
मुंबईतील चेंबुरच्या सिद्धार्थ कॉलनीतील एका दुमजली घराला भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत गुप्ता कुटूंबातील ३ लहान मुलांसह सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण मुंबई हळहळत असताना तसेच घर पेटत असताना मदतीच्या बहाण्याने आत आलेल्या कोणीतरी या घरातील लाखोच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. गुप्ता कुटुंबाच्या घरातील कपाटातून लाखोंची रोकड आणि १० तोळे सोने चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. चेंबुरच्या दुर्घटनेत माणुसकी आगीत जळून खाक झाल्याचे चित्र पहायला मिळाले. घर पेटत होत आणि मदत करणारेच घरं लुटत होते.