माझ्या हिश्श्याचे किस्से: शोले – दिल्लीत केलेल्या ‘नाटका’ने अमजद खान यांना मिळवून दिली होती गब्बरची भूमिका

0
2
माझ्या हिश्श्याचे किस्से:  शोले – दिल्लीत केलेल्या ‘नाटका’ने अमजद खान यांना मिळवून दिली होती गब्बरची भूमिका


रूमी जाफरी। चित्रपट लेखक, दिग्दर्शक6 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘शोले’च्या चित्रीकरणावेळी टीमसोबत अमजद खान (सर्वांत उजवीकडे).

गब्बरसिंगच्या भूमिकेसाठी निवडलेल्या डॅनी साहेबांसमोर एकच पर्याय होता-एक तर ‘शोले’ करायचा किंवा ‘धर्मात्मा’. त्यांनी ‘धर्मात्मा”ची निवड केली…

पंधरा ऑगस्टला कोणता चित्रपट प्रदर्शित झाला होता, ते मी अलीकडेच गुगलवर शोधत होतो. ४९ वर्षांपूर्वी, १९७५ मध्ये ‘शोले’ प्रदर्शित झाला होता, हे जाणून मला खूप आश्चर्य वाटलं. ‘शोले’ला पन्नास वर्षे पूर्ण होणार आहेत आणि आजही हा सिनेमा पूर्णपणे नवा वाटतो. त्यामुळंच माझ्या मनात विचार आला की, ‘शोले’बद्दलच लिहायला हवं. म्हणून आज माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये आज मी हिंदी चित्रपट इतिहासातील सर्वात प्रसिद्ध, सर्वाधिक चर्चित आणि सर्वात हिट सिनेमांपैकी एक असलेल्या ‘शोले’बद्दल सांगणार आहे.

‘शोले’ हा असा चित्रपट आहे, ज्याचे प्रत्येक पात्र, प्रत्येक संवाद आणि अगदी पार्श्वसंगीतही सुपरहिट आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन जवळपास ५० वर्षे होत आहेत. इतक्या वर्षानंतरही लोकांना तो आठवतो. सर्वप्रथम या सिनेमातील पात्रांबद्दल… गब्बरसिंग, जो चित्रपटसृष्टीतील सर्वात कुप्रसिद्ध आणि भयानक खलनायक होता. ‘शोले’तील या गब्बरसिंगच्या भूमिकेसाठी आधी डॅनी साहेबांना निवडण्यात आले होते. सगळ्या गोष्टी फायनल झाल्या होत्या. कपडेही डिझाइन झाले होते. पण, याच दरम्यान त्यांनी फिरोज खान यांचा ‘धर्मात्मा’ हा सिनेमाही साइन केला होता. योगायोगाने दोन्ही सिनेमांच्या शूटिंगच्या तारखा एकच झाल्या होत्या. ‘शोले’चे शूटिंग तत्कालीन बेंगलोरच्या परिसरात आणि ‘धर्मात्मा’चे शूटिंग अफगाणिस्तानात होते. फिरोज खान यांना ‘धर्मात्मा’चे शेड्यूल मागे घेण्याची विनंती करण्यात आली. पण, तेसुद्धा असहाय होते. कारण हे शूटिंग दुसऱ्या देशात होते, त्यामुळे सगळ्या परवानग्या, फॉरेन एक्स्चेंज वगैरे पूर्ण झाले होते. आता डॅनी साहेबांसमोर एकच पर्याय होता – एक तर ‘शोले’ करायचा किंवा ‘धर्मात्मा’. त्यांनी ‘धर्मात्मा”ची निवड केली. आता इतक्या ऐनवेळी, एवढ्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी कोणाला घ्यायचे, असा प्रश्न रमेश सिप्पी साहेबांसमोर उभा राहिला.

अमजद खान यांना गब्बरसिंगची भूमिका मिळाली, हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण, ती कशी मिळाली, हे काही दिवसांपूर्वीच जावेद साहेबांनी सांगितले. १९६३ ची गोष्ट आहे. दिल्लीत अखिल भारतीय विद्यार्थी वादविवाद आणि नाट्य स्पर्धा होती. जावेद साहेब भोपाळच्या सेफिया कॉलेजमध्ये शिकत होते. वादविवादांमध्ये त्यांचे खूप नाव झाले होते. भोपाळ विद्यापीठाकडून स्पर्धेसाठी जावेद साहेबांना दिल्लीला पाठवण्यात आले.

जावेद साहेब सांगत होते… अमजद खान आणि त्यांचे भाऊ इम्तियाज खान मुंबई विद्यापीठाकडून नाटकासाठी आले होते. ‘ऐ मेरे वतन के लोगों’ या नावाचे त्यांचे खूप चांगले नाटक होते. अमजद खान यांचा अभिनय हा त्या नाटकाचा जीव होता. त्यावेळी मला स्वप्नातही वाटले नव्हते की, मी पुढे मुंबईला जाईन, चित्रपट लिहीन आणि अमजद खान माझ्या सिनेमात काम करतील. पण, अमजद खान त्या नाटकातील अभिनयामुळे माझ्या नजरेत आणि मनात बसले होते. एक प्रसिद्ध शेर आहे ना…

फ़र्क़ आँख में नहीं,

फ़र्क़ है बीनाई में

ऐबमंद ऐब हुनरमंद

हुनर देखता है।

असो. काही वर्षांनी माझे शिक्षण पूर्ण झाले. मी मुंबईला आलो. काही वर्षे सहायक म्हणून राहिलो. नंतर सलिम साहेबांसोबत जोडी बनवली आणि चित्रपट लिहायला लागलो. त्यावेळी जयंत हे एक खूप प्रसिद्ध अभिनेते होते. बऱ्याचदा त्यांचा उल्लेख व्हायचा. ‘जंजीर’मधील पठाणच्या भूमिकेसाठी त्यांचेही नाव आले होते. आम्ही म्हणालो, त्यांनी ‘दो रास्ते’मध्ये पठाणची भूमिका केली आहे. जयंत साहेबांचा उल्लेख व्हायचा, तेव्हा मी सलिम साहेबांना म्हणायचो, ‘अमजद खान हा जयंत साहेबांचा मुलगा आहे ना..? मी दिल्लीत त्याचं नाटक पाहिलंय. खूप जबरदस्त अभिनेता आहे.’ जेव्हा ‘शोले’तील गब्बरसिंगच्या भूमिकेसाठी कोणाला घ्यायचे, या विचारात आम्ही होतो, तेव्हा मला अमजद खानबद्दल आठवलंच नाही. तेव्हा सलिम साहेब मला आठवण करून देत म्हणाले, ‘जावेद, तू नेहमी सांगत असतोस ना, जयंतचा मुलगा आहे अमजद.. त्याचं नाटक तू दिल्लीला पाहिलं होतं.. तो खूप हुशार अभिनेता आहे, असं म्हणत होतास..’ मी म्हणालो, ‘हो..’ ‘तर मग त्यालाही बोलाव ना.. त्याचीही ऑडिशन घेऊ, स्क्रीन टेस्टही घेऊ..’ मग अमजद खान यांना बोलावण्यात आले. त्यांची गब्बरसिंगच्या भूमिकेसाठी स्क्रीन टेस्ट घेण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी जो अभिनय केला तो इतिहास आहे. लोक अमजद खान यांचे नाव विसरून त्यांना ‘गब्बरसिंग’ म्हणू लागले. अमजद खान यांनी साकारलेली गब्बरसिंग ही अविस्मरणीय व्यक्तिरेखा आठवून आज ‘शोले’मधील हे गाणे ऐका…

मेहबूबा ओ मेहबूबा,

मेहबूबा ओ मेहबूबा..

गुलशन में गुल खिलते हैं,

जब सेहरा में मिलते हैं

मैं और तुम…

स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link