
आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक दिनानिमित्त महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजाच्या विविध मागण्यांसाठी मौलाना आझाद विचार मंच या संघटनेतर्फे आज, सोमवार १८ डिसेंबर २०२३ रोजी मुंबईत मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी खासदार हुसेन दलवाई आणि राज्यभरातून आलेले कार्यकर्ते सामील झाले होते. माजी राज्यसभा सदस्य हुसेन दलवाई यांनी यावेळी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाला सादर केले. या निवेदनात त्यांनी १९ जुलै २०१४ च्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळावे, केंद्र व राज्याच्या अर्थसंकल्पात मुस्लिमांसाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात यावी, पंतप्रधान १५ कलमी कार्यक्रमाची कृतीशील अंमलबजावणी करावी, मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत १०० टक्के शिष्यवृत्ती द्यावी, जिल्हानिहाय मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहाची सोय करावी, मॉब लिन्चींग, दंगली होतील तिथे शीघ्रगतीने दोषींवर कारवाई करा व पीडितांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागण्या करण्यात आल्या. अल्पसंख्यांक समुदायाला न्याय मिळेपर्यंत हक्काची लढाई लढणार असल्याचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी यावेळी सांगितले.





