माझ्या हिश्श्याचे किस्से: सिनेमातील पात्रावरून घेतले होते ‘मनोजकुमार’ नाव

0
23
माझ्या हिश्श्याचे किस्से:  सिनेमातील पात्रावरून घेतले होते ‘मनोजकुमार’ नाव


रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

मला माहीत आहे की, ४ एप्रिलनंतर मनोजकुमारजींविषयी खूप लिहिले गेले आहे. पण, हिंदी फिल्म इंडस्ट्रीचा सदस्य आणि मनोजजींचा अनुयायी, चाहता या नात्याने त्यांच्याबद्दल लिहिणे ही माझी जबाबदारी आहे, असे मला वाटते.

मनोजजींचा जन्म पाकिस्तानातील शेखपुरा गावात झाला. त्यावेळी हे गाव भारतात होते. जिथे सूफी संत वारिस शाह यांचा जन्म झाला, तेच हे शेखपुरा. वडिलांनी त्यांचे नाव हरीकृष्ण गिरी गोस्वामी ठेवले. मनोजजी शिक्षणासाठी लाहोरला आले. किशोरवयातच त्यांनी दिलीपकुमार यांचा ‘शबनम’ सिनेमा पाहिला आणि ते त्यांचे चाहते बनले. दिलीपकुमारांचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की, त्यांनी आपणही अभिनेता बनायचे, असा निश्चय केला. ‘शबनम’मध्ये दिलीपकुमारांच्या पात्राचे नाव मनोज होते, त्यामुळे आपले नावही ‘मनोजकुमार’ ठेवायचे, असे त्यांनी ठरवून टाकले.

ईश्वराने त्यांची इच्छा पूर्ण केली. मुंबईत आल्यावर ते हीरो बनले. त्यांनी स्वत:ला मनोजकुमार हेच नाव दिले. परंतु, त्यांना खरी ओळख लाभली ती ‘भारतकुमार’च्या रुपात. यातूनच प्रेरणा घेऊन मी ‘गली गली चोर है’ या सिनेमात हीरो अक्षय खन्नाचे नावही ‘भारत’ असे ठेवले होते. मनोजजींनी भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांच्यावर ‘शहीद’ हा पहिला देशभक्तिपर सिनेमा बनवला. तो तयार होत असताना त्यांची भेट तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजींशी झाली. त्यांनी मनोजजींना, ‘एखादा चांगला सिनेमा बनवा,’ असे सुचवले. मनोजजींनी सांगितले की, मी ‘शहीद’ नावाचा सिनेमा बनवतोय, तो तुम्हाला खूप आवडेल. शास्त्रीजींनी त्यांना हा सिनेमा आपल्याला दाखवा, असे सांगितले. तो १९६५ चा काळ होता. सिनेमा तयार झाल्यावर मनोजजींनी दिल्लीत त्याचा ट्रायल शो ठेवला. पण त्याचवेळी देशात युद्ध सुरू झाले.

शास्त्रीजी म्हणाले, सिनेमा बघावा इतका वेळ माझ्याकडे अजिबात नाही. मनोजजी नाराज झाले. तुम्ही मला शब्द दिला होता, असे म्हणाले. शास्त्रीजी तयार झाले, पण ८-१० मिनिटेच सिनेमा पाहीन, असे त्यांनी स्पष्ट केले. मनोजजी त्यांच्या शेजारी बसले. सिनेमा सुरू झाला. ८-१० मिनिटांनी मनोजजींनी शास्त्रीजींकडे पाहिले, तर ते सिनेमात खूप गढून गेल्याचे दिसले. मग मनोजजींनी मागे इशारा केला आणि इंटर्व्हल न करता सिनेमा सुरू ठेवायला सांगितले. ८-१० मिनिटांसाठी आलेले शास्त्रीजी सिनेमा पूर्ण होईपर्यंत थांबले. तो संपला तेव्हा त्यांचे डोळे भरुन आले होते.

शास्त्रीजींनी मनोजजींचे खूप कौतुक केले. मध्यरात्री मनोजजींना पंतप्रधान कार्यालयातून फोन आला की, शास्त्रीजींना उद्या तुम्हाला भेटायचे आहे. मनोजजी सकाळी तिथे पोहोचले. शास्त्रीजी म्हणाले, ‘मी देशाला एक नारा दिला आहे.. जय जवान, जय किसान. त्यावर एखादा सिनेमा तयार होऊ शकतो का?’ मनोजजी उत्तरले, ‘का नाही? तुम्ही सांगितले आहे, तर या विषयावरील एखाद्या कथेचा मी नक्की विचार करतो.’ मनोजजी दिल्लीवरून ट्रेनने मुंबईला निघाले आणि त्या प्रवासातच त्यांनी ‘उपकार’चे संपूर्ण कथानक लिहून काढले. अशा प्रकारे शास्त्रीजींच्या सांगण्यावरुन ‘उपकार’सारखा सिनेमा तयार झाला. यावरुन मला शहीद भगतसिंग यांचा एक शेर आठवतोय…

मेरे जज़्बातों से इस कदर

वाकिफ है मेरी कलम

मैं इश्क़ भी लिखना चाहूँ,

तो इंकलाब लिख जाता है!

‘शहीद’ हा माझ्याही खूप आवडीचा सिनेमा आहे. मी मनोजजींना भेटलो, तेव्हा विचारले की, तुम्ही या सिनेमाचे नाव ‘शहीद’च का ठेवले? ते भगतसिंग असेही ठेवता आले असते.. त्यावर ते म्हणाले, ‘हो. भगतसिंग असेही नाव ठेऊ शकलो असतो. पण, माझ्यावर दिलीपकुमार यांचा प्रचंड प्रभाव होता. त्यांचा ‘शहीद’ हा सिनेमाही देशभक्तीवर होता आणि त्यातील त्यांचे काम मला फार आवडले होते. त्यामुळे मी या सिनेमाचे नावही ‘शहीद’ असेच ठेवले.

मनोजकुमारजी खूप उत्तम शायर, लेखक होते. मला आठवतेय, ऋषी कपूर ‘आ अब लौट चले’चे दिग्दर्शन करत होते. एकेदिवशी त्यांनी आपल्या घरी पार्टी ठेवली होती. मनोजजींनी ऋषीजींना एक गाणे लिहून दिले आणि ‘आ अब लौट चले’चे हे शीर्षकगीत मी तुमच्यासाठी लिहून आणलेय, असे सांगितले. ते गाणे मला नेमके आठवत नाही, पण ऋषीजींनी मला हे गाणे ऐकवले, तेव्हा सिनेमातील सगळी गाणी आधीच पूर्ण झाल्याचा आम्हाला खूप खेद वाटला. अन्यथा, ते गाणेही सिनेमात नक्की घेता आले असते.

मनोजजी किती प्रतिभावान लेखक होते, हे सांगणारी आणखी एक घटना आठवतेय. त्यांचे सहायक जगदीश यांनी ती मला सांगितली होती. नंतर मनोजजींनीही तिला पुष्टी दिली होती. त्यांच्या ‘क्रांती’ सिनेमाची कथा-पटकथा सलीम-जावेद यांची होती. माझ्या माहितीप्रमाणे, सलीम-जावेद जोडी सुपरस्टार बनल्यानंतरचा हा एकमेव सिनेमा होता, ज्यामध्ये त्यांचे डायलॉग नव्हते. ‘क्रांती’चे डायलॉग स्वत: मनोजकुमारजींनी लिहिले होते. त्याविषयी त्यांनी सांगितले होते… या सिनेमात प्रेम चोप्रांचे पात्र षडयंत्र रचून दिलीपकुमार यांच्या पात्राला इंग्रजांच्या हाती पकडून देते. दिलीपकुमारांना गजाआड करण्यात येते, तेव्हा प्रेम चोप्रा कोठडीला कुलूप लावून जिना चढून जातात आणि कॅमेरा दिलीपकुमार यांच्यावर स्थिरावतो.

नरीमन ईराणी या दृश्यासाठी तयारी करीत होते, तेव्हा दिलीपजी पंजाबीमध्ये मनोजजींना म्हणाले की, मनोज, मला वाटतेय की या दृश्यात मी केवळ नि:शब्द लूक न देता काहीतरी बोलले पाहिजे. मनोजजी म्हणाले, काय बोलणार? क्रांतीला अटक झालीय, त्यामुळे इथे बोलण्यासारखी काही जागाच नाही. दिलीपजी म्हणाले, असे काहीतरी हवे की हा माझा हिंदुस्थानी भाऊ आहे आणि यानेच स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतीला गजाआड केलेय.. मनोजजींनी सांगितले, ठीक आहे, मी विचार करतो. त्या दृश्यासाठी लायटिंगची व्यवस्था होईपर्यंत त्यांनी डायलॉग लिहून आणला. तो दिलीपकुमार यांना ऐकवला. या दृश्यात दिलीपकुमार म्हणतात… कुल्हाड़ी पर गर लकड़ी का दस्ता न होता, तो लकड़ी के कटने का रस्ता न होता.. आपले सिनेमे, गाणी यांसाठी मनोजजी कायम स्मरणात राहतील. आज त्यांची आठवण म्हणून ‘पूरब और पश्चिम’चे हे गाणे ऐका…

है प्रीत जहाँ की रीत सदा,

मैं गीत वहीं के गाता हूँ…

आपली काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link