
लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांनी कित्येक वर्षं अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर केला आहे. याच भूमीवरुन त्यांनी अनेक दहशतवादी कृत्यं केली. परंतु तालिबानने गेल्या चार वर्षांत सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे, असा दावा तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी केला आहे. ते भारत दौऱ्यावर असून, त्यांनी पाकिस्तानला शांततेच्या मार्गाचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे.
“त्यांच्यापैकी एकही अफगाणिस्तानात नाही. अफगाणिस्तानात एक इंचही जमीन त्यांच्या नियंत्रणाखाली नाही. ज्या अफगाणिस्तानविरुद्ध आम्ही (224मध्ये) कारवाई केली होती तो आता बदलला आहे,” असं उत्तर त्यांनी पाकिस्तानी दहशतवादी गटांनी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करून कारवाया केल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं.
यावेळी त्यांनी पाकिस्तानला एक संदेशही दिला आहे. “शांततेसाठी अफगाणिस्तानने जसं केलं तशा प्रकारे इतर देशांनीही अशा दहशतवादी गटांविरुद्ध कारवाई करावी,” असं ते म्हणाले आहेत.
मुत्ताकी यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. त्यांच्या भारत दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील राजकीय संबंध नव्याने प्रस्थापित होत आहेत. नवी दिल्ली आता काबूलमधील त्यांचे तांत्रिक मिशन अपग्रेड करेल, असे जयशंकर यांनी मुत्ताकी यांच्याशी झालेल्या भेटीत सांगितले. तसंच शेजारील देशाच्या प्रगतीत आम्हाला रस असल्याचं सांगितले.
पत्रकार परिषदेत मुत्ताकी यांनी काबूलमध्ये अलीकडेच झालेल्या बॉम्बस्फोटाच्या वृत्तांवरही भाष्य केले आणि पाकिस्तानवर हे कृत्य घडवून आणल्याचा आरोप केला. “सीमेजवळ दुर्गम भागात हल्ला झाला आहे. पाकिस्तानचे हे कृत्य आम्हाला चुकीचं वाटते. अशा प्रकारे समस्या सोडवता येत नाहीत. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. त्यांनी स्वतःहून त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. 40 वर्षांनंतर अफगाणिस्तानात शांतता आणि प्रगती आहे. कोणालाही त्यामुळे समस्या नसावी. अफगाणिस्तान आता एक स्वतंत्र राष्ट्र आहे. जर आपल्याकडे शांतता असेल तर लोकांना त्रास का होतो?,” अशी विचारणा त्यांनी केली आहे.
अफगाणिस्तानच्या धाडसाची परीक्षा घेऊ नये असा इशाराही त्यांनी दिला आहे. “जर कोणाला हे करायचे असेल (अफगाणिस्तानला त्रास देऊ इच्छित असेल), तर त्यांनी सोव्हिएत युनियन, अमेरिका आणि नाटो यांना विचारावं. ते स्पष्ट करतील की अफगाणिस्तानशी खेळ खेळणं चांगलं नाही,” असं ते म्हणाले. काबुललाही इस्लामाबादशी चांगले संबंध हवे आहेत, परंतु ते एकतर्फी असू शकत नाहीत, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
भारताच्या संबंधांवर बोलताना त्यांनी अफगाणिस्तानात अलिकडेच झालेल्या भूकंपानंतर प्रथम प्रतिसाद देणाऱ्या भारत सरकारचे कौतुक केले. “अफगाणिस्तान भारताकडे जवळचा मित्र म्हणून पाहतो. अफगाणिस्तान परस्पर आदर, व्यापार आणि लोकांमधील संबंधांवर आधारित संबंध इच्छितो. आम्ही सामंजस्याची सल्लागार यंत्रणा तयार करण्यास तयार आहोत, जी आमचे संबंध मजबूत करण्यास मदत करेल,” असं त्यांनी सांगितलं आहे.
त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या अतिरिक्त शुल्काचाही उल्लेख केला आणि भारत आणि अफगाणिस्तानमध्ये अधिक सहकार्याची गरज असल्याचे सांगितले. भारत आणि अफगाणिस्तानने अमेरिकेसोबत संयुक्त चर्चा केली पाहिजे. आपण दोघांनीही या मार्गाचा वापर करणं आवश्यक आहे. आम्हाला व्यापाराचे महत्त्व समजते, जो वाढला आहे आणि सर्व व्यापार मार्ग खुले असले पाहिजेत. जर हा मार्ग बंद झाला तर त्याचा भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापारावर परिणाम होतो,” असं तालिबानच्या मंत्र्याने सांगितले.







