
माळेगाव | ६ जुलै २०२५. :- राज्याच्या राजकारणात वजनदार मानल्या जाणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. निवड होताच अजितदादांनी कोणताही वेळ न दवडता कारखान्याच्या कामकाजाचा आढावा घेऊन आपल्या कार्यशैलीची झलक दाखवली.
दुपारी तीन वाजता अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड झाली. त्यानंतर सलग पाच तास त्यांनी संचालक मंडळ, अधिकारी वर्ग व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्यांशी बैठका घेतल्या. कारखान्याच्या सध्याच्या घडीतील स्थितीचा सखोल आढावा घेत आगामी पाच वर्षांसाठी व्यापक दृष्टिकोन स्पष्ट केला.
“येणाऱ्या पाच वर्षात कारखान्याचा चेहरामोहरा बदलायचा आहे. सभासदांना अधिकचा ऊसदर मिळावा यासाठी प्रयत्न करायचे आहेत. कुणी चुकीचं वागल्यास हयगय केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा देत त्यांनी शिस्तबद्ध आणि जबाबदारीने काम करण्याच्या सूचना दिल्या.
कारखाना हा सभासदांचा असून त्यांचा सन्मान राखत त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी संचालक व कर्मचारीवर्गाने कटिबद्ध राहावे, असं आवाहन त्यांनी केलं. “नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उस आणि साखर उत्पादनात वाढ करणार असून कारखान्याचा दर्जा संपूर्ण महाराष्ट्रात उंचावायचा आहे,” असा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.
कारभाराचा प्रारंभ करताच अजितदादांनी कामकाजाला गती देत जबाबदारीची जाण दाखवली असून, त्यांच्या नेतृत्वात माळेगाव कारखाना एका नव्या वाटचालीकडे वळेल, असा विश्वास सभासदांमध्ये व्यक्त होत आहे.








