रूमी जाफरी, बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक9 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
गेल्या आठवड्यात १९ एप्रिलला फिल्म इंडस्ट्रीतील मोठे आणि प्रसिद्ध निर्माते वासू भगनानीजींचा वाढदिवस होता. त्यानिमित्त त्यांच्या घरी डेव्हिड धवन, अभिषेक बच्चन, चंकी पांडे, तुषार कपूर यांच्यासह चार-पाच खास लोकांसाठी डिनर ठेवण्यात आले होते. पाहुण्यांचे स्वागत वासूजींचा मुलगा जॅकी आणि सून रकुलप्रीत यांनी केले. तिथून निघताना मनात विचार आला की, आपण अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, लेखक, संगीत दिग्दर्शक, कॅमेरामन यांच्याविषयी नेहमी लिखाण करतो; पण निर्मात्यांबाबत आजवर फारसे लिहिले नाही. त्यामुळे आज माझ्या हिश्श्याच्या किस्स्यांमध्ये वासू भगनानीजींविषयी…
वासूजींचा कोलकत्यामध्ये कपड्यांचा व्यवसाय होता. मुंबईत आल्यावर त्यांनी बांधकाम क्षेत्रात कामे करण्यास तसेच ऑडिओ कॅसेट बनवण्यास सुरूवात केली. त्या काळात ऑडिओ कॅसेट खूप विकल्या जायच्या आणि त्या कॅसेटचे कव्हर बनवण्याचे काम वासूजी करायचे. त्यामुळे सगळ्या म्युझिक कंपन्यांच्या मालकांशी त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे वासूजींनी सिनेमांची निर्मिती सुरू केली. त्यांच्या पहिला सिनेमा होता ‘कुली नं. वन’. तो मी लिहिला होता आणि डेव्हिड धवन साहेबांनी दिग्दर्शन केले होते. हा सिनेमा सुपरहिट ठरला. त्यानंतर मी त्यांच्या ‘हीरो नंबर वन’, ‘बीवी नंबर वन’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘मुझे कुछ कहना है’ अशा लागोपाठ हिट झालेल्या सिनेमांचे कथानक लिहिले. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये कौटुंबिक संबंध तयार झाले. मार्केटिंग, पब्लिसिटी या गोष्टी फिल्म इंडस्ट्रीला शिकवण्याचे श्रेय वासूजींना दिले जाते. सिनेमांसाठी पब्लिसिटी कशी आवश्यक आहे आणि ती किती चांगली ठरते, हे त्यांनी शिकवले.
‘कुली नं. वन’ रिलीज होणार होता, तेव्हा मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. त्यांनी माझ्यासमोर पाण्याची एक बाटली ठेवली. त्यावर कुली नं. वन लिहिले होते, एक अॅश ट्रे होता, त्यावरही कुली नं. वन लिहिले होते. मग त्यांनी स्कूटरच्या स्टेफनीचे काही कव्हर दिले आणि म्हणाले की, तुमच्या ज्या मित्रांकडे स्कूटर असेल त्यांना हे कव्हर द्या आणि स्टेफनीवर लावायला सांगा. त्यावरही कुली नं. वन लिहिले होते. काही लेटरपॅड, पेनही दिले आणि त्यावरही कुली नं. वन लिहिले होते. त्यानंतर काही छत्र्या माझ्या पुढ्यात ठेवल्या आणि जाताना त्या घेऊन जा, असे सांगितले. त्यावरही लिहिले होते.. कुली नं. वन. कारण सिनेमा ३० जूनला रिलीज होणार होता. म्हणजे त्या आधी दोन आठवडे मुंबईत पाऊस सुरू होणार होता. हे सगळे पाहून मला खूप आश्चर्य वाटले. मी विचारले, ‘वासूजी, हे सगळे काय आहे? मी आजवर अशा गोष्टी कधी पाहिल्या नाहीत..’ वासूजी नेहमी हसतमुख असतात. तेव्हाही ते हसून म्हणाले, ‘सरकार, हे तुमच्या सिनेमाचे प्रमोशन करतोय!’ आम्ही दोघे एकमेकांना ‘सरकार’ म्हणायचो. ते पुढे सांगू लागले.. ‘या गोष्टींची खूप गरज आहे. तुम्हा फिल्म इंडस्ट्रीवाल्यांना पोस्टर लावून, ट्रेलर दाखवून सिनेमा चालेल असे वाटते आणि तुम्ही त्यालाच पब्लिसिटी समजता. पण, तुम्ही आपल्या प्रॉडक्टची चौफेर पब्लिसिटी करणार नाही, तोवर लोकांना त्याविषयी कसे समजणार? प्रसिद्धीची गरज नसती, तर टाटा- बिर्लांसारख्या मोठमोठ्या कॉर्पोरेटनी आपल्या उत्पादनांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले नसते. चहापासून तुपापर्यंत आणि अन्नधान्यापासून सिमेंटपर्यंत सगळ्या प्रॉडक्टच्या पब्लिसिटीवर ते कोट्यवधी रुपये खर्च करतात कारण त्याचा रिझल्ट मिळतो. तुम्ही बघा, आपल्या या पब्लिसिटीचाही रिझल्ट नक्की दिसेल.’ वासूजींच्या या गोष्टीवरुन मला शकील आज़मी यांचा एक शेर आठवतोय…
हर घड़ी चश्म-ए-ख़रीदार में रहने के लिए कुछ हुनर चाहिए बाज़ार में रहने के लिए।
असो. त्यानंतर वासूजी म्हणाले, सरकार, या सगळ्या गोष्टी घेऊन जा, मित्रांना वाटा आणि दोन दिवसांनी घराबाहेर पडा. चौकसपणे आजूबाजूला बघा, तुम्हाला सरप्राइज दिसेल.. दोन दिवसांनी मी घराबाहेर पडलो. जवळच्या बागेत फिरताना एका दगडावर नजर पडली, त्यावर लिहिले होते – कुली नं. वन. मी वांद्र्यापर्यंत गेलो. वाटेतला कुठलाही दगड कोरा नव्हता. भितींवर पोस्टर लागले होते. जिथे कुठे मोकळी जागा होती, तिथे कुली नं. वन लिहिले होते. सिनेमा रिलीज झाला, सुपरहिट ठरला. पुढे अनेक महिने ते दगड तसेच होते, ज्यावर लिहिले होते.. कुली नं. वन. त्यानंतर वासूजींनी पब्लिसिटीची मालिकाच सुरू केली, कारण सगळे सिनेमे हिट होत होते. गाडीतून जात असताना अचानक एखादी स्कूटर समोर यायची, जिच्या स्टेफनीवर ‘कुली नं. वन’ लिहिलेले असायचे. पावसातून जाताना एकाएकी कुणी तरी छत्री घेऊन यायचे, जिच्यावर ‘कुली नं. वन’ किंवा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ लिहिलेले असायचे. मुंबईत जितक्या स्कूटर, गाड्या, छत्र्या असतील, त्यांच्यावर कुठे ना कुठे तुम्हाला वासूजींच्या बॅनरचे नाव दिसेलच. त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीचे डोळे उघडले आणि सिनेमांचे प्रमोशन किती आवश्यक आहे, ते सगळ्यांना कळून चुकले. मला आठवतेय की, शाहरुख खान, जूही चावला आणि अजीज मिर्झा यांनी मिळून ‘ड्रीम्स अनलिमिटेड’ ही कंपनी सुरू केली होती. त्यासाठी ऑफिस घेतल्यावर या तिघांनी तिथे पहिल्यांदा वासूजींना बोलावले आणि सिनेमांचे मार्केटिंग, प्रमोशन कसे करायचे ते आम्हाला शिकवा, अशी विनंती केली होती. तर, आज वासूजींसाठी ‘कुली नंबर वन’मधील हे गाणे ऐका…
मैं तो रस्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा रहा था, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूँ…
स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.




