
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने भारतातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. वैद्यकीय उपचारासाठी भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देण्यात आलेली व्हिसाची मुदतही संपली असून, मंगळवारी अटारी बॉर्डरवर नागरिकांनी गर्दी केली होती. पाकिस्तानात परतणाऱ्या अनेक पाकिस्तानी नागरिकांनी यादरम्यान आपली चिंता व्यक्त केली आणि भारत सरकारला या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं.
दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, पाकिस्तानी नागरिकांसाठी अल्पकालीन व्हिसाची वैधता रविवारीच संपली होती.अटारी बॉर्डरवर वास्तव्यास असणाऱ्या समरीन पाकिस्तानच्या नागरिक आहेत. त्यांनी सांगितलं की, सप्टेंबरमध्ये 45 दिवसांच्या व्हिसासह भारतात आल्यानंतर त्यांनी लग्न केलं, परंतु आता दीर्घकालीन व्हिसा जारी न झाल्यामुळे देश सोडावा लागत आहे.
“मी सप्टेंबरमध्ये 45 दिवसांच्या व्हिसासह येथे आली होती. त्यानंतर, मी येथे लग्न केलं. मला अद्याप माझा दीर्घकालीन व्हिसा मिळालेला नाही आणि आता अचानक मला देश सोडण्यास सांगण्यात आलं आहे. दहशतवाद्यांना प्रश्न विचारला पाहिजे. आमची काय चूक आहे? आम्हाला शिक्षा का दिली जात आहे? ज्या लोकांचे नातेवाईक देशात आहेत त्यांना राहू दिलं पाहिजे,” असं समरीन म्हणाल्या आहेत.
दुसरी पाकिस्तानी नागरिक इरा म्हणाली, “मी 10 वर्षांपूर्वी दिल्लीत लग्न केलं होतं. कोविड दरम्यान माझा व्हिसा संपला. मी NORI व्हिसाधारक आहे, परंतु पहलगाममधील हल्ल्यामुळे मला देश सोडण्यास सांगण्यात आलं आहे. तिथे जे काही घडले ते पूर्णपणे चुकीचे आहे, परंतु आम्हाला यासाठी शिक्षा होऊ नये.”
पाकिस्तानात परतलेले कृष्ण कुमार म्हणाले, “मी 45 दिवसांसाठी टुरिस्ट व्हिसावर भारतात आलो होतो आणि आता आम्ही परत जात आहोत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात सरकारने कारवाई करावी. दोन्ही देशांनी एकत्र राहावं कारण अर्धी कुटुंबे तिथे आहेत आणि अर्धी कुटुंबे इथे आहेत. पहलगाममध्ये जे घडले ते योग्य नाही.”
शुक्रवारी, भारत सरकारने 27 एप्रिलपासून तात्काळ प्रभावीपणे दीर्घकालीन, राजनैतिक आणि अधिकृत व्हिसा वगळता पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व प्रकारचे व्हिसा रद्द केले आहेत. वैद्यकीय व्हिसा 29 एप्रिलपर्यंत वैध होता.
परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं आहे की, “भारताने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व विद्यमान वैध व्हिसा 27 एप्रिल 2025 पासून रद्द केले जात आहेत. पाकिस्तानी नागरिकांना दिलेले वैद्यकीय व्हिसा फक्त 29 एप्रिल 2025 पर्यंत वैध असतील.”
अटारी बॉर्डरवरील प्रोटोकॉल अधिकारी अरुण पाल यांनी सांगितले की, अल्पकालीन व्हिसा धारकांसाठीची अंतिम मुदत संपल्यानंतर गेल्या तीन दिवसांत अटारी बॉर्डरवरून 537 पाकिस्तानी नागरिक भारतातून बाहेर पडले आहेत. एएनआयशी बोलताना पाल म्हणाले की, गेल्या तीन दिवसांत 850 भारतीय नागरिक भारतात परतले आहेत. त्यांनी असंही सांगितलं की, फक्त रविवारी 237 पाकिस्तानी नागरिक त्यांच्या देशात परतले, तर 116 भारतीय नागरिक परतले.






