मी महापालिका बोलतेय…: बाळासाहेबांच्या पहाडी आवाजानं साद घातली अन्… संभाजीनगर महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीनं अवघ्या राज्याचं राजकारण बदललं

0
85
मी महापालिका बोलतेय…:  बाळासाहेबांच्या पहाडी आवाजानं साद घातली अन्… संभाजीनगर महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीनं अवघ्या राज्याचं राजकारण बदललं


  • Marathi News
  • Opinion
  • Balasaheb’s Mountain Voice Resonated And… The First Sambhajinagar Municipal Corporation Election Changed The Politics Of The Entire State.

संजय वरकड- साहित्यिक, ज्येष्ठ पत्रकार10 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘माझ्या तमाम हिंदू बांधवानो, मातांनो आणि भगिनींनो…’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पहाडी आवाजातील हे शब्द मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या खच्चून भरलेल्या मैदानात घुमले अन् टाळ्या, शिट्ट्यांनी वातावरण भारून गेलं…

ही आहे शिवसेनेच्या छत्रपती संभाजीनगरमधील प्रवेशाची अन् शहराच्याच नव्हे तर राज्याच्या राजकारणाचा पोत बदलून टाकणारी गोष्ट…

१९८८ मध्ये मनपा निवडणूक जाहीर झाली तेव्हा शहरातील तुरळक लोकांनाच शिवसेना हे नाव माहिती होतं. पक्षावर निवडणूक लढवण्याची वेळ अचानक आली. स्थानिक नेत्यांच्या मदतीसाठी मुंबईहून मधुकर सरपोतदार, विलास भानुशाली शहरात आले. त्यांनी वेगवेगळ्या भागात बैठकांना सुरुवात केली. बैठकांनाही फारसे लोक येत नसत. निवडणूक जवळ आल्यावर त्यांनी वाॅर्ड सभा किंवा कॉर्नर मीटिंग घेतल्या. त्याचा थोडाफार फायदा होऊ लागला. प्रखर हिंदुत्व आणि मुस्लिमांना कडवा विरोध हे या प्रचाराचे सूत्र. मग काय, तरुण पोरं पाहता पाहता ‘जय महाराष्ट्र’ करू लागली. तिकीटवाटपाला सुरुवात झाली तेव्हा फारशी स्पर्धाही नव्हती. शिवसेनेचे तिकीट घेण्यास कुणी धजावत नव्हतं. तत्कालीन जिल्हाप्रमुख सुभाष पाटील, शहराध्यक्ष रमेश आमराव, परशुराम वाखुरे यांच्यासह मोजकेच पदाधिकारी शिवसेनेचे काम करत. सुरुवातीच्या काळातच चंद्रकांत खैरेही त्यांच्यासोबत आले.

मुंबईच्या नेत्यांनी इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्या तेव्हाचा प्रसंग तर खूपच रंजक आहे. सिल्लेखाना वाॅर्डातून कुणीही उमेदवारी मागितली नव्हती. तेव्हा मुलाखतकर्त्यांनी सहज विचारलं, ‘इथून कुणीच नाही का?,’ तेव्हा गांधीनगरचे इच्छुक सुग्रीव रिडलॉन म्हणाले, ‘साहेब मी लढतो दोन्ही वाॅर्डातून…’ त्यावर सर्वच हसायला लागले. त्यांना हेही माहिती नव्हतं की दोन्ही ठिकाणी जिंकल्यास एका ठिकाणचा राजीनामा द्यावाच लागतो. नंतर ते खासगीत म्हणाले,‘लढने को कोई नहीं है इसलिए बोला. वैसे भी कहा चून के आयेंगे…’

प्रचाराच्या धडाक्यामुळं शिवसेनेचं नाव आता घरोघरी पोहोचलं, पण वाॅर्ड मीटिंगपुरतं वातावरण तापायचं आणि पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती. नंतर जाहीर झालं, आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे येणार. ‘ज्वलंत हिंदुत्वाचा विचार’ ऐकण्यासाठी या सभेला येण्याचं आवाहन झालं. यामुळं वातावरण बदलायला लागलं. बाळासाहेबांची विक्रमी गर्दी खेचणारी सभा झाली. त्यांच्या कडव्या शब्दांनी सभा भारावली. त्या एका भाषणानं केवळ संभाजीनगरच नाही तर महाराष्ट्राचं राजकारण बदलून गेलं.



Source link