
अभिनेता दिलीप कुमारने दिले चळवळीला अनोखे बळ
मुस्लिम ओबीसीची चळवळ उभारत असताना शब्बीर अंसारी यांनी कुणाचाच मुलाहिजा ठेवला नाही. अस्वलवाले मुस्लिमांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातारा जिल्ह्यातील कऱ्हाडमध्ये १००० अस्वल व त्यांचे मालक घेऊन सरकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. सांगली जिल्ह्यात जत येथील तहसील कार्यालयावर मुस्लिम माकडवाले यांच्या ओबीसी प्रमाणपत्र मागणीसाठी माकडांना घेऊन मोर्चा काढला होता. सोलापूर जिल्ह्यात करमाळा तहसीलमध्ये बिनविषारी व विषारी सापाचे (दात काढलेल्या) सोडण्याचे आंदोलन त्यांनी केले होते. हे सर्व करत असताना त्यांचा राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांशी सतत संपर्क असायचा. यात कर्पुरी ठाकूर पासून सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यापासून शरद यादव ते गोपीनाथ मुंडे, सुधाकर गणगणे, नाना पटोले, रामविलास पासवान, छगन भुजबळ, नवाब मलिक, विलासराव देशमुख, ड. भालचंद्र मुणगेकर, हसन कमाल, जॉनी वॉकर (काझी बदृद्दिन), कॉम्रेड विलास सोनवणे आणि हिंदी सिनेमाचे महानायक दिलीप कुमार… असे कितीतरी महान नेते, अभिनेते त्यांच्या संपर्कात आले.







