बुकमार्क: जेव्हा एक डॉक्टरच ‘इच्छामरण’ मागतात…

0
2
बुकमार्क:  जेव्हा एक डॉक्टरच ‘इच्छामरण’ मागतात…


स्वप्नील जोशी11 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आयुष्यात कोणत्याही क्षणी बसलेली घडी विस्कटू शकते, तरीही काही प्रसंग निभावून न्यावे लागतात. आजाराच्या नेमक्या निदानाचा अभाव आणि परिणामी चुकीच्या उपचारांमुळे प्राण गमावावे लागलेल्या आपल्या डॉक्टर पतीच्या संघर्षाचा असाच कालपट संगीता भरत लोटे यांनी ‘इच्छामरण – एक सत्यकथा’ या आत्मकथनातून समोर आणला आहे. रुग्णसेवा ही ईश्वरसेवा मानली जाते. मात्र, स्वत: निष्णात डॉक्टर असलेल्या (स्व.) भारत लोटे यांच्याच वाट्याला याच्या अगदी विपरीत अनुभव आला. या कुटुंबातील सदस्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही जे असामान्य धैर्य, अदम्य साहस दाखवले त्याला खरोखरच तोड नाही.

सर्वसामान्य कुटुंबाच्या बाबतीत घडलेली ही एक सत्यकथा आहे. विवाहानंतर कोकणातील ओणी या लहानशा गावात डॉ. भारत यांच्यासोबत लेखिकेचा संसार सुरू होतो. स्वत:च्या आयुष्याबद्दल दोघेही अत्यंत उद्दात्त आणि समंजस दृष्टिकोन बाळगून असतात. वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करताना कित्येकदा अपुऱ्या संसाधानांमुळे डॉ. भारत यांना आहे त्या परिस्थितीत उपचार करावे लागत. मात्र तरीही रुग्णाला जीवनदान देण्याचा एकमेव ध्यास उराशी बाळगत ते सेवा देत राहतात. पावसाळ्यात वाट निसरडी होते, रुग्णाला डोंगरावरून खाली उतरवणे अशक्य होते, अशा परिस्थितीतही ते स्वत: रुग्णाच्या घरी जाऊन उपचार करत. एव्हाना या दाम्पत्याच्या संसारवेलीवर जय आणि प्रतीक ही गोंडस फुले उमलतात.

काही वर्षांपूर्वी दुरवस्थेत असलेल्या या गावातील आरोग्य केंद्राला डॉ. भारत लोटे यांच्यामुळे नवसंजीवनी मिळते. रुग्ण मोठ्या विश्वासाने तिथे येत आणि उपचार घेऊन जात. डॉक्टरांचे काम इतके चोख की, रुग्णालयातील औषधे, स्वच्छता, आर्थिक व्यवहार नेटकेपणे पाहतानाच, लसीकरणासह सरकारच्या आरोग्य योजना ते समरसून लोकांपर्यंत पोहोचवतात. त्यांच्या या समर्पित सेवाकार्याची दखल पंचायत राज समिती घेते आणि राज्य शासनाचा २००५-०६ चा ‘डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार’ त्यांना जाहीर होतो. त्या अगोदर त्यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेचा डॉ. र. धों. कर्वे पुरस्कारही मिळालेला असतो. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या डॉ. भारत यांनी मोठ्या कष्टाने ‘एमबीबीएस’चे शिक्षण पूर्ण केलेले असते. त्यामुळे समाजव्यवस्थेत माणसाला माणूस म्हणून महत्त्वाचे स्थान आहे, याची त्यांना पूर्ण जाणीव असते. ‘निष्काम कर्मयोग’ हीच खरे तर त्यांच्या जगण्याची प्रेरणा!

दिवसामागून दिवस जात असतात. लेखिका वर्णन करते त्याप्रमाणे… कधी सुखाचे पांघरूण, तर कधी दु:खाची झालर घेऊन संसाराची २५ वर्षे पूर्ण होतात. अशातच अचानक वीज कोसळावी त्याप्रमाणे एक दिवस पोटदुखीचं निमित्त होतं आणि डॉ. भारत यांना स्वादुपिंडाच्या आजाराने ग्रासल्याचे निदान होते. पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात त्यांच्यावर अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडते. लेखिका पतीच्या उपचारांसाठी पैशांची कशीबशी सोय करते. पण, कोणतेही संकट एकटे येत नाही. शस्त्रक्रिया पार पडते खरी, पण डॉक्टरांच्या प्रकृतीत म्हणावे तसे सकारात्मक बदल दिसत नाहीत. नक्की काय झाले असावे, याचा अंदाज घराच्या मंडळींनाही येत नाही.

डॉक्टरांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चाललेली. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात ‘गरिबांचा डॉक्टर’ म्हणून ज्यांनी शेकडो रुग्णांना आजारातून बाहेर काढले, त्या डॉक्टरांच्याच आजाराचे नेमके निदान होत नव्हते. पुढच्या ऑपरेशननंतर ते बरे होतील, अशी शाश्वती रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर देत असतात.

कोणताही रुग्ण एखाद्या मोठ्या रुग्णालयात खूप विश्वासाने भरती होत असतो. “आपण निश्चित बरे होऊ” ही आशा त्यांना तिथे घेऊन येते आणि ती त्याला जगवतही असते. इथे तर एक डॉक्टरच रुग्णशय्येवर होते. तरीही हे असे काय झाले? तीन ऑपरेशन होऊनही ते बरे का होऊ शकले नाहीत? नेमके कुठे आणि काय चुकले? अत्यवस्थ, असहाय अवस्थेतील या डॉक्टरांनाच दोन-अडीच महिन्यांनंतर ‘इच्छामरण’ का मागावे लागले? रुग्णसेवेसाठी गौरवलेल्या डॉक्टरांची ही स्थिती असेल, तर सामान्यांचे काय? अशा अनेक प्रश्नांचा कल्लोळ उठलेला असतानाच डॉ. भारत जगाचा निरोप घेतात…

संगीता आणि दोन्ही मुलांसाठी हा काळ प्रचंड जिकीरीचा होता. त्यांनी हा धक्का कसा सहन केला असेल, याची कल्पनाही करवत नाही. वेळेत आणि योग्य उपचार किती महत्त्वाचे असतात, हे या पुस्तकातून स्पष्ट होतेच; पण ते न मिळाल्याने इच्छामरण मागावे लागणे, यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. पती निधनाच्या मोठ्या धक्क्यातून सावरत लेखिकेने खूप धैर्याने ही वास्तवकथा वाचकांसमोर उभी केली आहे. मदतीबाबत सरकारने दाखवलेली अनास्था.. संकटकाळी विरुद्ध दिशेने फिरणारे जवळच्या माणसांचे खरे चेहरे.. वैद्यकीय खर्चाचा न पेलवणारा भार आणि त्या बदल्यात अनुभवलेली उपचारातील हलगर्जी… परिस्थितीपुढे हतबद्ध होऊन आकाशाकडे खिन्नपणे पाहणाऱ्या लेखिकेच्या डोळ्यांत यापैकी नक्की काय असेल..? कदाचित या सगळ्याच गोष्टींचा एक अक्राळविक्राळ कोलाज असावा.. कधीही धूसर न होणारा…

पुस्तकाचे नाव : इच्छामरण – एक सत्यकथा लेखिका : संगीता भारत लोटे प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाउस पाने : २८६, किंमत : रु. ३५०

(संपर्कः swapnilkashi566@gmail.com)



Source link