
शेतीत काम करणं ही लाज वाटण्याची गोष्ट नाही. त्याचा अभिमान वाटायला पाहिजे. पण, तसं कुणाला आज वाटत नाही. त्यामुळं शेतीत मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. परवा आमच्या जवळच्या नांदेड जिल्ह्यात रोजगारी बायांना शेतात घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत पडला आणि सात जणींचा जागीच मृत्यू झाला. मालेगावजवळच्या शेतात सकाळी सात वाजता हा अपघात झाला. म्हणजे या बायकांना त्यांच्या गावावरून सकाळी किती वाजता निघावे लागले असेल? रोजगारासाठी त्यांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात का जावे लागले? त्यांच्या गावात रोजगार उपलब्ध नव्हता काय? त्या जात असलेल्या गावात रोजगारी बाया उपलब्ध नव्हत्या काय, या प्रश्नांसोबतच, माणसाचा जीव किती स्वस्त आणि शेती करणं किती महाग झालंय, असा परस्परविरोधी प्रश्नही या घटनेतून निर्माण झालाय. रोजगारी बायांना असे ट्रॅक्टर किंवा ऑटोरिक्षाने शेतात न्यावे आणि घरी नेऊन सोडावे लागते. जवळपास रोजगारी बाया मिळत नाहीत आणि दूरच्या बायांचा वेळ वाचवायचा असेल, तर असे वाहनाने आणण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. रोजंदारीने काम करणारे बहुतांश लोक आता गावं सोडून शहरातल्या झोपडपट्ट्यांतून स्थायिक झाले आहेत. तिथं शहरी जीवन जगायला मिळतं, झोपडपट्टीत अनेक सवलती मिळतात, समूहाने एकत्रित राहता येतं, गावातल्या इतकी जातीयवादाची झळ इथं पोहोचत नाही.. अशा अनेक कारणांमुळं गावोगावच्या कष्टकऱ्यांनी शहरात स्थलांतर केलं आणि त्यातून त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. ठीक आहे. शेतमजूर शेतीतून बाहेर पडला आहे. पण, शेतकरी तर शेतीतच आहे ना? तो तरी कुठं शेतीत काम करतो आहे? मजुरांना शेतीत काम करायचा कंटाळा येतोय, तसाच तो शेतमालकांनाही येतो आहे. स्वतःच्या शेतात काम करण्याची लाज वाटत असल्याने हा प्रश्न जास्त गंभीर झाला आहे. शेतकऱ्याच्या घरातली सगळी माणसं शेतात राबू लागली, तर कदाचित त्यांना शेतमजुराची गरज पडत नाही. आमच्या लहानपणी घरातली सगळी माणसं शेतात राबायची. शाळा संपल्यावर सकाळ-संध्याकाळ आम्हीही शेतात कामं करायचो. तुम्ही शेतात गेलात की शेत तुम्हाला आपोआपच काम सांगतं, असं जुने लोक म्हणायचे. पण, आजकाल कुणी शेतात जायलाच राजी नाही. त्यामुळं त्यांना शेतातली काम काय माहीत असणार? मग निव्वळ शेतमजुरांना दोष देण्यात काय अर्थ आहे? पूर्वी ज्यांच्या घरी शेती आहे, त्यांच्या शेतातली काम संपली की, त्या घरच्या बाया आणि माणसं दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतात कामाला जायची. अर्थात, रोजगार म्हणूनच ते कामाला जायचे. कधी सावड म्हणून एकमेकांच्या शेतात मदत करू लागायला जायचे. काडीकाडी अन् पैसापैसा जमवावा, असं तेव्हा प्रत्येकालाच वाटायचं. घरातल्या सगळ्या माणसांनी असं केलं तर सगळ्या घराला आधार मिळतो, घर पुढं येतं, असं मानलं जायचं. काही घरातली माणसं अर्धपोटी राबताना मी पाहिली आहेत. त्या माणसांनी राबराबून थोडाफार पैसा मागं टाकून पुष्कळ शेती घेतल्याचंही मी पाहिलं आहे. आणि शेतीचा एक एक तुकडा विकून, ऐशआरामात जगणारी आणि एक दिवस आत्महत्या करणारी माणसंही पाहिली आहेत. शेतीत काम करणं ही खरं तर लाज वाटण्याची गोष्ट नाही. त्याचा अभिमान वाटायला पाहिजे. पण, तसं कुणाला आज वाटत नाही. त्यामुळं शेतीत मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. केवळ मजुरांनाच नव्हे, तर शेतकऱ्यालाही शेतीतून बाहेर पडायचं आहे. शेती कुणालाच नकोशी झाली आहे. पण, ते एक-दुसऱ्यावर निमित्त लोटत आहेत. शेती स्वत:च्या मालकीची नसल्यामुळं मजुरांना ती कधीही सोडून देता येते. पण, शेतकऱ्याला तशी ती चटकन् सोडून दुसरा पर्याय शोधता येत नाही. याबाबतीत मजूर आता भाग्यवान आहेत. पूर्वी बिचारे काहीच पर्याय नसल्यामुळं गुलामासारखे राबायचे, आता त्यांना त्याची गरज उरलेली नाही. लहानपणी मी पाहिलं आहे की, आमच्या गावात, शेतात रोजानं काम करणाऱ्या बायांचे जत्थे असायचे. त्यातली एक जण त्यांची प्रमुख असायची. ती सगळा व्यवहार ठरवायची. गुत्तं घ्यायचं असेल, तर ते कसं घ्यायचं, ते तीच ठरवायची. रोजानं जायचं असेल, तर किती बाया हव्यात, कामाचं स्वरूप काय, तेही तीच ठरवायची. तिच्यावर इतर सगळ्या बाया विश्वास टाकायच्या. शेतमालकालाही प्रत्येक बाईला भेटायची, बोलायची गरज पडत नसे. ती प्रमुख असलेली बाई भेटली आणि तिला बोललं, तिनं शब्द दिला की काम मार्गी लागायचं. यामध्ये सर्व जाती-जमातीच्या बाया असत. त्यांचा जत्था एकदा शेतात शिरला की शेतकरी बिनघोर होत असे. कारण तिथल्या कामाची सगळी जबाबदारी त्या घेत असत आणि अंगमेहनतीनं काम पूर्ण करत. अलीकडे समाजमाध्यमांवर मनीषा हजारे यांच्या रील खूप लोक पाहतात. त्या ऊसतोड कामगार आहेत. तोडणीचा हंगाम संपला की, आपल्या गावाकडं येऊन त्या शेतात मजुरी करतात. तिथले व्हिडिओ टाकतात. त्यांचे पती, दोन मुलं, एक मुलगीही शेतात काम करते. दोन मुलांनी शिक्षण सोडून आई-वडिलांना मदत म्हणून शेतात काम करायला सुरूवात केली. त्यांना शिक्षणाची इच्छाही नव्हती. मुलगी शिकते आहे. तरीही सगळे शेतात काम करू लागतात. त्यांनी दोन बैलजोड्या घेतल्या आहेत. ज्या शेतकऱ्याला शेतात ट्रॅक्टर लावणं परवडत नाही, ते या बैलजोडीने मशागत करून घेतात. त्या बैलांचा रोजगारही त्यांना मिळतो. ही माणसं कुणाविषयी तक्रार करत नाहीत. खूप मेहनत करतात अन् चांगलंचुंगलं खाऊन आनंदानं जगतात. त्या सगळ्या चित्रफिती समाजमाध्यमावर टाकतात. जगण्याची खरी कला त्यांना समजली आहे. लोकांना ते आवडतं. त्याचा हेवा वाटतो. पण, तसं वागायला, जगायला जमत नाही. खरं तर सगळ्यांनी तशी अंगमेहनत करायला सुरूवात केली, तर शेतीतले प्रश्न मजुरांपुरते तरी नक्कीच संपतील. बाकी समाज आणि सरकारकडून शेतमालाला किफायतशीर भावाची अपेक्षा करता येत नाही. कारण शेतमाल ही जीवनावश्यक गोष्ट आहे, त्यामुळं ती स्वस्तच राहिली पाहिजे, असं सर्व सरकारांना, समाजसेवकांना आणि लोकांनाही वाटतं. शेतीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू स्वस्तात मिळाव्यात, असं मात्र कुणालाही वाटत नाही.
शेतात रोजगारानं काम करणाऱ्या बायकांचे चित्रण करणाऱ्या कितीतरी कविता, कथा, कादंबऱ्या मागच्या पिढीतल्या ग्रामीण साहित्यिकांनी लिहिल्या आहेत. आता कुणी असं काही लिहू म्हटलं, तर त्यांना विषयच मिळणार नाही. कारण रोजगारी बाया मिळणे हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कथा लिहायची असेल, तर रोजगारी बायांवर नव्हे, तर रोजगारी बाया मिळत नाहीत, या प्रश्नावर लिहावी लागेल. अशा बिकट परिस्थितीत, ट्रॅक्टर विहिरीत कोसळून सात बायांचा जागीच मृत्यू होण्याच्या घटनेवरही कथा-कविता लिहिल्या जातील. खरं तर आता शेतीचाच विहिरीत पडून मृत्यू व्हायची वेळ आली आहे… (संपर्कः inbhalerao@gmail.com)
Source link