
रूमी जाफरी | बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक6 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
‘चेहरे’ सिनेमातील एका दृश्यात इमरान हाश्मीसोबत अमिताभ बच्चन. या सिनेमासाठी अमिताभ बच्चन यांनी मानधन घेतले नव्हते. आनंद पंडित यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.
पोलंडमध्ये झाले होते ‘चेहरे’ सिनेमाचे शूटिंग, तिथल्या हॉटेलचा खर्चही स्वत: ‘बिग बी’ यांनीच केला होता. पुढच्या आठवड्यात ११ ऑक्टोबरला महानायक अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे. त्यांच्याविषयी लिहिल्याशिवाय ना माझा हा कॉलम पूर्ण होईल ना माझे आयुष्य. ते मला खूप प्रिय आहेत आणि मी चित्रपटसृष्टीत त्यांचा सर्वांत जास्त आदर करतो. ते माझ्यासोबत आहेत, याची जाणीव त्यांनी प्रत्येक पावलावर मला करून दिली. या गोष्टीचे सर्वांत मोठे उदाहरण आज माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये सांगणार आहे.
“चेहरे’ हा सिनेमा सुरू करण्याची वेळ आली तेव्हा अमितजींनी मला आणि निर्माते आनंद पंडितजींना चर्चेसाठी बोलावले. ही घटना २०१८ च्या सप्टेंबरची आहे. आम्ही निघालो तेव्हा आनंदभाई मला म्हणाले की, अमितजी िकती मानधन मागतील, याची मला खूप चिंता आहे. मी बच्चन साहेबांचा खूप आदर करतो. माझे आणि त्यांचे नाते असे आहे की ते जे मानधन मागतील ते मी नाकारु शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला सांभाळून घ्यावे लागेल. जर ते जास्त असेल तर तुम्हालाच बोलावं लागेल.
मी म्हणालो की, अगोदर जाऊन बघूया त्यांचं काय म्हणणं आहे.. आम्ही दोघे पोहोचलो. अमितजींसोबत बसलो. त्यांचे मॅनेजर विंग कमांडर रमेशजीही तिथे बसले. अमितजींकडे अशा खूप साऱ्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला मिळतो, जे अशा इतर स्टारकडे मिळत नाहीत, जसे की दालमोठ, पेठा, कचाेरी, समोसे.. चहा आणि मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर अमितजी म्हणाले, “आनंदभाई, मी तुम्हाला हे सांगण्यासाठी इथं बोलावलंय की, मी या सिनेमासाठी मानधन घेणार नाही.’ त्यांना काय म्हणायचंय ते मला आणि आनंदभाईंना समजलं नाही. आम्ही म्हणालो, “आम्हाला काही समजलं नाही.’
ते म्हणाले, “हा सिनेमा मी विनामूल्य करेन. याचं कोणतंही मानधन घेणार नाही.’ विश्वास ठेवा, त्यावेळी माझ्या डोळ्यात अश्रू आले. आनंदभाईंनी माझ्याकडं आणि मी त्यांच्याकडं पाहिलं. आनंदभाईंनी अमितजींना खूप आग्रह केला की, सर, तुम्हाला मानधन घ्यावेच लागेल. पण, त्यांनी स्पष्ट नकार दिला आणि मीटिंग संपली. आम्ही त्यांच्या घरून निघालो आणि फूटपाथवर उभे असताना एकमेकांकडं पाहात विचार करू लागलो की, हे असं झालं तरी काय? असो. त्यानंतर एकेदिवशी विंग कमांडर रमेशजी मला म्हणाले की, रूमीभाई, तुमच्या संपूर्ण सिनेमाचा खर्च तर फक्त ओटीटी आणि सॅटेलाइटचे हक्क विकूनच भरून निघेल. आता तुम्ही कोणतीही निश्चिंतपणे आरामात सिनेमा तयार करा.
त्यानंतर आम्ही शूटिंगसाठी पोलंडला गेलो. तिथे डिसेंबरमध्ये कडाक्याची थंडी असते. त्यावेळी तिथले तापमान उणे १७ अंश सेल्सिअस होते आणि अमितजींनी तशा थंडीत शूटिंग केले. ते तिथून परत गेले तेव्हा मला आनंदभाईंनी सांगितले की, ज्या चार्टर्ड प्लेनने अमितजी आले होते, ते पूर्णवेळ तिथेच थांबले होते आणि ज्या हॉटेलात त्यांनी वास्तव्य केले होते, तिथला सगळा खर्च बच्चन साहेबांनी स्वत:च केला. आनंदभाई आणि माझ्यावर त्यांचे हे एवढे मोठे उपकार आहेत की त्यांचे आभार मानायलाही आमच्याकडे शब्द नाहीत. लोकांना त्यांचा हा चांगुलपणा कळावा, असे मला वाटत होते.
अभिनेते पैशांसाठी निर्मात्यांशी कसे भांडताहेत, असोसिएशनकडे कशा तक्रारी देताहेत, कोर्टात कसे खटले दाखल करताहेत, हे अलीकडे आपण मीडियातून वाचत-ऐकत असतो. अशा परिस्थितीत ही जाणीव आणखी प्रबळ होते की, या फिल्म इंडस्ट्रीत बच्चन साहेबांसारखा महान माणूस ना कधी होता, ना आहे, ना पुढे होईल. या गोष्टीवरुन मला अल्ताफ हुसेन हाली यांचा एक शेर आठवतोय…
फ़रिश्ते से बढ़ कर है इंसान बनना,
मगर इसमें लगती है मेहनत ज़ियादा।
अमितजींसाेबतच्या इतक्या वर्षांच्या सहवासात घडलेले अनेक किस्से आहेत, जे मी तुम्हाला सांगत राहीन. आज मला एक किस्सा आठवतोय, तो आहे त्यांच्या ६० व्या वाढदिवसाचा. हा वाढदिवस जुहूच्या हॉटेल मेरियटमध्ये खूप भव्य स्वरुपात साजरा झाला होता. योगायोगाने मी त्यावेळी शाहरूख खान आणि राणीसोबत ग्रीसमध्ये अजीज मिर्झा यांच्या “चलते चलते’चे शूटिंग करत होतो. वाढदिवशी मी अमितजींना फोन केला आणि म्हणालो, “सर, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!’ ते म्हणाले, “रूमी, फोनवर शुभेच्छा देतोय? संध्याकाळी प्रत्यक्ष येऊन दे.’ मी म्हणालो, “सर, मी ग्रीसमध्ये शाहरूखसोबत शूटिंग करतोय.’ त्यावर ते म्हणाले, “ठीक आहे हनानला पाठव.’ हनान म्हणजे माझी पत्नी. मी म्हणालो, “ती एकटी कोणत्याही फिल्मी पार्टीला जात नाही.’ तर ते म्हणाले, “ही फिल्मी पार्टी नाही. माझा वाढदिवस आहे.’ मी म्हणालो, “सॉरी सर, माझ्या तोंडून चुकून निघून गेलं..’ ते म्हणाले, ‘मला हनानचा नंबर पाठव..’ मी त्यांना तिचा नंबर पाठवला. थोड्या वेळाने मला पत्नीचा फोन आला, तिची धडधड वाढली होता आणि ती खूप गोंधळली होती. मी विचारलं, “काय झालं?’ ती म्हणाली, “रूमी, मला अमितजींचा मला फोन आला होता, त्यांचा आवाज ऐकून माझा तर श्वासच थांबला.
अजूनही धडधडतेय.. त्यांनी मला संध्याकाळी त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला बोलावलंय.’ मी म्हणालो, “यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते की त्यांनी स्वत: तुला फोन करून बोलावलंय.’ पार्टीत एकटे वाटू नये म्हणून माझी पत्नी तिच्या बहिणीला सोबत घेऊन गेली. नंतर तिनं मला फोन करून सांगितलं की, मी रूमीशिवाय त्या पार्टीला गेलेय, हे अमितजींंच्या कुटुंबाने मला एक मिनिटही जाणवू दिलं नाही. त्या वाढदिवसापासून ते या वाढदिवसापर्यंत; खरं तर दररोजच मी मनापासून प्रार्थना करतो की, ईश्वराने अमितजींना सदैव निरोगी आणि आनंदी ठेवावं, त्यांना दीर्घायुष्य लाभावं, जेणेकरून येणाऱ्या अनेक पिढ्या त्यांना पाहू शकतील, त्यांना भेटू शकतील, त्यांच्यासोबत काम करू शकतील. आज त्यांच्यासाठी त्यांच्याच ‘मजबूर’ या सिनेमातील गाणं ऐका…
आदमी जो कहता है, आदमी जो सुनता है, ज़िन्दगी भर वो सदायें पीछा करती है… आदमी जो देता है, आदमी जो लेता है, ज़िन्दगी भर वो दुआएं पीछा करती है… स्वत:ची काळजी घ्या आणि आनंदी राहा.