हिंदीनंतर इंग्रजी पुस्तकातूनही मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला; साताऱ्यात शिवप्रेमींचा मोर्चा

0
5


Satara News : एनसीईआरटीच्या (NCERT) इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा (Maratha Empire) विस्तार दर्शवणारा नकाशा हटवण्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली होती. मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप करत राज्यभरातून विरोधाचा आवाज उठवण्यात येत आहे. सुरुवातीला हिंदी भाषेतील पुस्तकातून हा नकाशा हटवण्यात आला होता. त्यानंतर राज्याचे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या संदर्भात एनसीईआरटीसोबत पत्रव्यवहार करून योग्य तो पाठपुरावा केला जाईल, असे विधानमंडळात सांगितले होते. मात्र, त्यानंतरही कोणतीही दखल न घेता आता इंग्रजी भाषेतील पुस्तकातूनही मराठा साम्राज्याचा नकाशा हटवण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, शिक्षण मंत्र्यांना एनसीईआरटीकडून अक्षरशः वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, या निर्णयाच्या निषेधार्थ साताऱ्यात (Satara News) शिवप्रेमींकडून भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता साताऱ्यातील शिवतीर्थ येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे, छत्रपती घराण्यातील वृषाली राजे भोसले या देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यामुळे या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे..

नेमकं प्रकरण काय? आंदोलकांचे म्हणणे काय? (NCERT Removed Maratha Empire Map)

1) विधान परिषद च्या पटलावर 11 मार्च 2026 रोजी मा. शिक्षणराज्यमंत्री महोदय डॉ पंकज भोयर यांनी स्वतः कबुली दिली की, मराठा साम्राज्याचा नकाशा उर्दू आणि हिंदी माध्यमाच्या पुस्तकात दिसत नाही. महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात केंद्र सरकारला लेखी विनंती केली होती.

परंतु, केंद्राने या पत्राची साधी दखलही घेतली नाही. त्या उलट महाराष्ट्र शिक्षणराज्यमंत्री महोदयाचे पत्र गेल्यानंतर लगेचचं इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकातूनही हा नकाशा वगळला गेला. किती संतापजनक बाब आहे. ह्यावरुन स्पष्टपणे निदर्शनात येते की, राज्य सरकारच्या विनंतीला केंद्र सरकारने पूर्णपणे केराची टोपली दाखवली. हा महाराष्ट्र शासनाचा अवमान नाही का? भारताचा, महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास पुसण्याचा हा प्रकार संतापजनक आहे!”

2) सुमारे 8 ते 9 महिन्यांपूर्वी जेव्हा राजस्थानमधून मराठा साम्राज्याला विरोध झाला होता, तेव्हा सर्वात आधी मी स्वतः तिथल्या राजघराण्यांचा तीव्र निषेध केला होता. दुर्दैवाने, त्याच वेळी जर महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी आणि राजकीय पुढार्‍यांनी एकजुटीने प्रखर विरोध दर्शवला असता, तर आज शालेय पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा काढण्याचे धाडस कोणाचेही झाले नसते.”

3) जेव्हा आमचे या मोहिमेतील सहकारी ऋषिकेश निकम यांनी ‘माहिती अधिकारा’ चा (RTI) वापर केला, तेव्हा कुठे हे धक्कादायक सत्य समोर आले की, NCERT ने शालेय पाठ्यपुस्तकांमधून मराठा साम्राज्याचा नकाशाच हद्दपार केला आहे! या गंभीर विषयावर मी जेंव्हा पंतप्रधान महोदय, केंद्रीय गृहमंत्री महोदय, केंद्रीय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र मुख्यमंत्री महोदय व महाराष्ट्र शिक्षणमंत्री महोदयांना पत्र व्यवहार केला तेंव्हा कुठे राज्य सरकार, आमदार आणि राजकीय नेते खडबडून जागे झाले.

माझा स्पष्ट सवाल आहे कि, जर राष्ट्रीय स्तरावर मराठा साम्राज्याचा इतिहास पुसण्याचे कारस्थान सुरू असेल, तर महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आणि त्यांचे मंत्रालय नक्की काय करत होते? ही बाब इतकी गंभीर असतानाही त्यांच्या लक्षात कशी आली नाही? की त्यांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले? आम्ही निषेध व्यक्त केल्यावरच सरकारला जाग येते, मग शिक्षण खात्यातील अधिकारी आणि तज्ज्ञ नक्की कोणासाठी काम करत आहेत?

4) मराठा साम्राज्याचा ‘अटक ते कटक’ हा नकाशा केवळ हिंदुस्तानाची, महाराष्ट्राची ओळख नसून तो हिंदू, मराठी माणसाला इतर राज्यांत मिळणाऱ्या सन्मानाचा आधार आहे; कारण या नकाशामुळेच आज संपूर्ण भारताला हे ठाऊक आहे की मराठ्यांनी संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य केले होते. नकाशामुळेच मराठ्यांची खरी शक्ती जगाला दिसून येते, परंतु आज तोच नकाशा काढून टाकल्यामुळे संपूर्ण देशात असा चुकीचा संदेश गेला आहे की मराठ्यांचा साम्राज्यविस्तार खोटा होता आणि त्यांनी राजस्थानवर कधी राज्यच केले नाही. NCERT सारख्या राष्ट्रीय संस्थेने नकाशा हटवणे ही मोठी चिंतेची बाब आहे, कारण यामुळे आपल्या गौरवशाली इतिहासाच्या सत्यतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आपण इकडे कितीही ‘अटकेपार झेंडे’ गाडल्याच्या गर्जना केल्या, तरी राष्ट्रीय स्तरावर जर अधिकृत नकाशाच नसेल, तर इतर राज्यातील लोक आपल्या इतिहासावर विश्वास कसा ठेवणार? येणाऱ्या पिढीला दाखवायला जर आपल्याकडे अधिकृत नकाशाच उरला नाही, तर आपला पराक्रम केवळ गोष्टींपुरता मर्यादित राहील, ही भीती आज सर्वांना सतावत आहे.

5) मराठा साम्राज्याचा नकाशा म्हणजेंचं मुगल साम्राज्याचे पतन करून निर्माण केलेले हिंदुत्वचं म्हणता येईल मराठा, मराठी मावळ्यानीं अखंड हिंदुस्तान अबातीत ठेवण्यासाठी जिवाचं राण केले. नकाशा हटवणे म्हणजेंचं अखंड हिंदुस्तानाचें आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान आहे. देव, देश आणी धर्मासाठी लढणारा हा राजा हा फक्त मराठ्यासाठी लढला नाही तर आठरा पगड जातीनां सोबत घेऊन हिंदुत्वासाठी लढला. त्याच राजाचा मराठा साम्राज्याचा नकाशा NCERT कुठल्या आधारा शिवाय हटवते, धिक्कार आहे आश्या NCERT चा व केंद्रीय शिक्षणमंत्रालयाचा.

6) दोष दुसऱ्यांचा नाही, तर आपल्यांच्या निष्क्रियतेचा आहे. राजस्थानच्या प्रतिनिधींनी त्यांच्या राज्याच्या हितासाठी दिल्लीत जाऊन गृहमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली, त्यांनी दबाव निर्माण केला आणि आपल्या सोयीचा निर्णय पदरात पाडून घेतला. खरी शोकांतिका ही आहे की, ज्या महाराष्ट्रातील लोकसभेचे 48 खासदार + राज्यसभेचे खासदार दिल्लीत बसतात, त्यांच्यापैकी एकालाही आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा हा नकाशा वाचवण्यासाठी शिक्षण मंत्र्यांचे दार ठोठवावेसे वाटले नाही.

7) ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्रात राजकारण चालते, त्यांचाच इतिहास पुसला जात असताना राज्यातील सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांनी साध्या निषेधाचा सूरही आळवला नाही, ही शरमेची बाब आहे. जर आपलेच प्रतिनिधी आपल्या अस्मितेसाठी लढायला तयार नसतील, तर बाहेरच्या राज्यांतील लोकांनी आपल्या इतिहासावर विश्वास का ठेवावा हा महाराष्ट्र ला पडलेला प्रश्न?

Raje Mudhoji Bhosle : मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा NCERTच्या इतिहासाच्या पुस्तकातील नकाशा एकतर्फी हटवला, राजपूत घराण्यांच्या दबाव; नागपूरकर भोसले घराण्याचा आरोप

आणखी वाचा



Source link