गोष्ट सांगतो ऐका…: अडाणी माणूस

0
16
गोष्ट सांगतो ऐका…:  अडाणी माणूस


अरविंद जगताप11 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

उत्तमराव आल्याशिवाय मृतदेह उचलायचा नाही, असं त्यांच्या लोकांचं ठरलेलं होतं. विश्वास बोलूनचालून अडाणी माणूस. मग त्याच्या घरच्यांना तरी कोण विचारणार?

अडाणी त्याचं नाव नव्हतं. विश्वास असं नाव होतं. पण, त्याला ओळखीचे लोक माघारी अडाणी म्हणायचे. जमिनीच्या व्यवसायात प्रचंड पैसा कमवला होता विश्वासने. जमिनी विकत घेणे आणि विकणे याची त्याला कलाच होती. खूप ठिकाणी नोकरी करून विश्वास वैतागला होता. अशी नोकरी करून आपलं काही होणार नाही, याची त्याला जाणीव झाली आणि पहिल्यांदा त्याने आपली कोरडवाहू शेती विकून टाकली. लोकांनी खूप नावं ठेवली. पण, ज्यात काही येतच नव्हतं, ती गोष्ट ठेऊन विश्वास तरी काय करणार होता? तरीही आहे ती शेती विकून टाकल्याने लोक त्याला अडाणी म्हणू लागले.

विश्वास फार शिकलेला नव्हताच. म्हणजे त्याला सही करता यायची, पण वाचता यायचं नाही. शेती विकून त्याने शहरात एक छोटा प्लॉट घेतला. शहराच्या बाहेर खरं तर. पण, नशीब असं होतं की, तिथं एक मोठी कंपनी आली. त्यांना विश्वासचा प्लॉट अडचणीचा होता. कारण त्या कंपनीच्या प्लॅनप्रमाणे हा प्लॉट नेमका त्या कंपनीच्या गेटपाशी येत होता. विश्वासला बळेच प्लॉट विकायला लावला त्या लोकांनी. पण, विश्वास आधी नाही, नाही म्हणत राहिला म्हणून खूप चांगली रक्कम मिळाली.

पुढं विश्वासने ज्या जमिनीवर हात ठेवला तिचं सोनं झालं. बघता बघता विश्वास करोडपती झाला. त्याला पैसे मोजता आले नाहीत किंवा बँकेचे व्यवहार कळले नाहीत. पण, पैसाच इतका अमाप कमवला की, नुकसान व्हायची भीतीच राहिली नाही. लोकांच्या दृष्टीने करोडपती होऊनही विश्वास अडाणीच राहिला. विश्वासला त्याचं दु:ख नव्हतं. कारण तोंडावर सगळे त्याला शेठ म्हणायचे. नगरसेवक वगैरे तर सकाळ-संध्याकाळ त्याच्या मागं असायचे. विश्वास सकाळ – दुपार – संध्याकाळ फक्त जमिनी शोधत फिरायचा. व्यवसाय एके व्यवसाय. हा विश्वास आज सकाळी वारला.

विश्वास वारला, असं एखाद – दुसरा माणूस म्हणाला. सगळे ‘अडाणी वारला’ म्हणत होते. कारण आता कुणाला त्याला ‘शेठ’ म्हणायची गरज नव्हती. ‘अडाणी चांगला माणूस होता..’ वगैरे बोलत बोलत लोक तो कसा अडाणी होता, याची आठवण काढत होते. विश्वासच्या घरच्यांनी रडून रडून हाल करून घेतले होते. नाही, नाही म्हणता चार – पाचशे लोक दारात गोळा झाले होते. कडक उन्हाळा होता. विश्वासच्या घरासमोर तीन – चार झाडं होती. ती किती लोकांना सावली देणार? माणसं आठवणी तरी किती काढणार?

विश्वास कधी पार्ट्यात रमणारा नव्हता. काम एके काम. त्याच्या आठवणी तरी किती असणार? लोक त्रासले. अंत्ययात्रा कधी निघणार? मग चौकशी सुरू झाली. हळूहळू खरा निरोप आला. पुढच्या आठवड्यात विधानसभेची निवडणूक आहे. आमदार साहेब येणार आहेत. मग लोकांच्या लक्षात आलं, पैसे देऊन लोक सभेला येत नाहीत आजकाल. त्यात पाच – सातशे लोक आयते गोळा झाले असतील, तर आमदारसाहेब कशी संधी सोडणार? आमदार उत्तमराव पुन्हा निवडणुकीला उभे होते. खूप नाराजी आहे, हे त्यांना माहीत होतं. पण, त्यांच्या विरोधात उभे असलेले गुणवंतराव पण काही धुतल्या तांदळाचे नव्हते.

नेत्यांना विश्वास असतो की ते नीतिभ्रष्ट आहेत, पण त्यांना आत्मविश्वासही असतो की ते समोरच्या नेत्यापेक्षा प्रामाणिक आहेत. उत्तमराव आणि गुणवंतराव याच आत्मविश्वासावर निवडणूक लढवत होते. जी गोष्ट उत्तमरावांच्या लक्षात आली, ती गुणवंतरावांच्या लक्षात येणार नाही, असं नव्हतं. साधा दोन वर्षांचा निरागस लहान मुलगा पळता पळता पडला, तर जमिनीला लाथा घालतो. जमिनीला दोष देतो. गुणवंतराव पन्नाशीतले नेते. मागच्या विधानसभेला पडले, तर त्यांनी लोकांना दोष दिला. आपल्या मातीतच गद्दारी आहे वगैरे बोलले. आणि यावेळी पुन्हा नव्या जोमाने उभे राहिले. आणि अडाणीच्या अंत्ययात्रेला दारात पाच – सहाशे लोक जमलेत, हे कळताक्षणी धावून आले. डोळे पुसत.

गुणवंतराव डोळे पुसत अडाणीच्या दारात उभे होते. त्यांच्याभोवती त्यांचे समर्थक गोळा झाले होते. गुणवंतराव आणि विश्वासचा संपर्क एका जमिनीच्या व्यवहारात झाला होता. ती जमीन गुणवंतरावांना पाहिजे होती. त्यांनी विश्वासला आई- बहिणीवरुन शिव्या देऊन ती स्वतः विकत घेतली. विश्वास काहीच बोलला नाही. पण, आज गुणवंतराव त्याच्या दारात असे उभे होते जणू काही दोघांचा बालपणीपासूनचा दोस्ताना होता. खूप उशीर होऊ लागला तसे लोक ‘आता निघूया’ म्हणू लागले. गुणवंतरावांना पण हेच पाहिजे होतं. आपण एकटेच विश्वासला खांदा द्यायला आलोय, हे लोकांना दिसायला पाहिजे, ही त्यांची मनापासून इच्छा. ते विश्वासबद्दल लोकांना बोलू लागले. जवळचे लोक म्हणाले, ‘विश्वास म्हणू नका, अडाणी म्हणा.’ कारण सगळे विश्वासला अडाणी म्हणायचे.

अडाणी नावात जवळीक होती. जिव्हाळा होता. गुणवंतराव पण अडाणी म्हणू लागले. आता ते खरे विश्वासच्या जवळचे वाटू लागले. पण, अडचण अशी झाली की तरीही मृतदेह उचलायला काही कोणी तयार झालं नाही. उत्तमराव आल्याशिवाय मृतदेह उचलायचा नाही, असं त्यांच्या लोकांचं ठरलेलं होतं. यात विश्वासच्या घरच्यांना कोणी विचारलेलं नव्हतं. बोलून चालून अडाणी बिचारा. त्याच्या घरच्यांना तरी कोण विचारणार? गुणवंतराव संतापले. त्यांनी कार्यकर्त्यांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी बळेच मृतदेहाला खांदा द्यायचा प्रयत्न केला. विश्वासच्या घरच्या कुणी विरोध केला नाही. अडाणी होता बिचारा जगासाठी. त्याच्या घरच्यांना कोण विचारणार? पण, मृतदेह उचलून नेऊ लागताच उत्तमरावांचे समर्थक आडवे आले. आधी रिवाजाप्रमाणे शिवीगाळ झाली. नंतर प्रकरण मारामारीवर आलं. मारामारीत मृतदेह खाली पडायची भीती होती. पण, बोलूनचालून अडाणी माणूस. मेल्यावरसुद्धा त्याची कुणाला पर्वा? मारामारी पोलिस आल्याने आवरली. पुन्हा मृतदेह जागेवर ठेवला गेला. आमदार साहेब पाच मिनिटांत येताहेत, असा निरोप आला.

आमदार असलेले उत्तमराव पाच मिनिटांत येऊ शकत नव्हते. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री मुंबईवरून आले होते. त्यांची सभा सोडून अंत्ययात्रेला जाणं उत्तमरावांना शक्य नव्हतं. ते उतावीळ झाले होते. मुख्यमंत्र्याच्या सभेला उत्तमरावांनी वीस लाख रुपये खर्च केले होते, पण सत्तर लोकसुद्धा आले नव्हते. आणि तिकडं विश्वास गेलाय, त्याच्या अंत्ययात्रेला आयते पाच – सहाशे लोक जमलेत. उत्तमरावांनी मुख्यमंत्र्यांना ‘अंत्ययात्रेला येत का?’ म्हणून विचारलं. पण, मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांच्याकडे एक पूजा आहे संध्याकाळी, म्हणून शक्य नाही. नाही तर मुख्यमंत्र्यांनाही एक वेळ पाच – सहाशे लोक जमलेत या गोष्टीचा मोह आवरला नाही.

मुख्यमंत्री अर्धा तास बोलत राहिले. इकडे विश्वासच्या दारात जमलेले सगळेच वैतागले. काही लोक निघू लागले. गुणवंतरावांना लक्षात आलं की, अजून पंधरा – वीस मिनिटांत अंत्ययात्रा निघाली नाही तर पाच – पंचवीस पण लोक उरणार नाहीत. उत्तमराव आणि सहकारी बळेच विश्वासचा मृतदेह उचलून निघाले. अचानक फोनाफोनी झाली. पोलिसांनी अश्रुधुराचे नळकांडे फोडले. गर्दी पांगली. विश्वासच्या घरचे त्या धुराकडं बघत राहिले. त्यांना अश्रुधुरात धूसर झालेला विश्वासचा मृतदेह स्वर्गात निघाल्यासारखा दिसत होता. पांगलेले लोक आपापल्या खिडकीतून बघत होते, आता अडाणी माणसाचं काय होणार?

(संपर्कः jarvindas30@gmail.com)



Source link