
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत अन्य पाच मंत्र्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या प्रकरणात फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संगनमत केल्याचा आरोप अवामी इत्तेहाद पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार शेख अब्दुल रशीद उर्फ इंजिनीअर रशीद यांनी बुधवारी केला. हे पाऊल उचलण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी अब्दुल्ला कुटुंबीयांशी सल्लामसलत केली होती, असा दावा रशीद यांनी केला आहे. काश्मीर खोऱ्यात नॅशनल कॉन्फरन्सला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी भाजपने मदत केली, असा खळबळजनक दावाही इंजिनीअर यांनी केला आहे.







