सातारा; पुढारी वृत्तसेवा : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व एकत्रित आयुष्यमान भारत योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यामधील 27 रुग्णालयांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत 1356 प्रकारच्या शस्त्रक्रीया व उपचारांवर लाभार्थी कुटुंबांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत.
सातारा जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना या दोन्ही योजनेमध्ये 17 लाख 62 हजार 900 लाभार्थ्यांचा समावेश असून त्यापैकी 8 लाख 2 हजार 859 इतके लाभार्थी आयुष्यमान भारत योजनेतील आहेत व 9 लाख 60 हजार 41 इतके लाभार्थी महात्मा ज्योतिराव फुले योजनेतील आहेत. त्यापैकी आजअखेर 3 लाख 5 हजार 846 इतक्या लाभार्थ्यांना ई -कार्ड चे वाटप केले आहे. उर्वरीत लाभार्थ्यांची ई-कार्ड नोंदणी व वितरण प्रशासनामार्फत दिवसा व रात्री कॅम्पचे आयोजन करुन ग्रामपंचायत कार्यालयामधील आपले सरकार सेवा केंद्र, महा ई-सेवा केंद्र, आशा सेविका, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक, परिचारीका, उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचेमार्फत युध्द पातळीवर देण्याची कार्यवाही सुरु आहे.
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार सातारा जिल्हा आयुष्यमान भारत दैनंदिन ई -कार्ड नोंदणीमध्ये मागील 6 दिवसांमध्ये राज्यात अग्रेसर ठरला आहे.
सातारा जिल्हा आयुष्यमान भारत ई-कार्ड नोंदणीमध्ये मागील 6 दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी महाराष्ट्रात अग्रेसर आहे. जिल्ह्यामध्ये ई-कार्ड नोंदणीची प्रक्रिया युध्द पातळीवर सुरु असून नागरीकांनी आपल्या ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्र, तसेच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक व परिचारिका, आशा सेविका यांच्याकडे आपले आधार कार्ड घेऊन जावे. यामध्ये कुटुंबप्रमुख किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा आधार नंबर टाकला की तुम्ही पात्र आहे की नाही हे समजते, पात्र असल्यास प्रशासनामार्फत आयोजित केलेल्या कॅम्पमध्ये नोंदणी करुन घ्यावी, अथवा लाभार्थींनी स्वत: अॅन्ड्राईड मोबाईलमध्ये प्ले-स्टोअरमधून आयुष्यमान भारत अॅप घेऊन त्याद्वारे नोंदणी करुन ई-कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
– ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा








