देश – परदेश: सोनेरी स्वप्नांची काळी किनार…

0
2
देश – परदेश:  सोनेरी स्वप्नांची काळी किनार…


ज्ञानेश्वर मुळे6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

कुठल्या ना कुठल्या मार्गे विदेशात गेलेले भारतीय लोक तिथे कसे अडचणीत सापडू शकतात याची अनेक उदाहरणे समोर येत असली तरी काही अंशी हा लोकांच्या निष्काळजीपणाचा आणि व्यवस्थेच्या अकार्यक्षमतेचा परिणाम आहे. पण विदेशात, विशेषत: अमेरिकेत अवैधपणे प्रवेश करू पाहणाऱ्या भारतीयांची आकडेवारी अधिक चिंताजनक आहे. आणि गेल्या चार वर्षांत ती झपाट्याने वाढते आहे.

शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात जाणाऱ्या भारतीयांच्या समस्यांचा वेध या सदराच्या दोन भागातून आपण घेत आहोत. विदेशातील सोनेरी स्वप्नांच्या मागे लागलेल्या भारतीयांना त्या रस्त्यावरील काट्याकुट्यांची अनेकदा कल्पना नसते. आणि अनेकदा अशा शोकांतिका वाचून किंवा त्याबाबत ऐकूनही आपण अशा संकटात अडकणार नाही अशा विचाराने बहुतेक लोक कोणती काळजी घ्यावी याचा फारसा विचार करत नाहीत. त्या संदर्भात मागच्या काही दिवसांतील तीन उदाहरणे पाहू.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील बाल्टिमोरमध्ये ‘डाली’ नावाचे मालवाहू जहाज तिथल्या प्रमुख पुलाला धडकले आणि पूलच कोसळला. भारतासाठी ही बातमी एरवी फारशी महत्त्वाची ठरली नसती. पण, या दुर्दैवी अपघाताला काही दिवस लोटले असूनही जहाजावरील २२ भारतीय खलाशांची मात्र सुटका झालेली नाही. आता कुठे विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी या अपघाताची चौकशी सुरू केली आहे. हे २२ भारतीय जहाजातून कधी सुटतील आणि सुटले तरी भारतात कधी परत येऊ शकतील, याबाबत सध्या तरी अंदाज वर्तवणे शक्य नाही. दुसरे उदाहरण रशियातील. युक्रेनबरोबरच्या युद्धात आतापर्यंत दोन भारतीयांचा मृत्यू झाला आहे. भारतीयांचा या युद्धाशी संबंधच नाही, तर आपले नागरिक तिथे कसे मारले गेले?

नोकरीच्या आणि कायमस्वरूपी विदेशात राहण्याच्या स्वप्नाचा पाठलाग करणाऱ्या साधारण तीन डझन भारतीयांना मानवी तस्करांनी रशियन सैन्यासाठी मदतनीस किंवा डिलिव्हरी बॉय म्हणून नोकरी देण्याची हमी देऊन रशियाला नेले. त्यांना रशियन सैन्याचे ओळखपत्र आणि कायमचा अधिवास देण्याचे आमीषही दाखवण्यात आले होते. आता सीबीआय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. पण, बाकीचे भारतीय केव्हा परत येतील आणि खरेच परत येतील का, हे सांगणे कठीण आहे.

तिसरे उदाहरण आणखी भयावह आहे. आपल्याला अमेरिका आणि रशिया हे दोन्ही देश बऱ्यापैकी माहीत आहेत. पण कंबोडिया? आपण फक्त या देशाचे नाव ऐकलेले असते. तर या कंबोडियातून बालाजी नामक भारतीयाचा मला पुढीलप्रमाणे संदेश आला.. ‘मी विशाखापट्टणम आंध्र प्रदेशचा बालाजी. माझ्या श्रीकाकुलमच्या मित्राबरोबर एका एजंटामार्फत ‘वर्क व्हिसा’ घेऊन ‘कॉल सेंटर’च्या नोकरीच्या आश्वासनावर कंबोडियाला आलो. आम्हाला क्लाएंट्सचे फोन येतील, त्यांच्या समस्या सोडवणे आणि मार्गदर्शन करण्याचे काम असेल, असे सांगितले गेले. इथे कंबोडियात आल्यानंतर व्यापाराच्या नावाखाली एका फसवाफसवी करणाऱ्या कंपनीत सोडले. आम्हाला प्रत्येकी १०० मोबाइल सेट दिले. त्यावरून भारतीय ग्राहकांना फोन करायचा, त्यांना डिमॅट अकाउंट उघडून पैसे पाठवायला सांगायचे, एकदा पैसे आले की त्यांचे अकाउंट ब्लॉक करायचे आणि पैसे कंपनीकडे वळते करायचे, असे कामाचे स्वरूप होते. आम्ही हे काम करायला नकार दिला. त्यांनी आमचे पासपोर्ट काढून घेतले आणि १० दिवस अन्नपाण्यावाचून एका खोलीत बंद करुन टाकले. या परिस्थितीतून आम्हाला बाहेर काढा.’ त्यांनी मला स्वत:च्या पासपोर्टची कॉपी, एजंटचा नंबर वगैरे माहिती पाठवली.

त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी जे वृत्तपत्रात वाचले, ते तर अंगावर काटा उभे करणारे होते. जवळपास पाचशे भारतीयांना कंबोडियात बंधक बनवले असून त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत सुमारे पाचशे कोटींचा अपहार घडलेला असावा अशा आशयाची बातमी होती. दोन्ही देशांची सरकारे ही समस्या सोडवण्यासाठी संपर्कात आहेत आणि आतापर्यंत अडीचशे भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. अशा प्रकारे ‘सायबर गुलामी’चे अनेक प्रकार जगभर घडत असतील आणि भारतीयांची त्यासाठी तस्करी होत असणे शक्य आहे.

ही तीन उदाहरणे विदेशात भारतीय लोक कशा प्रकारे अडचणीत सापडू शकतात, हे सांगणारी असली तरी काही अंशी हा लोकांच्या निष्काळजीपणाचा आणि व्यवस्थेच्या अकार्यक्षमतेचा परिणाम आहे. पण; विदेशात, विशेषत: अमेरिकेत अवैधपणे प्रवेश करु पाहणाऱ्या भारतीयांची आकडेवारी यापेक्षाही चिंताजनक आहे. गेल्या चार वर्षांत ही आकडेवारी झपाट्याने वाढते आहे. २००८ च्या दरम्यान अमेरिकेत अवैधपणे प्रवेश करणारे भारतीय नगण्य होते. २०११ पर्यंत हा आकडा काही हजारांवर गेला. आणि संसदेत दिल्या गेलेल्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये एक लाख भारतीयांनी अमेरिकेत अवैधपणे प्रवेश केला होता. प्रत्यक्षात हा आकडा आणखी मोठा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातही दोन प्रवाह धक्कादायक आहेत.

पहिला म्हणजे आपल्या अल्पवयीन मुलांना बरोबर घेऊन अवैध प्रवेश करणाऱ्या पालकांची / नातेवाइकांची वाढती संख्या. २०२० मध्ये अशा मुलांची संख्या नऊ होती, ती २०२३ पर्यंत म्हणजे केवळ तीन वर्षांत २६१ पर्यंत पोहोचली. याहूनही दुसरा भयानक प्रकार म्हणजे कुणीही सोबतीला नसलेल्या अल्पवयीन बालकांची संख्या २०२० ला २१९ होती, ती २०२३ मध्ये ७३० वर गेली. ही गोष्ट झाली अवैधपणे प्रवेश केलेल्यांची. जे असा प्रवेश करताना किंवा त्याआधी पकडले गेले अथवा प्रवेश करण्याच्या वाटेत मरण पावले, त्यांची शोकांतिका वेगळीच. मध्यंतरी एका संपूर्ण गुजराथी कुटुंबाचा कॅनडाच्या सीमेवरून अमेरिकेत प्रवेश करण्याआधी थंडीने गोठून मृत्यू झाला. बऱ्याचदा अशा लोकांना ट्रक किंवा बंद कंटेनरमध्ये बसवून नेताना कित्येक तासांच्या प्रवासानंतर सीमेपर्यंत पोहोचायच्या आधीच मरण आले आहे किंवा ते पकडले गेले आहेत.

२०१९ ते २३ या काळात अवैधपणे प्रवेश केलेल्यांची संख्या पाचपटीने वाढली आहे. याचे कारण काय असावे आणि हे कसे थांबवता येईल, याचा विचार भारतात होताना दिसत नाही, हे खूप चिंताजनक आहे. परिणामत: अमेरिकेत अवैधपणे प्रवेश केलेल्या भारतीयांची संख्या ७-८ लाखांपर्यंत पोहोचली आहे. याबाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिको व एल साल्वाडोर हे अमेरिकेच्या नजीकचे देश आहेत.

या सगळ्या अवैधपणे प्रवेश केलेल्या नागरिकांना काही सुविधा मिळत असल्या, तरी त्यांच्या आयुष्यातील अनिश्चितता संपायला कमीत कमी दोन ते तीन दशके लागण्याची शक्यता असते. मग हा अट्टहास कशाला?

(उत्तरार्ध)

(संपर्कः dmulay58@gmail.com)



Source link