सातारा; पुढारी वृत्तसेवा : शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन केले जाते. सध्याच्या आधुनिकीकरणाच्या युगात देशी गायींची संख्या रोडवली आहे. मात्र पाटखळ, ता. सातारा येथे शेतकरी कुटुंबामध्ये आयोजित खिलार गायीच्या डोहाळे जेवण सोहळा आयोजित करून देशी गायींच्या संवर्धनाचा संदेश दिला आहे.
मशागत व शेतीपूरक कामांसाठी बैलांची संख्या वाढवण्यासाठी गोठ्यात एक तरी देशी गाय आवश्यक आहे. मात्र, हल्ली देशी गायींची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे शासनाकडूनच देशी गायी पालनासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर काही शेतकरी आवर्जून देशी गायी सांभाळत आहेत. या गायींपासून दूध संकरित गायींच्या तुलनेत कमी मिळत असले तरी जातीवंत खिलार बैलांची पैदास हा मुख्य उद्देश सफल होतो. पाटखळ येथील दादासाहेब शिंदे व कुटुंबीयांनी खिलार जातीची गायी पाळली असून कुटुंबातील सदस्याप्रमाणे तिची काळजी घेत आहेत. सध्या ही गाय गाभण असून तिचे डोहाळे जेवण साजरे करून गो माता पालनाचा संदेश या कुटुंबाने दिला.








