
ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत कधीही हल्ला करु शकतो अशी भीती पाकिस्तानला आहे. मात्र भारत सध्या वॉटर स्ट्राईक करुन पाकिस्तानची कोंडी करतोय. त्या वॉटर स्ट्राईकचा दुसरा अंक चिनाब नदीवर बघायला मिळाला.
पाकिस्तानी लष्कर भारतीय सैन्य कधी हल्ला करतील याच्या चिंतेत असताना सर्व पाकिस्तानी आणि पाक सरकारचा घसा कोरडा करणारा अजून एक निर्णय भारत सरकारनं घेतलाय. 1960 सालच्या सिंधू जल कराराला स्थगिती दिल्यानंतर आता केंद्र सरकारनं पाकिस्तानला जाणारं चिनाब नदीचं पाणीही रोखलंय. जम्मू कश्मीरच्या रामबन परिसरात चिनाब नदीवर बगलिहार धरण आहे. या धरणाचे सर्व दरवाजे आता बंद करण्यात आलेत.
यामुळं पाकिस्तानच्या दिशेनं वाहणारी चिनाब नदी आता कोरडीठाक पडलीय. भारताच्या या वॉटर स्ट्राईकमुळे पाकिस्तानचा घसा कोरडा होणाराय. आणि पाकिस्तानी थेंब थेंब पाण्यासाठी तरसणार आहेत. झी मीडियाची टीम या नदीच्या परिसरात पोहचली तेव्हा काय चित्र दिसलं बघुया. पाकिस्तानचं पाणी बंद केल्यानं चिनाब नदीवर आलेल्या भारतीय आनंद व्यक्त केला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात केलेली ही दुसरी मोठी वॉटर स्ट्राईक आहे. खरंतर भारतात सिंधु, झेलम आणि चिनाब या मोठ्या नद्या आहे. ज्या पुढे पाकिस्तानात जातात. मे महिन्यात पाऊस नसला तरी मे ते सप्टेंबर या काळात हिमालयातील बर्फ वितळून ते पाणी या नद्यांना येऊन मिळतं. हे लाखो लिटर पाणी भारतीय हद्दीतून पाकिस्तानात जातं. मात्र दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचं पाणी रोखून भारत पाकिस्तानला पुरतं जेरीस आणण्याचा प्लान आखत आहे.