देश – परदेश: सर्वात आनंदी देशाची रहस्ये

0
2
देश – परदेश:  सर्वात आनंदी देशाची रहस्ये


  • Marathi News
  • Opinion
  • Secrets Of The Happiest Country Divya Marathi Rasik Article By Dnyaneshwar Mule

ज्ञानेश्वर मुळे9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

फिनलंडमधील नागरिकांना आयुष्याची कोणतीही २१ वर्षे शिक्षण आणि जीवनभर आरोग्यसेवा मोफत मिळते. ज्या देशात शिक्षण आणि आरोग्यसेवा नि:शुल्क आहेत, तो देश जगात सर्वात आनंदी असणे अपरिहार्य आहे.

“फिनलंडमध्ये विश्वास (ट्रस्ट) हा परवलीचा शब्द आहे. तिथे नागरिक प्रशासनावर आणि प्रशासन नागरिकांवर विश्वास ठेवते. नागरिकही परस्परांवर विश्वास ठेवतात.’ दिल्लीतील फिनलंडच्या दूतावासातील अधिकारी आम्हाला सांगत होता.. ‘आमच्या आनंदी असण्याचे ते एक महत्त्वाचे कारण आहे.’ ते ऐकताना मी भारतीय जनतेच्या विचार करण्याच्या पद्धतीत ‘विश्वास’आला तर काय होईल, याचा विचार करत होतो. मनातून उत्तर आले की, विश्वासार्हता ही आपल्या समाजाची फार मोठी उणीव आहे. दुर्दैवाने शासन – जनता, दुकानदार- ग्राहक, मालक – नोकर, शेजारी – पाजारी यांच्यातील विश्वासाचा अनुशेष हा विकासाच्या अनुशेषापेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे, हे आपल्याला अजून कळलेले नाही. एकदा विश्वास उडाला की, समाजाची प्रगती खुंटते, हे आपल्याला समजत नाही.

या पार्श्वभूमीवर फिनलंडच्या एका आठवड्याच्या वास्तव्यात काय अनुभवले, ते सांगतो. फिनलंडकडे क्षेत्र भरपूर असले, तरी लोकसंख्या फक्त ५६ लाख आहे. या देशाकडे फारशी खनिज संपत्ती नसली, तरी वनसंपत्ती दृष्ट लागावी इतकी आहे.देशाचा ७४% भाग वृक्षांनी बहरलेला आहे. या देशात प्रवास करताना, तिथल्या शहरात झाडे नाहीत, तर ही गावे आणि शहरेच वनात वसली आहेत, असे भासते. मोबाइल फोन आले, तेव्हा सर्वांना परिचित झालेली नोकिया कंपनी इथलीच. नोकियामुळेच अनेक भारतीय, विशेषत: मराठी मंडळी इथे आली आणि स्थायिक झाली आहेत.

या आनंदी देशात ५०% पेक्षा अधिक आयकर आहे, हे ऐकून चक्रावलो. आणि इथले सर्व लोक आनंदाने हा कर भरतात, हे ऐकून मोठा धक्का बसला. मात्र, फिनलंडमधील कराचा प्रत्येक युरो हा त्या देशाच्या प्रगतीसाठी कारणी लागतो. ती प्रगती आपल्या डोळ्यांना दिसते, अनुभवता येते. गाव असो वा शहर, छोटी वस्ती असो वा मोठी; सर्वत्र अशी स्वच्छता की जिची आपल्याला कल्पनाही करता येत नाही. रस्ते, मग ते महामार्ग असो किंवा गल्लीबोळातील छोटे रस्ते असोत; सगळे इतके छान की प्रवासाचा शीण वाटणे शक्य नाही. पाणी सर्वत्र इतके उत्तम की, कुठेही गेलात तरी नि:शंकपणे नळाचे पाणी पिता येते.

अशा व्यवस्थेत कर देण्याविषयी कुणाचीच तक्रार नसते. कर चुकवावा असे इथल्या लोकांच्या मनात येत नाही. इतकेच नव्हे, तर इथे कोणत्या व्यक्तीने किती कर भरला, हे सहज समजू शकते. शासन करदात्यांची नावे आणि त्यांनी किती कर भरला, याची माहिती एका डिरेक्टरीतून प्रसिद्ध करते. त्यात ज्यांनी जास्तीत जास्त कर दिला, त्यांच्या नावाने सुरूवात असते आणि हळूहळू कमी कर देणाऱ्यांची नावे येतात. प्रत्येक व्यक्तीला आपले नाव अधिकाधिक वरती यावे, अशी इच्छा असते, जेणेकरून आपण देशावर किती प्रेम करतो, हे दाखवण्याची संधी मिळते. भारतात कर देणाऱ्या नागरिकांची संख्या लाजेने मान खाली जावी, अशी आहे.

पण, हे लोक सर्वात आनंदी का आहेत, याची आणखीही कारणे आहेत. इथल्या नागरिकांना आरोग्यसेवा, मग ती कितीही महागडी असो, संपूर्ण जीवनभर मोफत मिळते. शिक्षणाची सुविधा तर अशी की, प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्याची २१ वर्षे पूर्ण शिक्षण मोफत घेऊ शकते. हो, २१ व्या वर्षापर्यंत नव्हे, तर आयुष्यात केव्हाही २१ वर्षे शिक्षण घेण्याचं या लोकांना स्वातंत्र्य आहे. याचा अर्थ एखादी व्यक्ती कधीही, कोणताही शिक्षणक्रम घेऊ शकते. इथे व्यवसाय किंवा नोकरी सहजासहजी बदलता येते. नोकरी करणाऱ्याला कंटाळा येऊन तो एखाद्या सुपर मार्केटमध्ये सेल्समन बनून जातो. ज्या देशात आरोग्य आणि शिक्षण संपूर्णपणे नि:शुल्क आहे, तो देश जगात सर्वात आनंदी असणे अपरिहार्य आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशातही अशी व्यवस्था नाही.

अशा समाजव्यवस्थेचा एक अत्यंत सुंदर परिणाम म्हणजे, इथले लोक आपल्याप्रमाणे महत्त्वाकांक्षी नाहीत. करिअर बनवण्याचे आणि जीवनात अधिकाधिक वरची पदे किंवा खूप पैसे मिळावेत, यासाठी इथले लोक एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत नाहीत. याहून गंमत म्हणजे, वरच्या पदाचा कंटाळा आला की, अनेक लोक त्या कामातला ताण न आवडल्याने खालची पदे आनंदाने स्वीकारतात. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे, इथले पूर्वीचे राष्ट्राध्यक्ष सध्या एका बँकेत अधिकारी आहेत. मी मुद्दाम विचारले की, ते बँकेत काम करतात की, केवळ बँकेचा ब्रँड वाढावा, यासाठी नाममात्र काम करतात? त्यावर मला उत्तर मिळाले, ‘ते सर्वसाधारण अधिकाऱ्याप्रमाणे दिलेले काम नियमितपणे करतात, नियमितपणे कार्यालयात येतात.’ आपल्यासारख्याला हे सगळे प्रकरण धक्का देणारे होते.

मी उत्तरेच्या रोवेनेमिनी शहरापासून दक्षिणेकडील हेलसिंकी या राजधानीच्या शहरांपर्यंत प्रवास केला. मला हेच जाणवलं की, इथे फार मोठ्या आवाजात कोणी बोलत नाही.भांडण सोडाच; पण आवाजात एक मार्दव आहे, नम्रता आहे. हे लोक फारसे बडबडे नाहीत आणि अनेक अर्थाने संकोची स्वभावाचे आहेत. निसर्गाने यांना भरभरून दिले आहे. साधारण दोन लाख तलाव या देशाला अप्रतिम सौंदर्य प्रदान करतात. नद्या असोत किंवा तलाव; तिथे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण आढळत नाही. जशी स्वच्छ माणसं, तसाच इथला स्वच्छ, शुद्ध आणि कोमल असा निसर्ग.

हेलसिंकीमध्ये मला काश्मीरचा एक युवक भेटला. तो वेटरचं काम करतो. तो म्हणाला, ‘हे रामराज्य आहे. मी सांगलीच्या वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमधून ग्रॅज्युएट झालो आणि इथं येऊन मुद्दाम वेटरची नोकरी घेतली. वेटर आणि इंजिनिअरच्या पगारात फारसा फरक नाही. आणि इथे फक्त चार तास काम असते. वर्षातून तीन महिने सुटी आणि १३ महिन्यांचा पगार मिळतो. वेटरच्या कामात बऱ्यापैकी धावपळ करावी लागते आणि मी फिट राहतो. आता मला पीएच. डी. करायची आहे. त्यासाठी इथले गव्हर्नमेंट मला पूर्ण फेलोशिप देईल.’ गंमत म्हणजे, हा काश्मिरी युवक बाळासाहेब ठाकरेंना खूप मानतो, कारण त्यांच्या प्रयत्नाने विस्थापित काश्मिरींना महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेजांमध्ये एक जागा आरक्षित करण्यात आली. ‘उस आदमीने मेरा जीवन बनाया, और मराठी लोगोंका प्यार मुझे मिला..’ हे तो भावूक होऊन सांगत होता.

हेलसिंकीमध्ये शीतल महाजन आणि वैभव राणे हे मराठी जोडपे त्यांच्या दोन मुलांसह वास्तव्य करते. उंच आकाशातून उडी मारण्याचे सगळे जागतिक विक्रम शीतलने मोडले आहेत. तिच्या नावावर अनेक उच्चांक आहेत. बँकेत काम करणारा पती वैभव आणि किशोरावस्थेतले वृषभ आणि वैष्णव या सर्वांनी मला उत्तम आदरातिथ्याबरोबरच मराठी भोजनाचा आस्वाद देऊन खुश केले. त्यानंतर जड अंत:करणाने मी या आनंदी देशाचा निरोप घेतला.

(संपर्कः dmulay58@gmail.com)



Source link