देश – परदेश: महान देश म्हणजे नेमके काय?

0
1
देश – परदेश:  महान देश म्हणजे नेमके काय?


ज्ञानेश्वर मुळे6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

देश महान व्हायचा असेल, तर अगदी छोट्या – छोट्या गोष्टींपासून ते प्रसंगी तन – मन – धन यांच्या त्यागासाठी तयार असले पाहिजे.‘जे दिव्य दाहक म्हणोनि असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे..’ या स्वा. सावरकरांच्या पंक्तीमध्ये महानतेची कसोटी सांगितली आहे. अशी महानता प्राप्त करण्यासाठी आपल्याला बरेच परिश्रम करावे लागतील.

फ्रान्समध्ये तिथल्या महानतेची बीजे शोधताना मला गवसलेले आणखी काही धागे आजच्या या दुसऱ्या भागात उलगडत आहे. त्यातील पुढची, पाचवी गोष्ट म्हणजे, शहर असो वा गाव; तिथे खुल्या जागा असायला हव्यात. मैदाने, बागा, हिरवळ, स्टेडियम, सहलीची ठिकाणे आणि आरामात काठावर बसण्यासाठी छोटे-मोठे तलाव. अशी गोष्टींकडे देशाचे पुरेसे लक्ष हवे. विस्तृत पादचारी मार्ग हाही एक निकष आहेच. जिथे अतिक्रमणे पादचारी मार्ग ओलांडून रस्ता सुद्धा खाताहेत, ती शहरे, तो देश महान कसा होऊ शकतो? स्मार्ट सिटी म्हणजे असे शहर जिथे प्रत्येक व्यक्तीला आपल्या शहराविषयी आनंद आणि अभिमान वाटतो.

दिल्लीसारखे राजधानीचे शहर दोन तास पाऊस पडताच पाणी पाणी होते. नव्या दिल्लीतील सुंदर बंगलेही जलमय होतात. शहराची व्यवस्थाच कोलमडते. तीच स्थिती मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, पुण्यासारख्या शहरातही होते. जिथे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासते अन् पावसाळ्यात वाहून जाणारे पूल नि पाण्याने घेरलेली घरे, झोपडपट्ट्यांमुळे आख्खे शहरच खाली बसते; ते थोडे ठीक होते, तोवर पुढचे संकट उभे ठाकते, अशा शहरात कसे राहायचे? यावर झोपडपट्ट्या जमीनदोस्त करणे हा उपाय नाही. तिथे लोकाभिमुख, भ्रष्टाचारमुक्त आणि जबाबदार प्रशासन हवे. फ्रान्समध्ये अगदी छोट्या गावांपासून राजधानी पॅरिसपर्यंत सर्वत्र खुल्या जागा, बागा, झाडे तर आहेतच; पण त्यांची ठेवलेली निगा वाखाण्यासारखी आहे. साधारण तीन आठवड्यांत मी दोन ते तीन हजार किलोमीटरच्या प्रवासात अनेक गावे फिरलो, पण एकही अतिक्रमण दिसले नाही. आहे का आपल्याकडे हे शक्य?

सहावी गोष्ट म्हणजे, जगण्यातील तसेच मृत्यूनंतरही आदराची संकल्पना. इथल्या ट्रोकॅडेरो भागात फिरत असताना उंच भिंतीवरती सुंदर चित्र दिसले. त्या तटबंदीच्या आत काय आहे, असे विचारले तर समजले की, ती जुनी दफनभूमी आहे. ख्रिश्चन समाजात मुस्लिमांप्रमाणेच दफनाची पद्धत आहे. पण, दफनभूमी सुंदर आणि रोचक असू शकते? हिंदू धर्मात प्रसिद्ध, मोठ्या व्यक्तींच्या समाधिस्थळांना जपण्याची प्रथा आहे. इथे प्रत्येक परिवारासाठीच्या छोट्या जागेत मृतांसाठी स्मारके बनवली गेली आहेत. चार एकरांच्या जागेत अतिशय सुंदर बागेसारखे वातावरण आणि दोन्ही बाजूंना कबरी. पण कबरी कसल्या, तिथे शिल्पकाम, कलाकुसर, कविता आणि मृत व्यक्तीच्या आयुष्याचे सार असा कलात्मक, वेधक अनुभव येतो. इथे अनेक प्रसिद्ध व्यक्तीच्या कबरी आहेत. त्यामध्ये; चित्रकार एडवर्ड मॅने, संगीतकार क्लाउड देबूसी, इराणच्या शहाची कन्या लैला पहलवी, अमेरिकन सिने अभिनेता पर्ल व्हाइट अशा अनेक नामवंतांच्या कबरींचा समावेश आहे.

प्रत्येक चौरस किलोमीटरवरती सर्वाधिक प्रसिद्ध व्यक्तींच्या कबरी असणारी ही दफनभूमी अनेक अर्थांनी मृत व्यक्तींना कशा प्रकारे सन्मान मिळतो, याचे उदाहरण आहे. मी स्वत: मृतदेहाच्या दहनपद्धतीचा पुरस्कार करतो. पण, आपल्याकडे अनेकदा मृतदेहाचा अनादर होताना दिसतो. वाहन वा अॅम्ब्युलन्स नसल्याने अथवा ती परवडत नसल्याने ग्रामीण / आदिवासी भागात मृताचे नातेवाइक खांद्यावर, सायकलवर किंवा लाकडी गाड्यावर पार्थिव घेऊन चालत गेल्याची काही उदाहरणे मी मानवाधिकार आयोगात कार्यरत असताना पाहण्यात आली होती. मृताच्या नातेवाइकांना दवाखान्याचा खर्च देईपर्यंत मृतदेह सोपवण्यास नकार दिल्याच्या घटना सर्रास घडतात.

जिथे जिवंतपणीही माणसाला आदर मिळत नसेल, तिथे मेल्यानंतर कोण देणार? कोरोना काळातील अनुभवाच्या पार्श्वभूमीवर मानवाधिकार आयोगाने ‘Right to Dignity of the Dead’ (पार्थिवदेहाचा आदर) या विषयावर भारत सरकारला एक सूचनांची सूची दिली आहे. फ्रान्समध्ये रस्त्यावर कोणताही सिग्नल असो; पायी जाणाऱ्या व्यक्तीला वाहनचालक वाट देतात. ज्येष्ठ नागरिक, विकलांग व्यक्ती, लहान मुले यांना आदराने वागवले जाते. गरीब-श्रीमंत, प्रसिद्ध-अप्रसिद्ध, उच्च-नीच या सगळ्या भेदांच्या पलीकडे जाऊन जो देश प्रत्येकाचा आदर करतो, तो महान असतो.

महान देशाचे सातवे लक्षण म्हणजे गुणवत्तेची आस. आपल्याकडे गुणवत्तेला परीक्षांमधले यश असे समजण्याची पद्धत पडली आहे. आणि यातच आपले अपयश दडले आहे. अशा परीक्षांमधून; मग ती शाळा-कॉलेजची असो वा यूपीएससीची, फक्त पोपटपंची करण्यालाच गुणवत्ता मानण्यात येते. त्यामुळेच कोटा, सिकर, लातूर वगैरे पॅटर्न तयार होतात. त्यातून यश न आल्यास अनेक तरुण-तरुणी आत्महत्येपर्यंत टोकाच्या निर्णयाला जातात. अलीकडे उजेडात आलेल्या महाराष्ट्रातील एका आयएएस अधिकाऱ्याच्या प्रकरणाप्रमाणे खोटी प्रमाणपत्रे देऊन परीक्षेत उत्तीर्ण होण्याची स्पर्धा लागते.

केंद्र आणि राज्य सरकारांना ‘कॉपी’ आणि ‘पेपरफुटी’विषयी कायदा आणावा लागतो. काय हे दुर्दैव? किती ‘गुण’ मिळाले, यातला ‘गुण’ म्हणजे अंक नव्हे, तर त्या व्यक्तीकडे, परीक्षार्थीकडे वेगवेगळे कोणते ‘गुण’ आहेत, असा त्याचा अर्थ व्हायला हवा. अभिव्यक्ती, विचारपद्धती, निरीक्षणक्षमता, कार्यकुशलता, खेळ, छंद म्हणजे ‘गुण’वत्ता. पण, १०० पैकी ११० नावाचे गंभीर गुन्हे (गुण) आपला समाज करत आहे.

या उलट महान देशांमध्ये प्रतिभेला म्हणजे जन्मजात किंवा आत्मसात केलेल्या गुणांना प्रोत्साहन दिले जाते. प्रत्येक परीक्षार्थी आपल्या परीने समाज आणि देशासाठी योगदान देण्याकरीता पात्र होतो. त्यातून मग सर्वत्र स्वच्छ, सुंदर शाळा, रस्ते, उत्तम पूल, तसेच जलव्यवस्थापन, कचरा निर्मूलन, मलनि:सारण आदी व्यवस्थांसह अप्रतिम नगरनियोजन आणि कार्यक्षम, पारदर्शी प्रशासन तयार होते. गुणवत्तेवर आधारित राज्यव्यवस्था आणि समाजव्यवस्थाच कोणत्याही देशाला महान बनवते.

आठवी गोष्ट म्हणजे सामाजिक सौहार्द. फ्रान्सलाही वसाहतवादाचा इतिहास आहे. आफ्रिकन देशांतील पूर्वाश्रमीच्या वसाहतींतून (अल्जेरिया, चाड, गॅबॉन, मॉरिटॅनिया, ट्युनिशिया, सेनेगल अशा वीसेक देशांतून) इथे लोक येऊन स्थायिक झालेत, मिसळून गेलेत. इथे मी टोगो, ट्युनिशिया, मोरोक्को वगैरे देशांतून आलेल्या लोकांना भेटलो. ते आता फ्रान्सला आपला देश मानतात. मात्र, गेल्या दशकभरात सिरीया, इराक, अफगाणिस्तान या देशांतून मुख्यत: मुस्लिम शरणार्थी आले आहेत. त्यांच्याविरुद्ध इथे नापसंती दिसते. यातूनच काही दंगेही झाले आहेत. पण, त्यामुळे अस्वस्थता आहे, सातत्याने तणाव आहे, असे दिसत नाही. त्यातून इथले सामाजिक मैत्रभावाचे वातावरण बिघडले आहे, असेही वाटत नाही.

इंग्लंडमध्येही जगभरातून लोक आले आहेत. तिथेही लुटालुटीच्या छोट्या-मोठ्या घटना घडल्या आहेत. अलीकडे एका क्रिकेट सामन्यानंतर तिथे हिंदू आणि पाकिस्तानी मुस्लिम यांच्यात संघर्ष झाला. पण, अशा घटना तुरळक आणि त्यातही त्या राजधानीच्या शहरात घडल्या आहेत. त्या इतरत्र फारशा झाल्या नाहीत. या उलट जपानमध्ये सामाजिक सौहार्द दिसते. पण, तो समाज एकजिनसी आहे, विविधतापूर्ण नाही. त्यामुळे हा आदर्श भारतासारख्या देशाला लागू पडत नाही. भारत हा पुरातन देश आहे. इथे जाती-धर्म, भाषा, वेशभूषा, रीतीरिवाज यांची अभूतपूर्व विविधता आहे. शिवाय, आर्थिक विषमतेमुळे या विविधतेतून मतभेद, तणाव, हिंसा अशाप्रकारे समाजाच्या प्रगतीला खीळ घालणाऱ्या घटना वारंवार घडतात. स्वार्थी लोक याचा फायदा उठवत स्वत:ची पोळी भाजून घेताना दिसतात. पूर्णपणे सामाजिक सौहार्द अशक्य असले, तरी त्याच्या अभावातून होणारा उद्रेक किंवा उपद्रव देशाच्या प्रगतीला आणि प्रतिमेला हानी पोहोचवतो. भारतासाठी हे आव्हान महासत्तेच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीच्या दृष्टीने या क्षणी तरी बाधक असल्याचे दिसते.

(संपर्कः dmulay58@gmail.com)



Source link