सातारा : कमिशनच्या वादातून मित्राचा खून | पुढारी

0
28


सातारा; पुढारी वृत्तसेवा :  जमीन विक्रीतील कमिशनच्या वादातून मित्राने मित्राचा खून केल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. संदीप विष्णू संकपाळ (रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. संशयितांनी संदीप यांचे अपहरण करून गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने संशयितांनी त्यांचा मृतदेह खंडाळ्यात पुरला. मात्र, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या खुनाचा छडा लावला.

शिवाजी नामदेव शिंदे (वय 43, रा. सैदापूर, सातारा), अक्षय अविनाश चव्हाण (28, रा. कोंडवे, ता. सातारा), विशाल शहाजी खावले (वय 21, रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) आणि सुमित अशोक भोसले (वय 30, रा. पाडेगाव, ता. खंडाळा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे यांनी तक्रार दिली आहे.

संदीप संकपाळ हे जमीन खरेदी-विक्री करणारे एंजट होते. कमिशनवरून संदीप व संशयित शिवाजी यांच्यात वाद झाला होता. या रागातूनच संदीप यांचा काटा काढण्याचा प्लॅन शिवाजी याने आखला. दि. 21 ऑगस्ट रोजी शिवाजी याने संदीप यांचे पोवई नाक्यावरून अपहरण केले. त्यानंतर त्यांना खंडाळ्यात एका अज्ञात ठिकाणी नेले. तेथेच त्यांचा गळा आवळून खून केला. दरम्यान, दोन दिवस झाल्यानंतरही पती घरी न आल्याने पत्नी जान्हवी संकपाळ यांनी शहर पोलिस ठाण्यात संदीप यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून या प्रकरणाचा तपास करण्यास सुरूवात झाली. संदीप व शिवाजी हे दोघे एकाच व्यवसायात असल्याने एकमेकांचे चांगले मित्र होते. बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी शिवाजी याच्याकडे चौकशी केली. मात्र, शिवाजी याने समाधानकारक उत्तरे दिल्याने सुरूवातीला पोलिसांना संशय आला नाही. मात्र, त्यानंतर घटनेच्यावेळी व घटनेनंतर असणार्‍या जागेवरून चौघांच्या चौकशीत विसंगती असल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांनी एकाला विश्वासात घेवून व खाक्या दाखवून बोलते केले. त्यानंतर दुसर्‍याच्या कॉल डिटेल्स काढून चौकशी केली. यानंतर दोन संशयितांनी निम्मी स्टोरी सांगितल्यानंतर मुख्य सूत्रधार शिवाजी याला ताब्यात घेवून चौकशी केली. तेव्हा आपणच कमिशनच्या वादातून खून केल्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, पोनि महेंद्र जगताप, पोनि संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अविनाश माने, पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार किशोर जाधव, श्रीनिवास देशमुख, राहूल घाडगे, सुजित भोसले, पोना पंकज मोहिते, निलेश जाधव, संतोष कचरे, संतोष घाडगे, इरफान मुलाणी, सुशांत कदम, मच्छिंद्र माने, प्रकाश सोनवले, संतोष भोसले यांनी सहभाग घेतला.



Source link