काही दशकांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या चुलत भावाचे लग्न होते. आमच्या पिढीतील हे पहिले लग्न होते. आम्ही चुलत भावंडे इतके उत्साहित होतो की आम्ही मद्रास (आता चेन्नई) मध्ये जमलो आणि तयारीला लागलो. पण नेहमीच आनंदी राहणारी चुलत बहीण अचानक आम्हाला टाळायला लागली. वास्तविक तिचे लग्न पाच दिवसांवर येऊन ठेपले होते. ती नेहमीच तिचा फोन घेऊन तिच्या बंद खोलीत बसायची. तू प्रेमात पडली आहेस, असे आम्ही तिला चिडवू लागलो. ती काहीशी रागात आणि लाजेने प्रतिक्रिया द्यायची. पण आजोबांनी आम्हाला एक वेगळीच गोष्ट सांगितली. तेव्हा आम्हाला समजले की आमचा गैरसमज झाला आहे. ते म्हणाले, तिला वेदना होत आहेत. तिला त्रास देऊ नका. ती तिच्या जुन्या शाळेतील ट्रॉफी आणि फोटो अल्बमची क्रमवारी लावत आहे. ती तिच्या नवीन घरासाठी काही सुटकेसमध्ये ते सगळे बसवू शकत नाही. तुम्ही तिला त्रास देऊ नका. जा आणि तिला पॅक करण्यास मदत करा. शिवाय तिच्या आई-वडिलांना सोडून नवीन जोडीदार शोधण्यातही तिचा संघर्ष सुरू आहे. त्या दिवशी आजोबांनी जबाबदारी घेतली. मी माझ्या भावंडांत सर्वात मोठा असल्याने त्यांनी मला त्यांच्यासोबत नेले. तिच्या खोलीत गेलो. ते तिच्याशी तासभर बोलले. त्यांनी सुंदरपणे समजावून सांगितले की ती आता आपल्या कुटुंबात नवीन सदस्य जोडत आहे. ते म्हणाले, “एखाद्या नवीन व्यक्तीशी लग्न करणे म्हणजे पालक गमावणे नाही तर एका संरक्षित मुलीची भूमिका ओलांडून दोन्ही कुटुंबांची काळजी घेऊ शकणारी जोडीदार बनणे. मी त्यांच्या संभाषणाची शेवटची ओळ कधीही विसरणार नाही. ते म्हणाले, “लग्न म्हणजे फक्त एक नवीन व्यक्ती शोधणे नाही तर ते जुन्या व्यक्तींना सोडून देणेदेखील आहे. उदाहरणार्थ- मी किंवा दुसरे कुणी किंवा अगदी जुने शाळेचे अल्बम. माझ्या बहिणीने त्यांचे सगले एेकले. मग आजोबांना मिठी मारली आणि तिला रडू कोसळले. आजोबांनी तिला पाच मिनिटे मोकळेपणाने रडू दिले. त्याच दिवशी मला तिच्यात अचानक बदल दिसला. तिच्या सगळ्या वस्तू आता फक्त दोन सुटकेसपुरत्या मर्यादित होत्या. त्याच संध्याकाळी ती हसत आणि खेळत परतली. माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या आजोबांचा तो सखोल सल्ला दशकांनंतर माझ्या मदतीला आला. मी माझ्या मुलीला त्याच परिस्थितीत पाहिले. तेव्हा तो उपयोगी आला. माझी मुलगी तिचा लग्नाचा पोशाख निवडू शकत नव्हती. तेव्हा मी तिलाही तेच म्हटले. ती अनेकदा तिच्या आईसोबत बुटीकमध्ये जायची. सुंदर लेहेंगा पाहायची आणि रिकाम्या हाताने परतायची. तिला निळ्या रंगाचा योग्य रंग सापडत नाही, अशी तक्रार करायची. 10 फेब्रुवारी रोजी प्रकाशित झालेल्या “लव्हज लेबर हाऊ टू ब्रेक अँड मेक द बॉन्ड्स ऑफ लव्ह’ या पुस्तकातील चांगल्या लग्नाबद्दलची उत्कृष्ट माहिती वाचल्यावर मला ही घटना आठवली. त्यात प्रसिद्ध मनोविश्लेषक आणि लेखक स्टीफन ग्रोझ यांनी “सोफी” च्या मध्यवर्ती पात्राभोवती प्रेम, लग्न, समज आणि गैरसमज यांच्या विविध पैलूंचा शोध घेतला आहे. आपण ऐकायला शिकतो तेव्हा आपले नाते आपल्याला काय शिकवू शकते, हे त्यांनी त्यात मांडले. रुग्णांशी 40 वर्षांहून अधिक काळ झालेल्या संभाषण-संवादावर आधारे ते ही बाब स्पष्ट करतात. ते पाश्चात्त्य जगातून आले असल्याने विवाहांमध्ये अनेकदा अस्थिरता आणि घटस्फोटाचा अनुभव येतो. आपण आपल्या जोडीदारांचे ऐकायला शिकतो तेव्हा नाते काही गोष्टी शिकवू शकते. उदाहरणार्थ- पती अचानक त्याच्या कामाचा आनंद घेऊ लागतो तेव्हा जोडप्यांमध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो. ग्रोझ सल्ला देतो की कामावरील या नवीन प्रेमाबद्दल भांडण्याऐवजी दोन्ही भागीदारांनी ते बोलून दाखवावे. कारण “रोमान्स देखील काम आहे आणि त्यासाठी दोघांनाही कठोर परिश्रम करणे गरजेचे आहे.’
फंडा असा की, प्रेमातील श्रम हे आयुष्यभराचे काम आहे. आपण एकमेकांचे अधिक ऐकतो तेव्हा त्याचे फळ आणखी गोड होते. कधीकधी आपण आपल्या उणिवांकडेही लक्ष दिले पाहिजे. कारण यामुळे अनेकदा नवीन मार्ग मिळू शकतात.
Source link






