
Indian Railway : दर दिवशी कोट्यवधींच्या संख्येनं प्रवाशांना अपेक्षित ठिकाणी पोहोचवणाऱ्या भारतीय रेल्वेसंदर्भाती बरीच माहिती आजही अनेकांपर्यंत पोहोचलेली नाही. फक्त रेल्वेच्या वेळा आणि रेल्वेमार्ग याव्यतिरिक्तसुद्धा या भारतीय रेल्वेशी संबंधित काही अशाही गोष्टी आहेत, ज्यांच्याविषयीची माहिती जाणून तुम्हालाही आश्चर्यच वाटेल.
जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यांपैकी एक असणाऱ्या या भारतीय रेल्वेनं अतिशय दुर्गम भागांपर्यंत मजल मारली आहे. पण, या साऱ्यमध्ये तुम्हाला देशातील सर्वात शेवटचं रेल्वेस्थानक कोणतं याची कल्पना आहे का? हा प्रश्न खरंतर बराच सोपा वाटत असला तरीही त्याचं उत्तर देणं मात्र बऱ्याचजणांना जमलेलं नाही.
देशातलं सर्वात शेवटचं रेल्वे स्थानक आहे….
सिंहाबाद, हे भारतातील सर्वात शेवटचं रेल्वेस्थानक आहे. पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील हबीबपुर भागात भारत आणि बांगलादेश सीमेवर हे स्थानक असल्याचं सांगितलं जातं.या स्थानकानंतर इथून रेल्वेमार्ग पुढे बांगलादेशमध्ये प्रवेश करतो. भारताचा इतिहास आणि शेजारी राष्ट्राशी असणारे व्यापारी संबंध याचंच हे प्रतीक आहे.
ब्रिटीश काळापासून हे स्थानक इथं असून, नेताजी सुभाषतंद्र बोस आणि महात्मा गांधी यांसारख्या महत्त्वाच्या व्यक्तींनीसुद्धा इथून प्रवास केल्याचं सांगितलं जातं. सुरुवातीच्या काळात इथून प्रवाशांची ये-जा व्हायची मात्र 1971 मध्ये बांगलादेशच्या निर्मितीनंतर या स्थानकाला मालगाड्यांचा ट्रान्झिटपॉईंट करण्यात आलं आणि 2011 नंतर नेपाळसाठी इथून वाहतूक सुरू झाली.
ब्रिटीशकालीन रचना आणि जुन्या उपकरणांमुळं आजही हे रेल्वेस्थानक अनेकांसाठीच आकर्षणाचा विषय ठरतं. मात्र इथून नियमित प्रवासी वाहतूक मात्र होत नाही. हे झालं देशाच्या एका टोकाला असणारं रेल्वे स्थानक.
हेसुद्धा वाचा : Ladki Bahin Yojna Latest News : सरकारची दमछाक? लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभागाचे 357 कोटी 70 लाख रुपये वळते
देशाच्या दुसऱ्या टोकाला म्हणजेच जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला इथं भारतातील सर्वात शेवटचं रेल्वे स्थानक असून ते काश्मीरला देशाच्या उर्वरित भागांशी जोडतं. जम्मू काश्मीरसारख्या भागाला देशाशी रेल्वेमार्गानं जोडण्यासाठी या स्थानकाच्या निर्मितीचा प्रकल्प हाती घेत अनेक बोगदे आणि पुलांच्या सहाय्यानं तो मार्गी लावण्यात आला.
भारताच्या पूर्व सीमेपाशी आसामच्या तिनसुकिया भागातही या दिशेला असणारं देशातील अखेरचं रेल्वेस्थानक आहे. लिडो असं त्याचं नाव. लुमडिंग- दिब्रुगड रेल्वे नेटवर्कवर हे स्थानक आहे. तर, पश्चिमेकडे गुजरातच्या कच्छमध्ये असणारं नालिया हे देशाच्या पश्चिम सीमेवरील शेवटचं रेल्वे स्थानक आहे. राहिला प्रश्न देशाच्या दक्षिणेकडील रेल्वे स्थानाचा तर, तामिळनाडूतील कन्याकुमारी हे या भागातील शेवटचं रेल्वे स्थानक आहे. हिंद महासागर, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर एकत्र येतात तिथं हे स्थानक असून यानजीकचा भाग पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध आहे.