अकरावी प्रवेश प्रक्रियेबरोबरच कल चाचणीही प्रारंभ

0
1
अकरावी प्रवेश प्रक्रियेबरोबरच कल चाचणीही प्रारंभ



नाशिक – शैक्षणिक विश्वात दहावी आणि बारावी परीक्षेनंतर पुढे काय, हा प्रश्न सातत्याने पालक आणि विद्यार्थ्यांना पडत असतो. करिअरची यशस्वी वाट सापडावी, यासाठी मार्गदर्शन जरूरी असते. ही वाट शिक्षण विभागाच्या डायटकडून विद्यार्थ्यांना दाखवली जाते. यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू असताना कल चाचणीस आरंभ झाला. जिल्ह्यातील पाच केंद्रांवर ही परीक्षा २६ ते ३० या कालावधीत होत आहे.

बऱ्याचदा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेकांकडून विद्यार्थी, पालकांना वेगवेगळे सल्ले दिले जात असतांना या जुजबी ज्ञानामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाच्या डायट विभागाच्या वतीने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कल चाचणी घेण्यात येते. ही परीक्षा मुंबई, पुणे येथे होत होती. यंदा शिक्षण विभागाच्या सहकार्याने ती नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या केंद्रावर घेण्याचे ठरले. यासाठी जिल्ह्यातून ७०० विद्यार्थ्यांनी अर्ज केले. काही कारणास्तव नियोजन कोलमडल्याने परीक्षा अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावर होत आहे. सोमवारपासून ३१ मे पर्यंत ही परीक्षा वेगवेगळ्या केंद्रांवर होणार आहे. नाशिक, मालेगाव, येवला, दिंडोरी आणि देवळा या पाच केंद्रावर ही कल चाचणी होणार आहे. या पाच केंद्रावर जवळच्या तीन तालुक्यातील विद्यार्थी येतील. एकावेळी २० ते २५ विद्यार्थी ही चाचणी देणार असून तीन ते चार तास लागणार आहेत. यासाठी केंद्रावर दोन ते तीन जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्रावर विद्यार्थ्यांचा कुठल्या शाखेकडे कल आहे, हे पाहण्यासाठी चाचणी होणार आहे. यानंतर त्यांच्या प्रश्नपत्रिका तपासण्यात येतील. त्याचा अहवाल तयार करण्यात येईल, त्यानुसार विद्यार्थ्यांना समूपदेशन करण्यात येणार आहे. चाचणी झाल्यानंतर पुढील दोन दिवसात विद्यार्थ्यांना समूपदेशनासाठी बोलविण्यात येईल. या चाचणीमुळे विद्यार्थ्यांना आपला कल हा नियमित की व्यावसायिक शिक्षणाकडे, हे समजण्यास मदत होणार आहे.

विद्यार्थी आणि पालकांच्यादृष्टीनेही महत्वपूर्ण टप्पा म्हणजे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय, हा असतो. या टप्प्यावर विद्यार्थी आणि पालकांना व्यवस्थित मार्गदर्शन न मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या पुढील भवितव्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच शिक्षण विभागाकडून घेण्यात येणाऱ्या कल चाचणीला महत्व आहे.



Source link