विश्लेषण: रणथंबोरच्या हल्लेखोर वाघिणीचे भवितव्य काय?

0
2
विश्लेषण: रणथंबोरच्या हल्लेखोर वाघिणीचे भवितव्य काय?



ही ‘हल्लेखोर’ वाघीण कोण?

सवाई माधोपूरमधील रणथंबोर व्याघ्रप्रकल्पातील ‘कानकटी’ ऊर्फ ‘अन्वी’ या वाघिणीने एकाच महिन्यात दोन मनुष्यबळी घेतले. या वाघिणीने १६ एप्रिलला याच व्याघ्रप्रकल्पातील त्रिनेत्र गणेश मंदिरातून आजी-आजोबांसोबत परत येणाऱ्या कार्तिक सुमन या मुलावर हल्ला केला. कार्तिक जागीच ठार झाला. या घटनेला एक महिना पूर्ण होत नाही तोच ११ मे रोजी वनसंरक्षक देवेंद्र चौधरी यांच्यावर या वाघिणीने हल्ला केला. यातील एका हल्ल्यानंतर ही वाघीण कुतलपुरा गावातील एका शेतात आली होती. लोकांनी छपरांवर चढून जीव वाचवला गावात वाघीण शिरल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी वनखात्याला कळवले. तिला जेरबंद करण्यासाठी बेशुद्ध करताना वनकर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. ती एका हॉटेलमध्ये शिरली होती. महत्प्रयासानंतर तिला बेशुद्ध करून पकडण्यात आले.

वाघिणीला परत सोडले तर भीती का?

हल्लेखोर वाघिणीला जेरबंद करण्यात आले असले तरीही तिच्याबद्दल भीती कायम आहे. तिला परत जंगलात सोडण्यावरून दोन मतप्रवाह समोर येत आहेत. वनाधिकाऱ्यांच्या मते तिच्या स्थलांतरणाचा निकाल आता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे सोपवण्यात आला आहे. तर वन्यजीव अभ्यासकांच्या मते हल्लेखोर वाघीण खूप आक्रमक आहे. तिच्या मनातून माणसांची भीती निघून गेली आहे. त्यामुळे तिला खुल्या जंगलात सोडणे म्हणजे पुन्हा माणसांचा बळी देणे आहे. या वाघिणीला रणथंबोर व्याघ्रप्रकल्प सोडून इतर जंगलात सोडले तर तिथेही हल्ला करू शकते. त्यामुळे सरकारने तिला बंदिवासात सोडण्याचाच निर्णय घेतला पाहिजे. दरम्यान ‘कानकटी’ ऊर्फ‘अन्वी’ या वाघिणीला पिंजऱ्यात बंद करून ठेवण्यात आले आहे. मात्र, तिला किती काळ पिंजऱ्यात ठेवणार हा प्रश्न आहे. याचा निर्णय राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण घेईल.

रणथंबोरमधील वाघांची स्थिती काय?

रणथंबोर व्याघ्रप्रकल्पात वाघांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. ‘कानकटी’ वाघिणीने जिथे पहिला हल्ला केला, त्या त्रिनेत्र गणेश मंदिर रस्त्यावर, जोगी महाल, किल्ला आणि त्या परिसरात १७ ते १८ वाघ, वाघीण आणि बछड्यांचा वावर आहे. यात ‘टी-८४’ म्हणजेच ‘अॅरोहेड’ वाघीण व तिचे तीन बछडे, रिद्धी वाघीण आणि तिचे तीन बछडे, सुलताना वाघीण आणि तीन बछडे याशिवाय तीन नर आणि इतरही वाघ आहेत. ‘कनकटी’ ही रणथंबोर व्याघ्रप्रकल्पातील ‘टी-८४’ म्हणजेच ‘अॅरोहेड’ची मुलगी आहे. वनखात्याने या वाघिणीला अजूनही क्रमांक दिलेला नाही. त्यामुळे वनकर्मचारी आणि पर्यटक मार्गदर्शक तिला ‘कानकटी’ असे म्हणतात.

वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत किती बळी?

रणथंबोर व्याघ्रप्रकल्पात आतापर्यंत गेल्या २० वर्षांत ४० जणांचा बळी गेला आहे. गेल्या १५ वर्षांत सात वनकर्मचाऱ्यांवर वाघांनी हल्ला केला आहे. यात तीन वनकर्मचारी मृत्युमुखी पडले. २०१२ मध्ये सहाय्यक वनरक्षक घीसू सिंग, २०१५ मध्ये वनरक्षक रामपाल सैनी आणि आता मे २०२५ मध्ये रेंजर देवेंद्र चौधरी यांना वाघाच्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले. ‘कानकटी’ या वाघिणीने एकाच महिन्यात दोन मनुष्यबळी घेतले. यात एक सात वर्षांचा मुलगा कार्तिक सुमन, तर दुसरे व्यक्ती वनखात्यातील वनसंरक्षक देवेंद्र चौधरी आहेत.

वनखाते व सरकारची भूमिका काय?

‘कानकटी’ वाघिणीने दोन बळी घेतल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून रणथंबोर प्रशासनाने झोन दोन आणि तीन पर्यटकांसाठी बंद केले. या पर्यटकांना झोन एक आणि चारमध्ये हलवण्यात आले. तसेच त्रिनेत्र मंदिर रस्ता पादचारी आणि दुचाकीस्वार भाविकांसाठी बंद करण्यात आला. या वाघिणीला इतरत्र हलवण्याची मागणी होत आहे. रणथंबोर वनखात्यातील वरिष्ठ अधिकारी याबाबत सरकारशी बोलत आहेत. ही वाघीणच नाही तर एकूणच वाघांचे हल्ले रोखण्यासाठी रणनीती आखली जात आहे.



Source link