने या कादंबरीला ‘सर्वोत्कृष्ट क्रिकेट कादंबरी’ स्पर्धेत दुसरा क्रमांक देऊन गौरवलं आहे. “क्रिकेटमध्ये नाट्य तर असतंच, पण या खेळाचा वापर राजकीय भाष्य करायला आणि प्रसंगी तत्त्वचिंतन करायलाही करता येतो,” असं शेहान म्हणतात. श्रीलंकेचा गेल्या तीन दशकांतील इतिहास सिंहली-तमिळ वांशिक संघर्षाने व्यापला आहे. कोणताही वांशिक (किंवा धार्मिक वा जातीय) संघर्ष विविध ठिकाणी दिसत राहतो. द्वेषाच्या लढाया अनेक पातळ्यांवर खेळल्या जातात. विशेषतः सत्ता आणि पैसा या गोष्टी एकत्र आल्या की, संघर्षाच्या आगीत तेल पडतं. याला क्रिकेटही अपवाद नाही. वर्णद्वेषाची पार्श्वभूमी बाजूला ठेवून श्रीलंकी क्रिकेटवर लिहिणं ही आत्मवंचना ठरली असती, पण अशा लेखनाने वाद झाले नसते. शेहान यांनी हा मोह टाळला आहे. दारूच्या आहारी गेलेल्या एका पत्रकाराने विस्मृतीत गेलेल्या एका प्रतिभाशाली गोलंदाजाचा घेतलेला शोध हे ‘चायनामन’चं ढोबळ कथासूत्र आहे. पार्श्वभूमीला भ्रष्टाचाराने बरबटलेलं निसर्गरम्य पण दरिद्री श्रीलंका बेट आहे. ही कहाणी क्रिकेटची किंवा पत्रकाराची न राहाता श्रीलंकेची बनत जाते. शेहानची दुसरी कादंबरी ‘द सेव्हन मून्स ऑफ माली आल्मेडा’ २०२२ मध्ये प्रकाशित झाली आणि मॅन बुकर पुरस्कारासाठी निवडली गेली. बुकरच्या परीक्षकांनी, ‘श्रीलंकेतील गृहयुद्धाच्या व्यापक अतिवास्तव पटावर काढलेली ऊर्जेने सळसळणारी प्रतिमासमृद्ध कादंबरी” अशा शब्दांत तिचं कौतुक केलं. ही कादंबरी १९८० च्या दशकात श्रीलंकेमध्ये घडते. या काळात तमिळ वाघ (लिट्टे), श्रीलंकेचं लष्कर, भारतीय शांतिसेना, कम्युनिस्ट विचारसरणीचे ‘जेव्हीपी’ दहशतवादी आणि सरकारपुरस्कृत पण घटनाबाह्य मृत्यू पथके हे सगळे घटक एकमेकांना नेस्तनाबूत करायला सरसावले होते. शेहानच्या मते, कर्फ्यू, बॉम्बस्फोट, अपहरणे आणि सार्वत्रिक हिंसाचाराचा हा काळ भुतांची गोष्ट, तपास कथा किंवा हेरकथा लिहिण्यासाठी उत्तम होता. त्यांनी आपल्या कादंबरीत तिन्ही प्रकार एकदम हाताळले. “बॉम्बची एक गोष्ट आपल्याला आवडते – त्याला कसलाच फरक पडत नाही. वर्ण, वर्ग, लिंग – सगळे त्यासमोर सारखेच!” असली वाक्यं बोलत माली आल्मेडा कादंबरीची ते सुरूवात करतात. या कादंबरीतील मृत छायाचित्रकार मृत्यूनंतर स्वतःच्या मरणाचं गूढ उकलण्यासाठी निघालेला असतो. “मृत्यूनंतरचं जीवन टॅक्स ऑफिससारखं असतं. प्रत्येकाला आपला रिफंड वाजवून घ्यायचा असतो!” माली म्हणतो. त्याच्याकडे सात रात्री आहेत. माली श्रीलंकेतील हिंसेचा साक्षीदार आहे. ‘सरकारं पाडणारे, युद्ध थांबवणारे’ फोटो काढणं ही छायाचित्र-पत्रकार म्हणून त्याची महत्त्वाकांक्षा असते. त्याने बरेच सनसनाटी फोटो काढलेले आहेत. उदा. तमिळ निर्वासितांची घरं जाळत असताना निवांत उभा असलेला मंत्री. बेपत्ता पत्रकारांचे आणि गायब झालेल्या कार्यकर्त्यांचे मुसक्या बांधलेले, गळा आवळलेले आणि कोठडीत मृत झालेले फोटो. हे फोटो मृत माली कोलंबोपर्यंत पोहोचवू शकला, तर युद्ध थांबेल, अशी आशा त्याला आहे. मग पुढं काय होतं, हे कादंबरीतच वाचणं योग्य राहील. या लेखमालेत ओळख झालेल्या अनेक लेखकांना (कर्ट वॉनेगट, नील गेमन, डग्लस अॅडम्स) शेहान आपली प्रेरणा मानतात. वास्तवावर नेमकं बोट ठेवणाऱ्या या लेखकांची गाडी शेहान समर्थपणे पुढं नेत आहेत.
aadubaal@gmail.com






