रसिक स्पेशल: दिवाळीची ‘अशीही’ खरेदी!

0
1
रसिक स्पेशल:  दिवाळीची ‘अशीही’ खरेदी!




झटपट श्रीमंत होण्याचा कुठलाही कायदेशीर मार्ग अस्तित्वात नाही. दरमहा शिस्तबद्ध गुंतवणूक करुन भविष्यातील आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करणे हा एकमेव चांगला आणि उजळ मार्ग आहे. त्यामुळे या दिवाळीत आजच्या गरजेपेक्षा उद्याच्या आवश्यकतेसाठी अशा प्रकारे थोडीफार वेगळी ‘खरेदी’ करायला काय हरकत आहे?
बघता बघता दिवाळी चार दिवसांवर आलीय. दिवाळीच्या खरेदीसाठी रस्ते ओसंडून वाहताहेत, वाहतूक कोंडी होऊ लागलीय. दरवर्षी दिवाळीच्या खरेदीचा मुख्य रोख कुटुंबाला नवे कपडे घेण्याकडे असतो. त्यानंतर होते सोने खरेदी. या दोन्ही प्रकारच्या खरेदीत भरपूर उत्साह दिसून येतो. याशिवाय, आता दिवाळीच्या सुट्यांत देशात किंवा परदेशात सहलीला जाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. विमान प्रवासाचे दर कितीही वाढले, तरी विमानातील गर्दी आणि पर्यटनाचा ओढा कमी होत नाही. प्रश्न असा आहे की, दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने हाती येणारा बोनस, वेतन, वेतनवाढ आणि अतिरिक्त कामाच्या मोबदल्यात किंवा प्रोत्साहनरुपी मिळणारी रक्कम या प्रकारच्या तात्कालिक खरेदीवर खर्चून पुन्हा पुढच्या वर्षीच्या अशाच ‘बोनस’ची वाट पाहायची की दरवर्षी दिवाळी खरेदीसाठी हमखास रक्कम हाती येईल, अशी सोय करुन ठेवायची? ‘कॅश फ्लो’चे महत्त्व जाणून घ्या
‘रीच डॅड पुअर डॅड’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचा लेखक रिचर्ड कियासाकी म्हणतो की, अशा अॅसेटस गोळा करा, ज्या पुढे कॅश फ्लो (रोकड प्रवाह) निर्माण करतील. म्हणजे गाठीला भांडवल असल्यास जमीन (अथवा प्लॉट) विकत घ्यायच्या ऐवजी एखादे दुकान विकत घ्या, ते भाडेकरूला देऊन मिळणाऱ्या भाड्याच्या रूपाने दरमहा घरात रोकड येत राहील. त्यातून आपली देणी भागवा. त्याचबरोबर शेअर्समध्ये भांडवल गुंतवा, म्हणजे लाभांशापोटी काही रक्कम घरी येत राहील. पुढे बोनस शेअर्स हाती आल्यास त्यातील काही विक्रीसाठी बाजूला ठेवा. असे सतत करून आपली देणी येणाऱ्या नफ्यातून किंवा व्याजातून भागत राहिली, तर पैसे कधीच कमी पडणार नाहीत. शेअर्सची निवड करणे कठीण जात असेल, तर म्युचुअल फंड आहेतच! त्यात भांडवल गुंतवावे. खरे तर हाच शाश्वत संपत्ती आणि समृद्धीचा मार्ग आहे.
आता हे सगळं करायचं कसं? तर त्यासाठी आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेचा पूर्ण लाभ घेता आला पाहिजे. तुम्ही म्हणाल, असं काय वेगळं आहे आपल्या अर्थव्यवस्थेत? तर त्याचं उत्तर आहे…
1. भारत हा जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. भारताने अलीकडेच चीनला मागे टाकून १.५ अब्ज लोकसंख्या ओलांडली आहे.
2. भारताची लोकसंख्या केवळ सर्वाधिक आहे असे नव्हे, तर लोकसंख्येत तरुणांचे प्रमाणही सर्वाधिक आहे. आज आपल्या देशाचे सरासरी वय २९ वर्षे आहे. २०५० पर्यंत ते अधिकाधिक ३८ वर्षापर्यंत वाढेल, असा अंदाज आहे. जितका तरूण देश, तितक्या त्याच्या गरजा जास्त! अर्थातच जगात सर्वांत मोठा खप असलेली आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारतात आहे.
3. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग सात टक्के आहे. त्या तुलनेत उर्वरित जग फार मागे पडते.
4. कित्येक उद्योगांत आपण जगामध्ये अग्रणी आहोत. इंग्रजी भाषा आत्मसात केलेले कुशल मनुष्यबळ ही आपली खासियत आहे.
5. चीनच्या दरडोई उत्पन्नाने २००७ मध्ये २६०० डॉलर पार केले आणि त्यानंतर पुढील पाच – सात वर्षांत ते दुप्पट झाले. आज ते १२ हजार ६०० डॉलर आहे. साहजिकच, अमेरिकेनंतर चीन हा दोन नंबरचा देश झाला आहे. भारताने २०२३ मध्ये २६०० डॉलर दरडोई उत्पन्नाचा टप्पा पार केला. पुढील पाच ते सहा वर्षांत हे उत्पन्न दुप्पट होईल. त्यातून अधिक सुबत्ता येईल. तसाच जगाचा इतिहास आहे.
6. सीमा सुरक्षित असलेला, दूरदर्शी नेतृत्वाचा देश सहजच परदेशी गुंतवणूक आकर्षित करतो. आज आपल्याकडे हेच होत आहे. त्यातून नवे तंत्रज्ञान भारतात येत आहे आणि देशातील प्रचंड मागणी पुरवत असतानाच, उच्च गुणवत्ता असलेली अनेक उत्पादने निर्यात करण्याची क्षमता भारतीय उद्योगात आली आहे. शेअर्समधील गुंतवणूक
आपल्याला या अर्थव्यवस्थेचा भाग होऊन, त्यातून स्वत:चा उत्कर्ष साधायचा असेल, तर त्यासाठी या दिवाळीची खरेदी थोडी वेगळी असायला हवी. चांगला नफा होत असलेला आणि दरवर्षी वाढता असलेला शेअर निवडून तो दिवाळीनिमित्त घेता येईल. नफा जसजसा वाढेल, तशी शेअरची किंमत वाढते. नव्या गुंतवणूकदाराने सहसा ओळखीचा शेअर घ्यावा. केवळ उदाहरण म्हणून पाहायचे तर आयसीआयसीआय बँकेचे देता येईल. या बँकेच्या शाखा सर्वत्र पसरलेल्या आपण पाहतो. क्वचित एखादे वाहन घेताना शोरूममध्ये ग्राहकाला गाठून त्याला कर्ज देणारे त्यांचे कर्मचारी पाहतो. हा शेअर २०२० मध्ये ४०० रुपये होता, तो आज १२५० आहे. असाच सामान्य माणसाच्या परिचयाचा दुसरा शेअर सुचवायचा तर तो म्हणजे भारती एअरटेल. आज घराघरात किमान दोन-तीन मोबाइल फोन असतात. आणि त्यासाठीची सेवा देणाऱ्या मोठ्या कंपन्या फक्त तीन आहेत. त्यापैकी भारती एअरटेल ही कंपनी आहे. हा शेअर देखील सप्टेंबर २०२० मध्ये ४२० रुपये होता, तो आज १६६० रुपये आहे. अर्थात, ही केवळ उदाहरणे आहेत. चांगला सल्लागार आणि बाजाराच्या अभ्यासाशिवाय अशा कोणत्याही शेअर्समध्ये गुंतवणूक करणे योग्य नसते. म्युच्युअल फंडाचा पर्याय
शेअर विकत घेणे कठीण वाटले तर त्याच ताकदीच्या विविध शेअर्समध्ये अभ्यासपूर्ण गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाकडे बघता येईल. या फंडातील गुंतवणूक अत्यंत सोपी आहे. अगदी ५०० किंवा हजार रुपये दरमहा ‘एसआयपी’च्या (सीप) माध्यमातून गुंतवणे सहज शक्य आहे. त्यासाठी चांगल्या, वैविध्यपूर्ण शेअर्समध्ये गुंतवणूक करणारी योजना हवी. नवखे असाल तर यासाठीही सल्लागाराची मदत घेणे योग्य ठरते. अगदी अठराशे रुपये दरमहा गुंतवल्यास वीस वर्षात वीस लाख रुपये हाती येऊ शकतात. हीच चक्रव्याढ व्याजाची गंमत आहे. भविष्यातील आपली सगळी स्वप्ने पूर्ण करण्याचा हाच मार्ग आहे. ‘ईटीएफ’ आणि गोल्ड बाँड
सोने हा भारतीयांच्या खास आवडीचा विषय आहे. सोने-चांदी खरेदी जरूर करावी, पण ती केवळ दागिन्यांची करताना विचारही करावा. कारण यात होणाऱ्या गुंतवणुकीतून भाव वाढला तरी नफा ताब्यात घेणार कसा? पत्नीच्या दागिन्यांचा किंवा सौभाग्य अलंकाराचा एखादा तुकडा विकण्यास आजही आपला समाज धजावत नाही, तशी आपली मानसिकताही नसते. मग कियासाकीचे सांगणेही ऐकायचे आहे आणि गुंतवणुकीतील वाढीव नफाही मिळवायचाय, तर सोन्या-चांदीतील गुंतवणूक काही प्रमाणात इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल पद्धतीनेही करायला हवी. शेअर बाजारात गोल्ड बीस आणि सिल्व्हर बीस या नावाने सोन्यात व चांदीत गुंतवणूक करणारे ‘ईटीएफ’ मिळतात. ही गुंतवणूक सुरक्षित तर असतेच; पण त्यात कुठलीही घट न होता बाजारभावाने ती कधीही थोडी थोडी विकत घेता अथवा विकता येते. सरकारचे गोल्ड बाँड तर प्रसिद्ध आहेतच. त्यावर २.५ टक्के वार्षिक व्याजही मिळते आणि मुदतीअंती विकताना होणारा नफा करमुक्त आहे. हे बाँडसुद्धा सरकारकडून थेट डीमॅट खात्यात विकत घेता येतात.
मित्रहो, झटपट श्रीमंत होण्याचा कुठलाही कायदेशीर मार्ग अस्तित्वात नाही. म्हणूनच फ्युचर्स, बिटकॉइन, ड्रीम इलेव्हन किंवा सट्ट्याचा रमी गेम अशा कुठल्याही गोष्टीच्या नादी न लागता, दरमहा शिस्तबद्ध गुंतवणूक करुन भविष्यातील आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करणे हाच एकमेव चांगला आणि उजळ मार्ग आहे. त्यामुळे या दिवाळीत आजच्या गरजेपेक्षा उद्याच्या आवश्यकतेसाठीही थोडीफार खरेदी करायला काय हरकत आहे? लक्ष्मीपूजनाला गोल्ड बीस घेऊन शाश्वत लक्ष्मीची आपल्या डीमॅट खात्यात प्रतिष्ठापना करा किंवा पाडव्याला एखाद्या चांगल्या फंडातील ‘सीप’ची मुहूर्तमेढ करा. अशा नव्या रुपातील खरेदीमुळे केवळ दिवाळीतच नव्हे, तर येणाऱ्या प्रत्येक दिवशी आपले घर संपन्नतेच्या प्रकाशात लखलखत राहील, हे निश्चित! भूषण महाजन
kreatwealth@gmail.com



Source link