खलनिग्रहणाय: पोलिस – जनतेतील वाढता दुरावा

0
2
खलनिग्रहणाय:  पोलिस – जनतेतील वाढता दुरावा


मुंबई28 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

परवा एका शहरामध्ये फेरफटका मारताना मी मुद्दाम त्या भागातील लोकांना तिथल्या पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची नावे विचारली. त्यावेळी दहापैकी फक्त एक जण त्या भागात राहत असलेल्या हवालदाराचे नाव सांगू शकला. वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि पोलिस अंमलदारांचा लोकसंपर्क किती कमी झाला आहे, हे यावरून स्पष्टपणे दिसते. कोलकात्यात घडलेली महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि निर्घृण हत्येची घटना, बदलापूरमधील शाळकरी मुलींच्या लैंगिक शोषणाची घटना आणि अलीकडच्या काळात घडणाऱ्या अशा प्रकारच्या विविध घटनांनी समाजमन हादरुन गेले आहे. या घटनांनंतर उफाळणारा जनक्षोभ पाहता लक्षात येते की पोलिस आणि जनतेमध्ये दुरावा वाढत चालला आहे. अशा प्रकारच्या घटना पूर्वी झाल्या नाहीत, असे नाही. एक तर अशा घटना घडायलाच नकोत. पण, दुर्दैवाने घडली तर त्यानंतर पोलिसांच्या कारवाईबद्दल अविश्वास, साशंकता निर्माण होणे अतिशय चिंताजनक आहे.

कोलकत्यामध्ये पोलिसांनी केलेल्या दिरंगाईबद्दल सर्वोच्च न्यायालयानेही टीका केली. कोलकात्यात जे काही घडले, त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप असू शकतो, असे आरोप सातत्याने होत आहेत. या घटनेत मेडिकल कॉलेजच्या पदाधिकाऱ्यांनी अक्षम्य चुका केल्या असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे या प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’कडे दिला गेलाआहे. बदलापूरमधील घटनेच्या बाबतीत राजकीय हस्तक्षेप झाल्याचे समोर आले नाही. पोलिस अधिकारी आणि अंमलदाराने जी दिरंगाई केली त्याबाबत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापक आणि ट्रस्टींनी तक्रार देण्यात दिरंगाई केल्याचेही विशेष तपास पथकाच्या निदर्शनास आले आहे.

समाज कितीही प्रगत, सुशिक्षित आणि सुसंस्कृत मानला गेला, तरी अशा स्वरुपाच्या गंभीर घटना घडू शकतात. पण, घटना घडल्यावर त्यावर कुणीही पांघरुण न घालणे आणि पोलिसांनीही तत्काळ योग्य ती कारवाई करणे अपेक्षित असते. सध्या बऱ्याच गंभीर घटनांमध्ये असे होताना दिसत नाही. ही चिंता वाढवणारी गोष्ट आहे. याची अनेक कारणे आहेत. पण, सर्वात मोठे कारण म्हणजे पोलिस व नागरिकांमध्ये वाढलेला दुरावा हे आहे. अलीकडच्या काळात एक नवीनच गोष्ट दिसू लागली आहे, ती म्हणजे तरुणांमधील वाढता आक्रोश आणि बंडखोरीचे प्रदर्शन. या बाबतीत सरकार आणि प्रशासनाला आता तरी जाग यायला पाहिजे. कारण यावर वेळीच उपाययोजना झाली नाही, तर भविष्यात मोठा उद्रेक होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकते. खरे तर लोकशाहीमध्ये पोलिस आणि सर्व सरकारी यंत्रणा जनतेला उत्तरदायी असते. पण, क्षुद्र राजकरण आणि सरकारी यंत्रणेच्या राजकीयीकरणामुळे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी जनतेची काळजी घेताना दिसत नाहीत. पोलिस लोकांना जबाबदार असतील, तर ते नक्की त्यांची काळजी घेतील. पण, आता मुळातच अनेक पोलिस अधिकारी चांगल्या कामामुळे नव्हे, तर राजकारणी लोकांची मर्जी संपादन केल्यामुळे चांगल्या पदावर आलेले असतात. अशा स्थितीत कायदा सुव्यवस्था टिकवायची असेल, तिला बळकट करायचे असेल, तर पोलिस आणि जनतेतील दुरावा कमी झाला पाहिजे. परवा एका शहरामध्ये फेरफटका मारताना मी मुद्दाम त्या भागातील लोकांना तिथल्या पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची नावे विचारली. त्यावेळी दहापैकी फक्त एक जण त्या भागात राहत असलेल्या हवालदाराचे नाव सांगू शकला. वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि पोलिस अंमलदारांचा लोकसंपर्क किती कमी झाला आहे, हे यावरून स्पष्टपणे दिसते. सध्याचे पोलिसिंग हायटेक आणि नवतंत्रज्ञानावर आधारित आहे. पण, पोलिस अधिकारी आणि अंमलदारांनी जनतेला भेटू नये, त्यांची ओळखही ठेवू नये, असा याचा अर्थ नाही. उलट शक्य तितका जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला जावा. पोलिसांनी आपल्या भागातील प्राथमिक शाळेपासून विद्यापीठापर्यंत सर्व शिक्षण संस्थांना नियमित भेटी द्याव्यात. त्यामुळे पोलिस आपल्यासोबत आहेत, हा संदेश विद्यार्थ्यांमध्ये जातो. क्रीडा स्पर्धांचे आयोजनही या दृष्टीने उपयोगी पडते. पोलिस स्टेशन हे पोलिस खात्यातील सर्वांत महत्त्वाचे केंद्र आहे. आलेल्या प्रत्येक माणसाला पोलिस अधिकारी, कर्मचारी भेटले पाहिजेत. असे झाल्यास सामान्य लोकांच्या मनात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण होईल आणि गुन्ह्यांवरही नियंत्रण येऊ शकेल. पोलिस-जनतेतील अंतर कमी करण्यासाठी…

– पोलिसांनी पायी गस्त (पायदळ पेट्रोलिंग) सुरू केली पाहिजे. हा यशस्वी आणि प्रभावी पोलिसिंगचा आत्मा आहे. पोलिस मॅन्युअलमध्येही त्याचा उल्लेख आहे.

पायदळ पेट्रोलिंगचे फायदे असे : – पायी फिरल्याने पोलिस अधिकारी – कर्मचाऱ्यांना लोक ओळखतात. – लोकांकडून पोलिसांना अनेक प्रकारची माहिती मिळते. – सामान्य जनतेच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण होते. – सार्वजनिक ठिकाणचे अवैध धंदे आपोआप बंद होतात. – रस्त्यांवरील गुन्हे, छेडछाडीच्या घटनां‌र नियंत्रण येते. – गल्लीबोळात पोलिस पोहोचल्याने महिलांची सुरक्षा वाढते. – पोलिस अधिकारी – कर्मचाऱ्यांना आपल्या भागाची चांगली माहिती होते. – पोलिसांमध्ये तणावामुळे आजार, स्थूलपणा वाढतो, त्यावर पायी फिरणे उपयोगी पडते. – पोलिसांविषयी लोकांमध्ये विश्वास निर्माण झाल्याने गुन्हे नियंत्रण, तपासात त्यांची मदत होते.

खलनिग्रहणाय डॉ. भूषणकुमार उपाध्याय



Source link