
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रचारामुळे राजकीयरण तापू लागलं आहे. यंदा महाविकास आघाडी व महायुतीमध्ये थेट लढत असून दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. महायुतीची लाडकी बहीण योजना प्रचाराचा केंद्रबिंदू ठरत आहे. यावरून महायुतीचे नेते महिलांना दमदाटी तसेच वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. कोल्हापुरात खासदार धनंजय महाडिक यांच्यानंतर आणखी एका महिला नेत्यानं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सरकारनं १५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसूल करणार, असं वक्तव्य भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघारानी जाधव (Megharani Jadhav)यांनी केलं आहे. जाधव यांच्या वक्तव्याविरोधात कोल्हापुरातील राजकीय वातावरण कमालीचं तापल्याचं पाहायला मिळत आहे.