खलनिग्रहणाय: साधन, साध्य आणि समाज

0
1
खलनिग्रहणाय:  साधन, साध्य आणि समाज


  • Marathi News
  • Opinion
  • Means, Achievement And Society | Rasik Special Artical By Dr. Bhushankumar Upadhyay

डॉ. भूषणकुमार उपाध्याय8 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

भावना आणि विचार, हृदय आणि मस्तिष्क, तर्क आणि अंतर्ज्ञान यामध्ये समन्वय साधला गेला, तर चुकीच्या साधनांचा वापर करून आपले साध्य पूर्ण करण्यासाठी कोणी पुढे येणार नाही. तसे झाल्यास एका चांगल्या समाजाची निर्मिती होऊ शकते. त्यामुळेच उद्याच्या पूर्ण योजनेपेक्षा आजची चांगली योजना प्रेरणादायी असते, असे म्हटले जाते.

महात्मा गांधी सांगायचे की, साधन आणि साध्य या गोष्टी एकमेकांशी अखंडपणे जोडल्या गेल्या आहेत. एकाला दुसऱ्यापासून वेगळे करता येत नाही. साधन चुकीचे असेल, तर साध्यही बरोबर असू शकत नाही. म्हणून योग्य साध्य प्राप्त करायचे असेल, तर योग्य साधनांचा वापर केला पाहिजे. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. शिवाय,ती पूर्णपणे वैज्ञानिकही आहे. साधन बीजरुप आहे. या बीजातूनच जे साध्य आहे, त्याचा वृक्ष निर्माण होतो. बीज आंब्याचे असेल, तर झाड आंब्याचेच येईल. बीज कडूलिंबाचे असेल, तर कडूलिंबच उगवेल. याचप्रमाणे, कर्मच चांगले नसेल, तर चांगले साध्य कसे प्राप्त होणार?

आपल्याकडे ‘पेराल तसे उगवते’ असे म्हटले जाते. भारतीय संस्कृतीत एक खूप महत्त्वाचा सिद्धांत आहे. त्याला कर्माचा सिद्धांत म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे, तर जसे कराल तसा भराल. हा एक मोठा व्यावहारिक सिद्धांतही आहे. याचे आपण मानसशास्त्रीय विश्लेषण केले तर असा निष्कर्ष येईल की, ज्या गोष्टींवर आपला विश्वास असतो, त्या प्रकारच्या न्यूरोबायोलॉजिकल प्रतिक्रिया आपल्या मेंदूमध्येही होतात. त्या प्रकारचे न्युरॉन कनेक्शन मेंदूमध्ये तयार होतात आणि माणूस तशाच प्रकारे विचार करतो, वागतोही. आपला विचार चांगला आणि सकारात्मक असेल, तर आपल्या मेंदूमध्ये तशाच प्रकारचे कनेक्शन तयार होतात. आपले चरित्रही तसे बनते आणि आपली वागणूकही तशीच घडते.

माणसातील या सर्व गोष्टींचा परिमाण गुन्हेगारी कृत्यांवरही होतो. जे अट्टल किंवा सराईत गुन्हेगार असतात, त्यांच्या मेंदूमध्ये असे न्युरॉन कनेक्शन तयार होतात की, गुन्हा करणे ही गोष्ट त्यांना चुकीची वाटत नाही. याउलट त्यात त्यांना आनंद वाटतो. एकीकडे, अनेकदा तुरुंगात जाऊनही काही लोक सुधारत नाही, असे दिसून येते. तर दुसरीकडे, काही लोक गुन्हे करत नाहीत, कारण त्यांना तुरुंगात जाण्याची भीती असते. आजही समाजात असे असंख्य लोक आहेत, जे गुन्हे करत नाहीत, कारण गुन्हा करणे योग्य नाही, अशा विचारातून त्यांच्या मेंदूमध्ये त्या प्रकारचे न्युरॉन कनेक्शन तयार झालेले असतात. म्हणून गुन्हे करणे आणि न करणे यामध्ये वैचारिक जडणघडण फार महत्त्वाची ठरते. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवायचे असेल, तर आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मूलभूत परिवर्तन करण्याची गरज आहे. जो जसे करेल, तसे तो भरेल, अशी शिकवण देणारे शिक्षण सुरूवातीपासून मुलांना दिले पाहिजे.

मी राज्याच्या कारागृह विभागाचा अप्पर पोलिस महासंचालक असताना अनेक तुरुंगांना भेट द्यायचो. या तुरुंगांमध्ये दोन प्रकारचे गुन्हेगार असतात. पहिला प्रकार सराईत गुन्हेगारांचा. गुन्हा करणे हा त्यांचा व्यवसाय असतो. काहीही झाले तरी ते गुन्हे करतातच. अशा लोकांवर सुधारणा आणि पुनर्वसन या ब्रीदवाक्याचा काहीही परिणाम होत नाही. यामागचे मानसशास्त्रीय कारण म्हणजे, त्यांच्या मेंदूमध्ये तशाच प्रकारचे कनेक्शन बनलेले असते. दुसरीकडे तुरुंगांमध्ये असेही गुन्हेगार असतात जे सराईत नसतात. भावनेच्या भरात त्यांनी गुन्हा केलेला दिसतो. नंतर त्यांना पश्चाताप होतो आणि त्यातील बहुतांश सुधारतातही. न्युरोसायन्सनुसार, ज्यावेळी माणसाचा भावनात्मक मेंदू सक्रिय होतो, तोव्हा विचार करणारा मेंदू काम करत नाही. आणि याच कारणामुळे अशा भावनेच्या भरात काही लोकांच्या हातून चुकीचे कृत्य घडते. नंतर विचार करणारा मेंदू सक्रिय झाल्यावर, आपण असे का केले? अशी पश्चातबुद्धी त्याला होते.

मानसशास्त्रज्ञ १९९० च्या दशकापर्यंत असे मानत होते की, मेंदूमध्ये काहीही बदल होऊ शकत नाही, ज्यांचा मेंदू जसा आहे तो तसाच राहतो. पण नंतर झालेल्या संशोधनातून असे दिसून आले की, प्रशिक्षण किंवा इतर कारणांनी मेंदूमध्ये बदल घडू शकतात. इमोशनल इंटेलिजन्स (ईक्यू) हा एक नवा विषय गेल्या काही वर्षांत आपल्यासमोर आला आहे. या संकल्पनेनुसार, आपल्या भावना ओळखून भावनात्मक आणि विचारात्मक मेंदूमध्ये चांगला ताळमेळ स्थापित केला जाऊ शकतो. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी भावनिकदृष्ट्या प्रज्ञावंत असणे आवश्यक आहे, हे अनेक प्रयोगांतून दिसून आले आहे.

भारतीय परंपरेमध्ये हजारो वर्षांपासून योग शिकवला जातो. योग, प्राणायाम आणि ध्यानामुळे माणूस आत्मसंयमी बनतो, त्याच्या आयुष्यात उत्तम संतुलन येते. संपूर्ण जगात या विषयावर खूप संशोधन झाले आहे आणि त्यात असे दिसून आले आहे की, नियमित योगसाधनेने मेंदूमध्ये सकारात्मक बदल घडून येतात आणि माणसामध्ये योग्य निर्णय घेण्याची क्षमता येते. साधन आणि साध्य यांचे ज्ञानही या क्षमतेचाच परिपाक आहे. जगातील आणि आपल्या देशातील अनेक तुरुंगांमध्ये केलेल्या योगसाधनेच्या प्रयोगाने कैद्यांच्या मनावर चांगले परिणाम झाल्याचे दिसून आले. म्हणून भावना आणि विचार, हृदय आणि मस्तिष्क, तर्क आणि अंतर्ज्ञान यामध्ये समन्वय साधला गेला, तर चुकीच्या साधनांचा वापर करून आपले साध्य पूर्ण करण्यासाठी कोणी पुढे येणार नाही. तसे झाल्यास एका चांगल्या समाजाची निर्मिती होऊ शकते. त्यामुळेच उद्याच्या पूर्ण योजनेपेक्षा आजची चांगली योजना प्रेरणादायी असते, असे म्हटले जाते. तथागत गौतम बुद्धांनीही आपला वर्तमान चांगला करण्याचा संदेश दिला. कारण वर्तमान उत्तम असेल, तर भविष्य आपोआप उज्ज्वल होते. त्या अर्थाने, वर्तमान हे साधन आणि भविष्य हे साध्य असते, हे समजून घेतले पाहिजे.

(संपर्क – bhushankumarupadhyay@gmail.com)



Source link