गोष्ट सांगतो ऐका…: डबा

0
1
गोष्ट सांगतो ऐका…:  डबा


अरविंद जगताप5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

पवनने ऐकलं नाही म्हणून वीरेंद्र अस्वस्थ झाला. लग्नाची गोष्ट पण पवनने ऐकली नाही. आपण उपयोगाच्या गोष्टी सांगतो; पण लोक ऐकत नाहीत, याचा वीरेंद्रला त्रास व्हायचा.

वीरेंद्र आणि पवन एकाच ऑफिसमध्ये कामाला. पाच – सहा वर्षे झाली. दोघंही अकाऊंटमध्ये आहेत. पगार ठीकठाक. मैत्रीही फार नाही. म्हणजे कामच एवढं असतं की, बोलायलाही वेळ मिळत नाही. मग घरी जायची घाई. घर एक – दीड तास लांब. दोघे दोन दिशेला राहतात. वीरेंद्र तसा जन्मल्यापासून पुण्यातच राहतो. पवन बाहेरून आलाय. वीरेंद्र आईवडिलांसोबत राहतो. पवन एकटाच. हे लक्षात आलं कारण ऑफिससमोर एक राजस्थानी माणूस पोळीभाजीची गाडी लावतो. स्वस्त जेवण. पवन तिथेच जेवतो.

एक दिवस वीरेंद्रने पाहिलं. त्याने मोठं भाषण दिलं पवनला. गाडीवर किती वाईट जेवण असतं, बाहेर जेवण केल्याने कसा पित्ताचा त्रास होतो, ते तेल कुठलं वापरतात, सोडा खूप घालतात.. अशा अनेक गोष्टी वीरेंद्र बोलत राहिला. मी कसा रोज घरून डबा आणतो, बाहेर काही खात नाही, हे कौतुक सांगत होता. पवन खूप वेळ ऐकत होता. मग बोलला, ‘मी एकटाच असतो रूमवर. आईवडील गावी असतात. त्यांना पैसे पाठवावे लागतात, म्हणून जेवतो इथे. स्वस्त आहे. दुसरा पर्याय नाही.’ वीरेंद्रला ती गोष्ट फार पटली नाही. पण, त्याच्याकडं दुसरा पर्याय नव्हता. अर्थात, रोज घरचा डबा खाताना त्याला पवनची आठवण यायची. तो गाड्यावर ते तेलकट जेवण खात असेल, हे डोळ्यासमोर दिसायचं. पण, त्याच्या हातात विचार करण्याशिवाय काही नव्हतं. दोघांचा पगार सारखाच होता.

बाकी पुन्हा एकदा हा विषय निघाला होता, तेव्हा वीरेंद्र पवनला म्हणाला, ‘तू लग्न का करत नाहीस?’ पवन हसला. मग काही वेळाने त्याने वीरेंद्रला विचारलं, ‘माझं जाऊ दे. तू का लग्न करत नाहीस?’ मग वीरेंद्रही तसंच हसला. दोघांनाही कारण माहीत होतं. लग्न जमणं काही सोपी गोष्ट नव्हती. पगार कमी, मुलींच्या अपेक्षा जास्त. प्रयत्न तर दोघेही करत होते; पण यश येत नव्हतं. आणि लग्न जमत नाही, हे दुःख एकमेकांना शेअर करण्याएवढा त्यांचा दोस्तांना नव्हता. तरीही वीरेंद्र पवनबद्दल विचार करत राहायचा. तसा त्याचा स्वभावच होता. समोरच्या माणसाला काहीतरी सल्ला देत राहणे. ऑफिसमधले शिपाई दिसले की, त्यांना बचतीविषयी सांगत राहणे. अगदी ऑफिसातल्या मुलींना सेफ्टीसाठी चाकू असलेले नेलकटर वापरायचं सांगायलाही तो कमी करत नसे.

एकदा तो फरशी पुसणाऱ्या मावशीला त्यांची पद्धत कशी चुकीची आहे, फरशी पुसताना पहिल्या केबिनपासून सुरूवात केली तर अंदाजे दहा मिनिटं वाचतील वगैरे सांगत होता. मावशी फक्त ‘मला कुठं घाई असते?’ एवढंच म्हणाल्या. पण, अशा उत्तराने वीरेंद्र कधी खचला नाही. तो सल्ले देतच राहायचा. पवनने वधू-वर सूचक मंडळात नोंदणी करावी, असा सल्ला त्याने चार-पाचदा दिला. पवन एवढे पैसे खर्चायला तयार नव्हता. जमवतील घरचे कधीतरी या विश्वासावर तो दिवस ढकलत होता. पण, पुन्हा वीरेंद्र त्याला गणित करून दाखवायचा. बायको आली, तिने स्वयंपाक करायला सुरूवात केली की किती पैसे वाचतील वगैरे.. ‘पण, बायको काय डबा बनवायला करायची का?’ पवन एवढंच म्हणाला. वीरेंद्र म्हणाला, ‘अर्थात..’ वीरेंद्रच आयुष्य अकाऊंट म्हणजे अकाऊंट. हिशेब. पुढचा विचार. पुढे हळूहळू ऑफिसात खूप गोष्टी घडू लागल्या. हा विषय वीरेंद्र विसरून गेला.

पवन महिनाभर गावी गेला होता सुटी टाकून. ऑफिसमध्ये सगळ्यांना वाटत होतं की त्याने नोकरी सोडली. कारण आधी दोन दिवसांत येतो म्हणून गावी गेलेला पवन महिना झाला तरी ‘आज येतो, उद्या येतो’ म्हणत होता. आधी वीरेंद्रने फार मनावर घेतलं नाही. पण, नंतर तो अस्वस्थ होऊ लागला. पवन आजारी तर पडला नसेल? एवढे दिवस बाहेर खायचा, नक्कीच पित्त वाढलं असेल. त्याने आपलं ऐकायला पाहिजे होतं. पवनने ऐकलं नाही म्हणून वीरेंद्र खूप अस्वस्थ झाला. लग्नाची गोष्ट पण पवनने ऐकली नाही. आपण एवढ्या उपयोगाच्या गोष्टी सांगतो; पण लोक ऐकत नाहीत, याचा वीरेंद्रला कायम त्रास व्हायचा. अर्थात एक – दोन दिवस. नंतर तो विसरून जायचा. पवनबद्दल विचार करणं सुटलं. त्याला कारणही तसंच झालं. वधू-वर सूचक मंडळातून त्याला एक स्थळ आलं.

मुलगी अकाऊंटवालीच होती. दोघे भेटले. भारी गोष्ट म्हणजे, दोघांचा स्वभाव चांगलाच जुळला. तिलाही प्रत्येकीची चौकशी करायची सवय. कुणी काय केलं पाहिजे, हे आवर्जून सांगणे ही दोघांमधली कॉमन गोष्ट. म्हणजे दोघं केअरिंग आहेत, हे दोघांच्या घरच्यांना छान वाटलं. लग्न झालं. संसारात रमून गेला वीरेंद्र. पण, पुन्हा पवन आठवू लागला. कुठं असेल? तब्येत कशी असेल? त्याच्या पित्ताबद्दल चौकशी केली पाहिजे, असं मनात येऊन गेलं. खूप वेळा. पण, संसार आणि ऑफिस या भानगडीत वेळ मिळाला नाही. खूप गोष्टी राहून जातात. वेळ हे कारण.

महिना झाला आणि पवन उगवला. एका महिन्यात भलताच बदलून गेला होता. गावी राहून जरा तेज आलं होतं चेहऱ्यावर. मूठभर मांस चढल्यासारखा दिसत होता. हे सगळं अर्थात वीरेंद्रच्या डोक्यात चालू होतं. आपण उगीच त्याच्या आजारपणाबद्दल विचार करून चिंतेत होतो, हा तर आणखी फिट होऊन आलाय. वीरेंद्र लंच ब्रेकपर्यंत काम कमी आणि हाच विचार जास्त करत होता. पण, ऑफिसमध्ये बोलायची सोय नव्हती. शेवटी लंच ब्रेक झाला. आता कधी एकदा पवनला गाठतो आणि प्रश्नांचा भडिमार करतो, असं झालं त्याला. पाच मिनिट, दहा मिनिट..

वीरेंद्र वाट बघत होता, पण पवन काही आला नाही. वीरेंद्र पोळीभाजीच्या गाडीपाशी उभा होता. त्याला लक्षात आलं की, आपल्या म्हणण्याप्रमाणे पवनने बाहेर गाडीवर जेवण बंद केलेलं दिसतंय. हे भारी आहे. वीरेंद्रला बरं वाटलं. मनोमन सुखावला तो. आणि पहिला घास घेतला. तेवढ्यात खांद्यावर हात ठेवला कुणी तरी. वीरेंद्रने दचकून मागं पाहिलं. पवन उभा होता. दोघांना आश्चर्याचा धक्का बसला होता. वीरेंद्र चक्क गाडीवर जेवत होता. तो हिरमुसला. शेवटी खरं बोलला.. ‘लग्न झालं, बायकोसोबत ऑफिसजवळच राहतो. आता आईवडील नसतात सोबत. आणि बायको सकाळी सकाळी उठून डबा करत नाही. तिला त्रास नको म्हणून गाडीवर जेवतो आजकाल..’ पवन त्याला ऑफिसमध्ये जाऊ म्हणाला. त्याने डबा आणला होता. पवनही लग्न करून आला होता. त्याच्या बायकोने डबा दिला होता. पवन आता रोज डबा घेऊन येणार होता. तो वीरेंद्रला म्हणाला, ‘आपण माझा डबा खात जाऊ.’ वीरेंद्र ‘नाही’ म्हणाला. त्याच्या लक्षात आलं, आपण फक्त सल्ले – सजेशन देतो, पवन सोल्युशन देणारा माणूस आहे. ‘माझा डबा खाऊ,’ असं आपण एकदा तरी म्हणायला हवं होतं. आपण उगीच स्वतःला फार केअरिंग समजत होतो.

(संपर्कः jarvindas30@gmail.com)



Source link