
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी द्विराष्ट्र सिद्धांताचा मुद्दा उपस्थित केला असून, भारत आणि पाकिस्तान हे दोन वेगवेगळे राष्ट्र आहेत यावर भर दिला आहे. बुधवारी इस्लामाबादमधील ओव्हरसीज पाकिस्तानी कन्व्हेन्शनमध्ये भाषण करताना असीम मुनीर यांनी पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या मुलांना राष्ट्र कसे जन्माला आले हे सांगण्याचं आवाहन केले.
“…आपल्या पूर्वजांना वाटलं की आपण जीवनाच्या प्रत्येक बाबतीत हिंदूंपेक्षा वेगळे आहोत,” असं मुनीर म्हणाले. “आपला धर्म वेगळा आहे, आपल्या प्रथा वेगळ्या आहेत, आपल्या परंपरा वेगळ्या आहेत, आपले विचार वेगळे आहेत, आपल्या महत्त्वाकांक्षा वेगळ्या आहेत. द्विराष्ट्र सिद्धांताचा पाया तिथेच घातला गेला. आपण दोन राष्ट्रे आहोत, आपण एक राष्ट्र नाही,” असं ते म्हणाले.
“आपल्या पूर्वजांनी मोठा त्याग केला आहे, आणि आपण या देशाच्या निर्मितीसाठी खूप त्याग केला आहे. त्याचं रक्षण कसे करायचे हे आपल्याला माहिती आहे,” असं ते म्हणाले.
Pakistan Army Chief General Asim Munir spews hate against #Hindus and propagates the #TwoNationTheory, which failed in 1971 when Bangladesh got independence from Pakistan. He asserts that children must be taught such “falsehoods” since it’s easier to brainwash youth. Shameful! pic.twitter.com/vaVZhEK4v8
— Taha Siddiqui (@TahaSSiddiqui) April 16, 2025
ते पुढे म्हणाले,”माझ्या प्रिय बंधूंनो, बहिणींनो आणि मुलांनो, कृपया पाकिस्तानची गोष्ट विसरू नका आणि तुमच्या पुढच्या पिढीला पाकिस्तानची कहाणी सांगायला विसरू नका, जेणेकरून त्यांचे पाकिस्तानशी असलेले नाते कधीही कमकुवत होणार नाही. ती तिसरी पिढी असो, चौथी पिढी असो, किंवा पाचवी पिढी असो, त्यांना माहित असेल की पाकिस्तान त्यांच्यासाठी काय आहे”.
यादरम्यान त्यांनी स्थानिक माध्यमांचा हवाला देत त्यांनी बलुचिस्तानमधील दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. “दहशतवाद्यांच्या दहा पिढ्याही बलुचिस्तान आणि पाकिस्तानला हानी पोहोचवू शकत नाहीत,” असं विधान त्यांनी केल्याचं एएनआयने स्थानिक माध्यमांच्या हवाल्याने सांगितलं.
मुनीर यांनी दहशतवादाचा सामना करण्यासाठी सैन्याच्या दृढनिश्चयावर भर दिला आणि परदेशातील पाकिस्तानी लोकांनी देशाप्रती केलेल्या समर्पणा आणि वचनबद्धतेचे कौतुक केले.
“आम्ही लवकरच या दहशतवाद्यांना पराभूत करू. बीएलए, बीएलएफ आणि बीआरए इत्यादींशी संबंधित हे 1500 दहशतवादी बलुचिस्तान आपल्यापासून हिरावून घेऊ शकतात असं तुम्हाला वाटतं का?,” अशी विचारणा मुनीर यांनी केली. “पाकिस्तानच्या शत्रूंना असं वाटतं का की मूठभर दहशतवादी पाकिस्तानचे भवितव्य ठरवू शकतात?दहशतवाद्यांच्या दहा पिढ्याही बलुचिस्तान आणि पाकिस्तानला हानी पोहोचवू शकत नाहीत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.